का ल द र्श क

Wednesday 1 December 2010

रिक्षाचालकांचा इलाज

प्रवाशांचे हक्क आणि रिक्षाचालकांचे कर्तव्य
 
आपल्या देशात काही व्यवसाय करण्यासाठी सर्वांना मुक्त परवानगी आहे. परंतू इतर काही व्यवसाय करण्यास परवाना पद्धती लागू करण्यात आली आहे. हे व्यवसाय सर्वांनाच करता येत नाहीत. त्यांची संख्या मर्यादित ठेवण्यात येते जेणेकरून त्यांच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण न होता त्यांना नियमित उत्पन्न मिळावे. रिक्षावाहतूकीचा व्यवसाय हा देखील त्यापैकीच एक आहे. त्याचप्रमाणे टॆक्सीवाहतूकीचाही. या व्यवसायातील लोक काळ्या-पिवळ्या रंगातील वाहनांचा उपयोग करतात. हे रंग ते सार्वजनिक सेवा करतात असे दर्शवतात. त्यामूळे या लोकांच्या व्यवसायाला एक स्पर्धामुक्त वातावरणाचे संरक्षण लाभले आहे. उदाहरणार्थ :- वाहने भाडेतत्वावर देण्याचा व्यवसाय करणारे इतर लोकही असतात की जे आपल्या वाहनावर लाल रंगात T हे इंग्रजी अक्षर रंगवून घेतात. यांच्या वाहनाला पिवळ्या रंगाचा क्रमांकफ़लक असतो. परंतू या व्यवसायासाठी लागणारा परवाना सर्वांनाच मिळू शकतो. यांच्या संख्येवर कुठलीही मर्यादा नाही. त्यामूळे त्यांच्यात स्पर्धा असते. म्हणजेच एखादा आपली इंडिका रु.६/- प्रति कि.मी. भाड्याने देईल तर दुसरा रु.५/- प्रति कि.मी. भाड्याने देईल.
परंतू रिक्षा / टॆक्सी व्यवसायात अशी स्पर्धा नाही. त्यांना एका ठराविक दरानेच व्यवसाय करावा लागतो. एका दृष्टीने हा त्यांचाही फ़ायदा आहे कारण त्यामूळे त्यांच्यात चढाओढ लागत नाही आणि त्यांच्या व्यवसायाला संरक्षण मिळते. त्याप्रमाणे हा त्यांच्या प्रवाशांसाठीही फ़ायदा आहे. अशाच पद्धतीचे इतरही काही नियम या व्यवसायासाठी बनविले आहेत की जे प्रवासी व व्यावसायिक या दोघांसाठी फ़ायद्याचे तसेच बंधनकारकही आहेत.
  1. कायम टेरिफ़ कार्ड व मीटरचा उपयोग करणे
  2. स्टॆंडवर येणारे कुठलेही भाडे न नाकारणे.
  3. भाडे घेतल्यानंतर वाहनात आपल्या तर्फ़े इतर प्रवासी / नातेवाईक यांना न बसविणे.
  4. सार्वजनिक बस वाहतूकीच्या थांब्यावर प्रवासी न भरणे.
  5. अधिकृत रिक्षा थांब्याव्यतिरिक्त प्रवासी भरण्याकरिता इतरत्र रिक्षा उभी न करणे.
हे व इतर अनेक नियम किती तरी प्रवाशांना ठाऊकच नाहीत.
 
