का ल द र्श क

Friday 26 November 2010

अजमल कसाबचं काय केलं?

आज मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला दोन वर्षं पूर्ण झाली (म्हणजे हल्ला ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसाला कारण तो हल्ला तीन दिवस चालु होता).  मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा या हल्ल्याला एक वर्षं पूर्ण व्हायला काही दिवस बाकी होते तेव्हा मी मुंबईत दुचाकीवरून रात्रीचा फेरफटका मारायचं ठरवलं.  कडक पोलीस बंदोबस्त असेल असा माझा समज होता.  रात्री बेरात्री भटकतोय म्हंटल्यावर पोलीस मला हटकतील असं वाटलं आणि त्यामुळे पोलीसांना माझा उद्देश समजावा या करिता व त्यांनाही त्यांच्या कामात त्रास होऊ नये या विचाराने आणि माझ्याकडून सहकार्य व्हावे या हेतूने मुंबई पोलीस  आयुक्तांना उद्देशून एक पत्र टंकलिखीत केले.  ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त असेल व प्रत्येक वेळी मला त्या कर्मचार्‍यांना देण्यास सोयीचे होईल म्हणून या पत्राच्या दहा प्रती सोबत बाळगल्या होत्या. 

माझ्या घरातून (निगडी, पुणे येथून) मी सायंकाळी ठीक सहा वाजता निघालो.  दादर येथे रात्री साडेनऊ वाजता पोचलो.  एका उपाहारगृहात जेवण करून तेथून रात्री सव्वा दहा वाजता बाहेर पडलो.  मरीन ड्राईव्ह येथे रात्री पावणे अकरा वाजता दुचाकी वाहनतळावर लावून काही काळ पायी भटकंती केली.  त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून शहराच्या विविध भागांमध्ये चकरा मारल्या.  या संपूर्ण कालावधीत मला कुठेही पोलीसांनी हटकले नाही.  मुख्य म्हणजे पोलीस बंदोबस्तावर असलेले मला कुठे दिसलेच नाहीत.  मरीन ड्राईव्ह येथे एका बाकड्यावर दोन पोलीस गप्पा मारीत बसले होते. इतरही काही ठिकाणी पोलीस खुर्च्यांवर आरामात बसले होते.  त्यांना बंदोबस्तावर असलेले असे काही म्हणता येणार नाही.  मध्यरात्र उलटून गेल्यावर परगावच्या क्रमांकाची दुचाकी घेऊन (शिवाय माझ्या डोक्यावर ज्यातून चेहरा दिसणे शक्य नाही असे काळ्या काचेचे हेल्मेट होते) रस्त्यावर फिरणार्‍या मला त्यांनी थांबवून हटकायला हवे होते.  तसे त्यांनी केले नाही, उलट मीच काही पोलिसांना रस्त्याची माहिती विचारली असता त्यांच्या आरामात मी  व्यत्यय आणला असा उद्वेग त्यांच्या चेहर्‍यावर दिसला.  त्यामुळे माझ्याकडील पत्राची एकही प्रत मला प्रत्यक्षात कुठेही पोलिसांना देण्याचा प्रसंग आलाच नाही व सर्वच्या सर्व प्रती अजूनही माझ्यापाशीच आहेत.

पोलिसांनंतर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे असे समजले जाते त्या खासगी सुरक्षा रक्षकांचा अनुभवही फारसा आशादायक नव्हता.  ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता.   याच भागात असणार्‍या इतर इमारतींमध्ये जिने व इतर मोकळ्या जागांमध्ये विजेचे दिवे चालु होते पण व्यक्तींचा वावर नव्हता.  इमारतींना एकाहून अधिक फाटक होते, पण सेवेवरील सर्व सुरक्षा रक्षक एकाच फाटकापाशी जमून पत्ते खेळत होते तर काहीजण तेथे शेजारीच पथारी टाकून झोपले होते.  म्हणजे दुसर्‍या फाटकातून कोणी इमारतीत प्रवेश केला तरी या रक्षकांना त्याचा काहीच पत्ता लागणार नव्हता.  शहरातील बहुतेक इमारतींबाबत अशीच परिस्थिती होती.

