का ल द र्श क

Saturday 7 March 2015

बळी, गुन्हेगार, रक्षक आणि इतर

निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या वक्तव्याचा समावेश असलेला लघुपट 'इंडियाज डॉटर' बीबीसी तर्फे प्रसारित झाला आणि देशभरात मोठी खळबळ माजली.  त्याच्या वक्तव्यामुळे भारताची मान खाली गेली वगैरे असेही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ लागले.  मुकेश सिंहचे  "रात्री अपरात्री निर्जन स्थळी बाहेर पडणारी स्त्री बलात्कारपात्र आहे" हे मत त्याचे वैयक्तिक मत आहे.   त्याचे हे मत व्यक्त झाल्याने भारतातील १३० कोटी जनतेची मान खाली कशी जाऊ शकते? यावर अनेकांनी असाही युक्तिवाद केला की मुकेश सिंहचे मत ही बहुसंख्य भारतीय पुरुषांची मानसिकता आहे.   अनेक पुरुषही असेच महिला रात्र बेरात्र बाहेर फिरल्याने,  त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असे आक्षेप घेतात त्यामुळे त्या तमाम पुरुषांना आणि आरोपी मुकेश सिंह याला एकाच तराजूत तोलले गेले.   हे असे तोलणाऱ्यांनी मूलभूत फरक लक्षातच घेतलेला दिसत नाही.  

कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा त्या अनुषंगाने आपण व्यक्तिंची चार प्रकारच्या घटकांमध्ये वर्गवारी करू शकतो.
बळीः- ज्या व्यक्तीसोबत गुन्हा घडला आहे व त्यामुळे तिचे काही नुकसान झाले आहे.
गुन्हेगार:- ज्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्याकरिता किंवा फायदा नसतानाही विकृत विचारसरणीमुळे बळीचे नुकसान घडवून आणले आहे.
रक्षकः- ज्या व्यक्तीने गुन्हेगाराला गुन्हा घडविण्यापासून आणि बळीला नुकसान होण्यापासून रोखले आहे किंवा तसा प्रयत्न केला आहे.
इतरः- या मध्ये उरलेले सर्व येतात.  ते गुन्हा घडतानाचे मूक साक्षीदार असू शकतील.  तिथे उपस्थित नसणारे बळीच्या नात्यातले / मित्रपरिवारातले किंवा तसे नसतानाही पण बळीविषयी कळकळ असणारे, किंवा या सर्वांशी काहीच संबंध नसणारे इतर त्रयस्थ नागरिक हे सर्व या चौथ्या घटकात येतात.  

आता काही काळ बलात्कार हा गुन्हा बाजूला ठेवू.   इतर कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्याचा विचार करू, जसे की चोरी.  

एका व्यक्तीच्या स्कूटरच्या डिकीतून एक लाख रुपये चोरी झालेत.   आता या प्रकरणात चोर हा गुन्हेगार.   ज्याच्या डिकीतून रक्कम चोरी झाली ती व्यक्ती बळी.   ती व्यक्ती पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेली म्हणजे पोलीस झाले रक्षक आणि उरलेल्या इतरांमध्ये त्या व्यक्तीचे काही हितचिंतक - जसे की त्या व्यक्तीचे सहकारी, नातेवाईक, मित्र इत्यादी.   याशिवाय इतर त्रयस्थ म्हणून आपण ही बातमी वर्तमानपत्रात वाचणारे वाचक यांना धरूयात.   आता सर्वांच्या या घटनेवर प्रतिक्रिया काय असतील ते बघूयात.

इतर त्रयस्थ वाचक वगैरे मंडळी मनात किंवा उघड एकमेकांशी म्हणतील -  "काय माणूस आहे? स्कूटरच्या डिकीत एवढी रक्कम ठेवून स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केलीच कशी काय?  "  गंमत म्हणजे साधारण याच आशयाचे वक्तव्य त्या व्यक्तीशी त्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र आणि अगदी तक्रार नोंदवून घेणारे पोलिस देखील करतील.