पिंपरी-चिंचवड मधील रिक्षावाले
 
मला माझ्या कामानिमित्त अनेकदा निगडीहून पुणे शहरात यावे लागते तेव्हा मी माझ्या घरापासून सकाळी निगडी बसस्टॊप पर्यंत येतो आणि तिथून पीएमटीने पुणे शहरात येतो. पुणे शहरात बहुतेक ठिकाणी पीएमटीची सेवा बरी आहे. माझे काम होऊन जाते. परंतू पुन्हा संध्याकाळी निगडीला आल्यावर परत माझ्या घरापर्यंत जायला बसची नियमित सोय नाही.
रिक्षाचालकांना मीटरप्रमाणे भाडे घ्यायचे मान्य नाही. ते प्रवाशांकडून दीडपट ते दुप्पट भाडे वसूल करतात. प्रवाशांनाही त्यात काही चूक आहे असे वाटत नाही. प्रवासी रिक्षात बसण्या आधी चालकाला इच्छित स्थळी जाण्याचे भाडे विचारतात त्यानंतर थोडीफ़ार घासाघीस करतात. पटले तर बसतात नाहीतर सरळ चालत जातात.
मी यावर उपाय केला तो असा :-
मी एका रिक्षात बसलो आणि त्याला माझ्या घराचा पत्ता सांगितला तो म्हणाला १५ रुपये होतील. मी म्हंटले चालेल. नंतर आम्ही आमच्या घरापर्यंत आलो तेव्हा मी त्याच्या हातात दहा रुपये दिले तर तो भांडायला लागला. नंतर त्याचा आरडाओरडा ऐकून माझे कुटुंबीय आणि इतर लोक ही जमा झाले. त्याने सर्व हकीगत सांगितल्यावर माझे कुटूंबीय व इतरांनीही त्या रिक्षाचालकाचीच बाजु घेतली. सर्वांचे म्हणणे असे पडले की जर तुमचे पंधरा रुपये अगोदरच ठरले होते तर आता ते जास्त वाटले तरी दिलेच पाहिजे.
त्यावर मी काही गोष्टी रिक्षावाल्याला तसेच इतरांनाही समजावून सांगितल्या.
  1. रिक्षा वाल्याने मी रिक्षात बसल्यावर लगेच मीटर चालु करून रिक्षा इच्छित स्थळी न्यायला हवी.
  2. मला तोंडी भाडे सांगणे हे पुर्णत: बेकायदेशीर आहे. त्यामुळे ते भाडे त्याने मला अगोदर सांगितले असले तरी माझ्यावर बंधनकारक ठरत नाही.
  3. मी रिक्षाने केलेला प्रवास १.६ कि.मी. असुन जर मीटर चालु केले असते तर त्यावर दहा रुपये भाडे दाखवले गेले असते. (त्या काळातील दराप्रमाणे). तेव्हा मी दिलेले भाडे बरोबरच आहे.
  4. या सर्व गोष्टी पटत नसतील रिक्षावाल्याने पुन्हा एकदा मीटर टाकून तोच प्रवास करुन खात्री करुन घ्यावी तसेच इतर नियमांचीही शहानिशा पोलीस ठाण्यात जाऊन करून घ्यावी.
रिक्षावाला या कुठल्याच गोष्टीसाठी तयार झाला नाही. तो मला म्हणाला,"आता मला १५ रुपये द्या. मग माझा नंबर लिहुन घ्या आणि हवी तर माझी तक्रार पोलिसात करा." त्यावर मी त्याला म्हणालो,"तुम्ही काय मला पावती देणार आहात काय? मग तुम्हीच दहा रुपये घ्या आणि पाहिजे तर तुम्हीच माझी तक्रार करा."
 