अशा प्रकारे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्या या भेटीतील इतर निरीक्षणांवर आधारित दुसर्‍याच विषयावर एक लेख लिहून तो ब्लॉग वर प्रसिद्ध केला.  अर्थात या भेटीदरम्यान जाणवलेली व विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुंबईतील टॅक्सीचालक हेच रात्रीच्या मुंबईचे खरे पहारेकरी.  बहूतेक ठिकाणी हे टॅक्सीचालक अतिशय सतर्क असलेले आढळले.  त्यांनी मला एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जायचे याबद्दल माझ्या विनंतीवरून मार्गदर्शन तर केलेच पण त्याशिवाय मी कोठून आलो आहे व असा का भटकत आहे हेदेखील जाणून घेण्यात त्यांनी रस दाखविला (जे खरे तर पोलिसांकडून अपेक्षित होते).  अर्थात या रात्री भेटलेल्या टॅक्सीचालकांमध्ये मराठी भाषिक अभावानेच आढळले, बहुतांश परप्रांतीय च होते.

असो.  तर यावर्षी पुन्हा मुंबई भटकंती करून फारसे काही नवीन बघावयास मिळेल असे वाटले नाही.  त्याऐवजी दुसर्‍या एका महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करून ते ब्लॉगवर प्रकाशित करावे असे मी ठरविले.  हा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थातच त्या दहशतवादी हल्ल्यातील दहा हल्लेखोरांपैकी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब.  मी गेली दोन वर्षे आणि आजही कित्येकांच्या चर्चेत ऐकतोय, वाचतोय, पाहतोय तो एकच प्रश्न म्हणजे अजमल कसाबचं काय करणार?

मला वाटतं त्याचं काय करणार ह्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अजमल कसाबचं काय केलंत?  होय गेली दोन वर्षे ताब्यात असणार्‍या या इसमाचं पोलिसांनी नेमकं काय केलं?  काय करता येऊ शकलं असतं? किंवा खरं तर काय केलं जाणं अपेक्षित होतं?  आता त्याला फाशी द्या अशी लोकभावना आहे पण गेल्या दोन वर्षांतील घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकल्यास असं लक्षात येईल की त्याला फाशी देण्याची प्रक्रिया आपणच आपल्या हातांनी अतिशय अवघड करून टाकलीय.  जेव्हा ह्या मोहिमेत त्याचे इतर साथीदार जागच्या जागीच ठार मारण्यात आले आणि हा एकटा जिवंतपणे पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेपासून ते आजतागायत उचलण्यात आलेली पावले पाहता या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसाबच्याच पथ्यावर पडणारा आहे. 