समजा घटनेतला चोर सापडला तर तोही असेच सांगेल की "स्कूटर बाहेर रस्त्यावर उभी होती.   डिकीचे झाकण फारच सहज उघडता आले आणि आतली रक्कम पाहून मला मोह झाला व मी चोरी केली.   तशी बँकेतली सुरक्षित रक्कम सहजासहजी लुटायचे माझे धाडस होणार नाही पण हे कृत्य फारच सोपे व सहजसाध्य होते म्हणून मी केले.  "

तसे पाहता बँकेतली सुरक्षित म्हणविल्या जाणाऱ्या अभेद्य तिजोरीतली रक्कम देखील लुटली जातेच पण म्हणून स्कूटरमध्ये एक लाखाची रक्कम ठेवणाऱ्याचे समर्थन कसे होऊ शकेल.  तसेच बँकेतली रक्कम चोरणाऱ्याला  निश्चितच शिक्षा जास्त होणार कारण त्याच्या गुन्ह्यात बळजबरीने तोडफोड (रॉबरी विथ फोर्सफूल हाऊसब्रेकिंग)  झालेली असेल.   याउलट स्कूटरच्या डिकीतून रक्कम घेऊन पसार होणारा भुरटा चोर समजला जाईल.  

आता बलात्काराच्या घटनेत काय होते तर रक्षक जे सर्व वेळी सर्व ठिकाणी संरक्षण देऊ शकत नाहीत, इतर जण ज्यांना बळीविषयी आस्था आहे  असे सारे जण बळीला काळजी घ्यायला सांगतात.   बळी स्वतः ज्या ठिकाणी एकटी स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे तिला तिथे त्यावेळी एकटीला जाऊ नको असे सुचवितात.   घटनेतला गुन्हेगार पकडला जातो तेव्हा तोही असेच म्हणतो की त्या ठिकाणी त्या वेळी बळी मला सहज उपलब्ध होती म्हणून मी गुन्हा केला.   तसे पाहता बिहार, उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी घरात घुसून महिलांवर खुलेआम अत्याचार करणारे, तेवढी ताकद असणारे गुन्हेगार आहेतच की पण दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे निवासी क्षेत्र बऱ्याच अंशी सुरक्षित आहे अशा शहरांत निर्जन स्थळी अवेळी एकट्या दुकट्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशा गुन्हेगारांची मात्र त्या महिलेला घरात घुसून त्रास देण्याची क्षमता नक्कीच नसते.  

प्रत्येक व्यक्तीकरिता काही क्षेत्र हे निश्चित सुरक्षित क्षेत्र (सेफ झोन) असते.   या क्षेत्राच्या बाहेर त्या व्यक्तिची सुरक्षितता अनिश्चित असते.   तेव्हा अशा असुरक्षित क्षेत्रात (अनसेफ झोन) जाऊ नये असा सल्ला देणारे हितचिंतक हे तो सल्ला काळजीच्या पोटी देतात तर बळी त्या क्षेत्रात सापडला म्हणून मी गुन्हा केला असे म्हणणारे गुन्हेगार हे स्वतःच्या बचावाच्या जाणिवेतून किंवा त्यांच्यात तेव्हा गुन्हा करण्याची इच्छा कशी झाली त्याचे स्पष्टीकरण देतेवेळी सांगतात पण या दोन्हींच्या उद्देशातला फरक कुणी समजून घेतच नाही.  

आता पुन्हा स्कूटरच्या डिकीतून लाख रुपयांच्या चोरीचे उदाहरण पाहू.   रक्षक व इतरांनी चोरी होण्याचे कारण हे रक्कम चोरास सहजसाध्य होती असे सांगितले.   चोराने देखील हेच सांगितले.   मग चोर, रक्षक व इतर एकाच मानसिकतेचे झालेत का?   बळीने इतरांना असे सांगावे का तुम्ही मला का सांगताय की मी रक्कम सहजसाध्य ठिकाणी ठेवू नये.   माझी स्कूटर आहे, माझी रक्कम आहे.   मला डिकीत ठेवायचे स्वातंत्र्य का नाही?   त्यापेक्षा तुम्ही चोरावर संस्कार करा की त्याने दुसऱ्याच्या वस्तुला हात लावू नये.   बळीने असे विधान केले तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का या घटनेमध्ये?

मग बलात्काराच्या घटनेमध्ये रक्षक व इतर जण जेव्हा आपुलकीपोटी महिलेला सांगतात की बाई तू रात्री बेरात्री एकटीदुकटी फिरू नको.   तर ती बळी ठरलेली किंवा संभाव्य बळी ठरू शकणारी इतर कोणतीही महिला लगेचच रक्षक व इतरेजनांनाही त्या गुन्हेगाराच्याच मानसिकतेचे ठरविते.   तुम्ही माझी काळजी करण्यापेक्षा,  मला रात्री बेरात्री फिरण्याचे,  आवडीचा पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य नाकारण्यापेक्षा त्या गुन्हेगाराला संस्कार द्या असे सांगते.