ठाम
 
त्यावर त्याने बरीच वादावादी केली परंतू मी माझ्या निर्णयावर ठाम असल्यामूळे तो शेवटी दहा रुपये घेऊन गेला.
असाच प्रयोग मी त्यानंतरही चार वेळा केला. प्रत्येक वेळी थोडा फ़ार संघर्ष करावा लागला पण मी ठाम राहिलो.
शेवटच्या वेळी तर कहरच झाला. रात्रीचे दोन वाजले होते. मी मुंबईहून आलो होतो. निगडी ला उतरलो. रिक्षा धरली. रिक्षावाला म्हणाला, "वीस रुपये". मी म्हणालो,"ठीक आहे." नंतर आम्ही शंभर मीटरच पुढे गेलो असू तर त्याने एकाला रिक्षात घेतले आणि माझ्याशेजारी बसवले. तो त्याचा मित्रच होता आणि केवळ वेळ घालवण्याकरिता आमच्या बरोबर येत होता.
माझ्या घरापाशी आल्यावर उतरताना मी त्याला दहा रुपये दिले. तो आरडा ओरडा करु लागला. मी त्याला म्हंटले,"हे बघ मीटर ने दहा रुपये होतात. रात्री बारानंतर म्हणजे दीडपट म्हणुन पंधरा रुपये होतात. पण तु अजुन एक प्रवासी घेतला. मग भाडे विभागले जाऊन होते रुपये साडेसात. तर आता तू मला अडीच रुपये परत दे." हे ऐकून तो अजुनच चवताळला. आजुबाजुचे लोक जागे झाले. त्यातल्या एकाने पाचाची नोट काढली आणि रिक्षावाल्याला देऊ लागला. त्यावर मी त्या रिक्षावाल्याला ठणकावुन सांगितले,"हे बघ त्या नोटेला हात लावलास तर मी मारामारीला सुरुवात करीन आणि पहिल्यांदा तुला नाही तर तुझ्या या मित्राला चोपून काढीन. कारण मी इथे माझे घर आहे म्हणुन आलो तर तु रिक्षाचालक म्हणुन मला घेऊन आलास पण तुझा हा मित्र इथे का आला याचे पटण्यासारखे काहीच उत्तर त्याच्याकडे नाही त्यामुळे मी त्याला मारले तरी तो पोलिसांना माझी तक्रार करु शकणार नाही." एवढे बोलून मी त्या मित्रापाशी सरकलो. तर तो घाबरुन पळून गेला आणि त्याच्यामागोमाग तो रिक्षावालाही. (कारण रिक्षा शेअर करण्यासाठी प्रथम बसलेल्या प्रवाशाची परवानगी आवश्यक असते जी या रिक्षाचालकाने घेतली नव्हती.)
अशा प्रकारे मी ठाम भुमिका घेऊन माझ्यापुरते तरी या नाठाळ रिक्षाचालकांना नमविले. परंतू आमच्या शेजारच्या नागरिकांच्या बचावात्मक पवित्र्यामुळे मी आता असले प्रकार सोडून दिले आहेत. आता मी माझ्या घरातून माझी दुचाकी घेऊन निघतो आणि ती निगडीच्या वाहन तळावर पाच रुपये देऊन उभी करतो. पिंपरी-चिंचवड शहरात आता मी रिक्षातुन प्रवास करीतच नाही.
 
इतर प्रकारांनीही त्रास
 
अर्थात रिक्षातून प्रवास केला नाही म्हणजे रिक्षावाल्यांचा त्रास संपला असे नाही. त्यांचे त्रास देण्याचे इतरही प्रकार असतात.
  1. आपण बसथांब्यावर उभे असतो आणि बस आपल्या समोर थांबते तेव्हा ते आपल्या आणि बसच्या मध्ये अशा प्रकारे येऊन थांबतात की आपल्या बसमध्ये चढता येऊ नये.
  2. चुकीच्या दिशेने रिक्षा आपल्या दुचाकी वर घालणे.
  3. चौकात सिग्नल हिरवा असतानाही थांबून प्रवासी भरणे व मागच्या वाहनांची गैरसोय करणे.
  4. स्वत:ला डावीकडे वळायचे नसुनही वळणावर डावीकडे थांबून प्रवासी भरणे व डावीकडे वळणा-या वाहनचालकांची गैरसोय करणे.
  5. अधिकृत रिक्षाथांब्यांशिवाय इतरत्र रिक्शा उभी करुन रस्त्यावर अतिक्रमण करणे आणि इतर नागरिकांची गैरसोय करणे.
याचा बंदोबस्त कसा करावा याच विचारात सध्या मी आहे.


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.