कसा तो पाहा :-

सर्वप्रथम ताब्यात आलेल्या कसाबवर खटला चालवायचा निर्णय घेण्यात आला.  त्यासाठी त्याला वकील निवडण्याची संधी देण्यात आली.  त्याला ते जमले नाही म्हणून आपल्या तर्फेच त्याच्याकरिता वकीलाची सोय केली गेली (त्यातही दोन वेळा बदल करण्यात आला).  आपल्याला असे दाखवायचे होते की आपण कसाबची बाजू पूर्णपणे न्यायाने आणि त्याला ती मांडण्याची सर्वप्रकारे संधी देऊन मगच निर्णय घेणार आहोत (हे सारे आपण कुणाला दाखविणार आहोत? अंकल सॅमला?).  जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हाच कसाबला आपण एक फार मोठा मार्ग उपलब्ध करून दिला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयांपर्यंतची विविध पातळ्यांवरील न्यायालये आणि त्यात त्याला बाजू मांडण्याची संधी आणि त्याउप्परही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्याची खास सवलत.  ह्या सगळ्या प्रक्रियांना लागणारा विलंब लक्षात घेता कसाबला सहज दहा ते पंधरा वर्षांचा अवधी आपण बहाल केला हे आपल्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही.  कारण यापैकी प्रत्येक पातळीवर जरी त्याच्या विरोधात निर्णय झाला तरीही वरच्या पातळीपर्यंत दाद मागण्याचा अधिकार आपणच त्याला देऊ केलाय.  तो आता आपण नाकारला तर मग त्याला सुरूवातीलाच न्यायालयात सादर करण्याच्या निर्णयालाच अर्थ राहत नाही.  म्हणजे आता आपण या मार्गावरून हटू शकत नाही.  उलट तो प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक मुद्दे (जसे की त्याची गैरसोय होतेय, त्याचा वकीलावर, आरोग्य तपासणी अधिकार्‍यांवर विश्वास नाही वगैर, वगैरे) उपस्थित करून वेळेचा प्रचंड अपव्यय करून आधीच वेळखाऊ असलेली प्रक्रिया अधिकच लांबवू शकतो.  त्याशिवाय या कालावधीत तो आजारपणाने, किंवा इतर कुठल्याही कारणाने पोलिसांच्या कैदेतच मृत्यू पावता कामा नये.  याकरिता त्याला उत्कृष्ट प्रकारचे अन्न व सर्वप्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविध पुरविण्याची जबाबदारीही आपोआपच आपल्या शिरावर येऊन पडलीय.  त्याच्या विरोधात जनमतही प्रचंड असल्याने त्याला घातपात होण्याची शक्यता गृहीत धरून त्या दर्जाचे संरक्षण पूरविणे हेही मोठे जिकीरीचे व खर्चाचे काम आहेच.

एवढा लांबलचक व वळणा वळणांचा मार्ग निवडून आपण त्याच्यावर महत्त्वाचा आरोप काय ठेवला तर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे.  या एका वाक्याने तो नायकपदावर विराजमान झाला.  याचे प्रमुख कारण म्हणजे चोरी, खून, बलात्कार हे सारे जगाच्या पाठीवर सगळीकडे निसंशय अपराधच ठरतात म्हणजे कायद्याच्या दृष्टीनेही आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही.  याउलट युद्ध हे ज्या देशाविरोधात लढले जाते त्या देशाच्या कायद्याचा तो भंग होत असला तरी जो देश युद्ध पुकारतो तो त्याला कायदेशीर रीत्या अपराध समजत नाहीच शिवाय नैतिकतेच्या दृष्टीने पाहता तो तर एक पराक्रमाचाच भाग असतो.   शिवाय आपण त्याला युद्ध पुकारण्यावरून पकडले असे म्हणत असू तर तो युद्धकैदी झाला आणि मग तो सैन्याच्या ताब्यात जायला हवा आणि सैन्यानेच त्याचा फैसला करायला हवा.  असे केल्यास मग तो युद्धकैद्यांच्या दर्जाचा मानून त्याची पाकिस्तानबरोबर आपल्या युद्धकैद्यांच्या बदल्यात देवाणघेवाण करावी लागेल आणि असे केले गेले तर जनमत प्रक्षुब्ध होऊन सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

आता तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय म्हंटल्यावर सैन्याच्या ताब्यात असायला हवा पण आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात कारण त्याला पोलिसांनी पकडलेय, सैन्याने नाही.  (आता इथून पुढचा विचार करता दिसतील त्या आपल्या व्यवस्थेतील त्रुटी)  पोलिसांनी पकडले कारण तो शहरात नागरिकांवर शस्त्रांच्या साहाय्याने हल्ला करीत होता.  अर्थात पोलीसांनी त्याला पकडले असले तरी कुठलाही कायदा मोडल्याचा ठपका ते त्याच्यावर ठेऊ शकत नाहीत कारण मुळातच त्याला कुठलेही कायदे लागू होतच नाहीत.  कायदे इथल्या अधिकृत नागरिकांकरिता बंधनकारक असतात किंवा मग अधिकृतरीत्या व्हिसा घेऊन येणार्‍या परकीय नागरिकांवर.  हा तर बेकायदा घुसलेला म्हणजे याला शहरात आल्यावर नव्हे तर देशाच्या सीमेवर घुसखोरी करीत असतानाच पकडायला हवा होता आणि तो ही सैन्याने, पोलिसांनी नव्हे.  तसे घडले नाही हा सैन्याचा दोष नाही का?

दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे कसाब व त्याचे साथीदार साठ तास पोलिसांसोबत / सैन्यासोबत लढता येईल इतका शस्त्रसाठा / दारुगोळा स्वत:बरोबर घेऊन आले.  इतका दारुगोळा व शस्त्र सैन्याच्या नजरेखालून सुटून या देशात / शहरात आलेच कसे?  त्यानंतरही शहरात पोलिसांनी त्यांना या गोष्टी बाळगण्याबाबत दोषी मानून आधीच अटकेत का टाकले नाही?  आपल्या देशात स्वसंरक्षणासाठी देखील सहा इंच किंवा त्याहून लांब पात्याचे हत्यार इथले अधिकृत नागरिकही जवळ बाळगू शकत नाही तिथे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवरच येऊन पडते.  या जबाबदारीचाच एक भाग म्हणून शहरातील सर्वच जण या शस्त्रास्त्र कायद्याचे पालन करताहेत याची खात्री करून घेणे, ज्याचे पालन मुंबई पोलिसांनी इमानदारीने केले नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते.

थोडक्यात कसाब, त्याचे साथीदार व त्यांची शस्त्रसामुग्री मुंबई शहराच्या  मध्यवर्ती भागात सैन्य अथवा पोलिसांचा पहारा चुकवून आत पोचतात आणि साठ तास शहराला वेठीस धरून अंदाधुंद गोळीबार करतात, कित्येक निरपराधांचे प्राण घेतात हे सारेच अविश्वसनीय आहे.  त्याहून महत्त्वाचे म्हणजे या दहा जणांचा मुकाबला आपण हजार जणांच्या मदतीने करतो (पोलीस, एनएसजीचे कमांडो, इत्यादी) आणि शेवटी जेव्हा हे सारे रोखण्यात आपण यशस्वी होतो तेव्हा आपण त्याला आपला विजय (?) मानतो.  हे सारेच अतर्क्य आणि आचरटपणाचे नाही का?  पुर्वी शिवाजी महाराज अतिशय निवडक मावळ्यांच्या सोबतीने मुघलांवर स्वारी करीत आणि मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येने असले तरी त्याला धूळ चारीत.  आजच्या काळात कसाब फक्त मोजक्या दहा साथीदारांसह इथे येतो आणि आपल्याला त्याच्याशी लढायला हजार माणसे लागतात आणि तीही आपल्याच प्रदेशात.  युद्धाच्या डावपेचांमध्ये कोण कुणाचे अनुयायी आहेत?

दोन वर्षे झाली कसाब पोलिसांच्या ताब्यात आहे.  या कालावधीत त्याला इथपर्यंत येण्यास कोणी मदत केली त्या सैन्यातल्या व पोलिस दलांमधल्या नावांचा अजून आपल्याला छडा लागू नये?  पोलिसांनी थर्ड / फोर्थ अगदी हव्या त्या डिग्रीचा वापर करून गुन्हेगारांकडून आतापर्यंत इतर प्रकरणांत माहिती मिळविली आहेच ना? मग या प्रकरणात त्यांना ही माहिती का मिळू शकली नाही?  ही माहिती जर दोन वर्षांत मिळविता येत नसेल तर मग त्याला जिवंत पकडून त्याच्या पालनपोषणाचा खर्च करण्यात काय हशील आहे? त्याच्या इतर साथीदारांप्रमाणेच त्यालाही जागच्या जागी संपविता आले असतेच की.

कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:च्या देहाची चाळण करणार्‍या तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे.