स्कूटरच्या डिकीतून रक्कम चोरी होण्याच्या प्रकरणात बळी हे मान्य करतो की रक्षक व इतरेजन हे आपल्याला सल्ला आपल्या आपुलकी पोटी देत आहेत.   ते व गुन्हेगार एका बाजूला नसून व ते आपल्या बाजूला आहेत व गुन्हेगार विरुद्ध बाजूला आहे.   फक्त प्रत्येकच ठिकाणी आपल्याला इतरांकडून संरक्षण मिळणे अशक्य आहे तेव्हा तिथे आपली आपणच काळजी घ्यायची आहे व जिथे ते शक्य नसेल ते क्षेत्र टाळायचे आहे.  

बलात्काराच्या घटनेमध्ये मात्र बळी फक्त महिलाच पडू शकतात आणि गुन्हेगार फक्त पुरूषच असू शकतात म्हणून त्या घटनेकडे एका बाजूला बळी + रक्षक + इतरेजन आणि विरुद्ध बाजूला गुन्हेगार असे सारासार न पाहता सरळ सरसकटीकरण करून एका बाजूला स्त्री (बळी व संभाव्य बळी) व विरुद्ध बाजूला पुरूष (गुन्हेगार व संभाव्य गुन्हेगार) इतक्या बेजबाबदारपणे पाहिले जाते.   स्त्रीला आपुलकीपोटी सल्ले देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला संभाव्य गुन्हेगार समजले जाते.  आम्हाला आपुलकी दाखविण्याऐवजी गुन्हेगार पुरुषच आहे म्हणजे तुमच्याच गटातला आहे तेव्हा त्याला संस्कार द्या असे सांगणाऱ्या  महिलांना हा फरक ज्यादिवशी समजेल की सर्व पुरुष एकाच गटातले नसतात त्या दिवसापासून वेगळा महिला दिन करायची गरज पडणार नाही असे वाटते.

ता. क. :- बलात्कारासंबंधाने स्त्रियांच्या पोशाखाविषयी अभिप्राय व्यक्त करणाऱ्या पुरुषांना महिलांच्या संघटीत रोषास बळी पडावे लागले परंतु याच स्त्रियांना हे ठाऊक नाही काय की सिंधूताई सपकाळ या एका नामवंत महिलेनेच "आजच्या मुली असा पोशाख घालतील तर बलात्कार होणार नाहीत तर काय चमत्कार होतील काय?  मी या वयातही अशा प्रकारे लुगडे नेसते की माझी टाच देखील दिसत नाही" असे वक्तव्य एकदा नव्हे तर अनेकदा व तेही जाहीररीत्या केले आहे.  

बलात्काराला विरोध झाला नसता तर आम्ही तिचा खून केला नसता, तिने शांतपणे बलात्कार होऊ द्यायला हवा होता.   या मुकेश सिंहच्या वक्तव्याने तर आगीत तेल ओतले गेले.   प्रत्यक्षात हे प्रकरण झाल्यावर काहीच दिवसांत नेमके असेच वक्तव्य महिला शास्त्रज्ञ डॉ अनिता शुक्ला यांनी देखील केले होते तेव्हा त्यांच्यावर देखील टीका झाली होती.    कायदा सुव्यवस्था व व्यक्तिस्वातंत्र्याकरिता ज्याचे जगात आदराने  नाव घेतले जाते अशा अमेरिका ह्या देशांतही तुम्हाला शिकागोसारख्या शहरांत एखाद्या विशिष्ट वर्णाच्या गुन्हेगाराने अडविले तर आपल्या जवळील रक्कम, मौल्यवान वस्तू विनाप्रतिकार त्याच्या हवाली करा.   प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका असा सल्ला आणि तोही तिथल्या पोलिसांकडून आजच्या काळातही दिला जातो.   या सल्ल्याविषयी कधी कुणी हरकत घेतल्याचे अथवा असा सल्ला देणारे गुन्हेगारांच्याच मानसिकतेचे असल्याचा आरोप केल्याचे  ऐकिवात नाही.  

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दीपिका पदुकोणच्या माय चॉईस या व्हिडीओ विषयी:-

मी तो व्हिडीओ पाहिला. मला अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्‍या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.

दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.

स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.  या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्‍यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्‍याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्‍या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.