Wednesday 17 November 2010

(खर्‍या) करोडपतींना सलाम

कौन बनेगा करोडपती या दुरचित्रवाणीवरील खेळाचा चौथा मौसम सध्या जोरात चालु आहे.  पहिला मौसम साधारण दहा, अकरा वर्षापूर्वी चालु झाला असावा पण तेव्हा उपग्रह वाहिन्या बघण्याची सोय आमच्या दूरचित्रवाणी संचात नसल्याने मी तो बघू शकलो नाही.  अर्थात त्याविषयीची चर्चा नियमितपणे कानावर पडत असे.  अशाच अनेक अनौपचारिक गप्पांमध्ये चर्चिला जाणारा एक प्रश्न म्हणजे कौन बनेगा करोडपती च्या प्रत्येक भागात नेमका कोण करोडपती होतोय? हा त्या कार्यक्रमाच्या शीर्षकातच विचारला जाणारा प्रश्न आणि याचे चार पर्याय प्रेक्षक, स्पर्धक, जाहिरातदार आणि अमिताभ असे असतील तर कुठल्याही जीवनरेखेशिवाय याचे चटकन येणारे उत्तर म्हणजे अर्थातच अमिताभ.   त्यावेळी कुठे अधिकृत आकडा छापून आला नसला तरी अमिताभ प्रत्येक भागाचे मानधन एक कोटीच्या आसपास घेई असे कुजबुजले जाई.  ही  बाब खरी असेल तर या खेळातून प्रेक्षकांपुढे येणारा पहिला करोडपती त्यालाच मानायला हरकत नाही.

पुढे वर्तमानपत्रातून वाचले की हर्षवर्धन नवाथे नावाचा एक स्पर्धक एक कोटीचे बक्षीस जिंकणारा या स्पर्धेतला पहिला विजेता ठरला.  त्याची फारच चर्चा झाली.  (काही ठिकाणी नकारात्मक चर्चा देखील झाली पण ती इथे मांडण्याचे प्रयोजन नाही). 

कालांतराने कौबक चा दुसरा मौसम प्रेक्षकांपुढे आला.  अर्थात त्याला पहिल्याइतकी लोकप्रियता मिळाली नाही म्हणून अमिताभच्या तब्येतीचे कारण पुढे करीत तिसर्‍या मौसमात शाहरूख खान ने अमिताभची जागा घेतली.  हा मौसम तर कौबक साठी फारच अयशस्वी ठरला त्यामुळे आता चौथ्या मौसमात पुन्हा अमिताभचीच वर्णी लागली.  यावेळी वाहिनी देखील बदलली आहे (पूर्वी स्टार आणि आता सोनी) आणि लोकप्रियता देखील पूर्वीपेक्षा अभुतपूर्व प्रमाणात वाढली आहे.  आमच्या बंधुंच्या कृपेने घरात टाटा स्कायची स्थापना झाल्याने २०१० मधला हा चौथा मौसम बघण्याची संधी मला मिळाली.  हा कार्यक्रम मी प्रथमच बघत असून काही उणीवा असल्या तरी एकूणात मला हा कार्यक्रम आवडला.  दिनांक ८ व ९ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. 

८ नोव्हेंबर रोजी प्रशांत बतार या स्पर्धकाने एक कोटी पर्यंत मजल मारली.  त्यानंतर पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी अमिताभ, तज्ज्ञ रानडे, प्रशांतचे वडील या सर्वांनी त्याला खेळ सोडून एक कोटी घेत बाहेर पडण्याचे सूचविले परंतू तरीही आपल्या निश्चयावर ठाम राहून प्रशांतने पाच कोटीच्या प्रश्नाचे उत्तर दिले.  अर्थातच हे उत्तर चूकले आणि प्रशांतला तीन लाख वीस हजारांवर समाधान मानावे लागले.  प्रशांतने मोठी चूक केली असे अनेकांना वाटले.  काहींनी तर त्याला दोष देणारी विधाने फेसबुक, ट्विटर, बझ्झ इत्यादींवर जाहीर रीत्या केली.  परंतू मला तरी असे वाटते की प्रशांतचा निर्णय योग्यच होता.  तो एक कोटी मिळवू शकतो हे त्याने सिद्ध केलेच होते.  प्रत्यक्ष रक्कम मिळाली नाही तरी त्यामुळे त्याची योग्यता काही कमी होत नाही.  माघार न घेता आणि परिणामांची पर्वा न करता निर्णयावर ठाम राहून त्याने इतर कोणाच्या नसले तरी निदान माझ्या मनात तरी आदराचे स्थान नक्कीच मिळविले आहे.  (अर्थात दीपिका पदुकोन संदर्भात त्याने जाहीरपणे जी विधाने केली ती निश्चितच कौतुकास्पद नाहीत.  त्याबद्दल त्याला दोष दिलाच पाहिजे.)

९ नोव्हेंबरला ज्योती चौहान या पोलिस कर्मचारी असलेल्या महिलेने आपली व्यथा प्रेक्षकांसमोर मांडली.  तिची लहान मुलगी दुर्धर आजाराने ग्रासली असल्याने व तिच्यावर आधीच मोठे कर्ज असल्याने तिला साधारणत: तीन लाख रुपयांची गरज असल्याचे तिने आधीच स्पष्ट केले.  सुरूवातीलाच जीवनरेखांचा आधार घ्यावा लागल्याने ती तीन लाख वीस हजारांच्या टप्प्यावर पोचते की नाही अशी शंका निर्माण झाली.  या शंकेला निराधार ठरवित तिने हा टप्पा सहजच पार केला.  त्यानंतर साडेसहा लाख व साडेबारा लाख रुपयांची बक्षिसे असलेले प्रश्नही अचूक रीत्या सोडविले.  पंचवीस लाखाचे बक्षीस मिळवून देऊ शकणार्‍या प्रश्नाचे उत्तरही तिला येत होते, (फक्त खात्री नव्हती. तिने तसे सांगताच अमिताभने तिला नीट विचार करून बरोबर उत्तर देण्यास सूचविले.  त्यावर आपण वेळ वाया घालविणार नाही असे तिने सांगितले.  खेळाच्या या टप्प्यावर उत्तर देण्यास वेळेचे बंधन नसते याची अमिताभने तिला पुन्हा आठवण करून दिली.  त्यावर आपण उत्तरासाठी अधिक  वेळ घेतला तर त्यामुळे  Fastest Fingers First मधील इतर स्पर्धकांचा तोटा होईल असे ती म्हणाली.  इतका सारासार विचार करणारी आणि त्याप्रमाणे वागणारी ती बहुधा या खेळातील पहिली आणि एकमेव स्पर्धक असावी)   परंतू तिने कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचे नाकारले आणि खेळ सोडला.  आपल्याला ठाऊक असलेले उत्तर बरोबरच होते आणि त्यायोगे आपल्याला पंचवीस लाख मिळू शकले असते हे समजल्यावरही तिची प्रसन्न चर्या बदलली नाही.  आपल्याला मिळाले तेच खुप असून जास्तीच्या रकमेचा आपल्याला अजिबात मोह नाही हे तिने स्पष्ट केले.  मिळालेल्या रकमेतून मुलीसाठी सर्वोत्तम उपचार व कर्जफेड करूनही मोठी रक्कम शिल्लक राहील व कुटुंबासाठी तिचा निश्चितच चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल यामुळे आपण समाधानी आहोत असे तिने सांगितले.

वेगवेगळ्या परिस्थितीत अगदीच असमान निर्णय घेणारे प्रशांत बतार आणि ज्योति चौहान हे दोन्ही स्पर्धक माझ्या दृष्टीने या करोडपती बनण्याचे स्वप्न दाखविणार्‍या खेळाचे खरे मानकरी आहेत.  त्यांना माझा सलाम.