का ल द र्श क

Wednesday, 8 April 2015

नकार

फार वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा वर्षभरात प्रदर्शित होणाऱ्या सर्व हिंदी चित्रपटांपैकी केवळ एक अथवा फार फार तर दोन चित्रपट पाहणं शक्य होतं, कारण नवे चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच पाहावे लागत आणि आर्थिक दृष्ट्या ते परवडणं शक्य नव्हतं; त्या काळात वर्षभर दूरदर्शन (ज्याला काही लोक कुत्सितपणे दुर्दशा दर्शन असेही म्हणत) नामक राष्ट्रीय प्रक्षेपण वाहिनीवर आठवड्यातून एक या हिशेबाने साधारण पन्नासएक जुने हिंदी चित्रपट पाहिले जात. त्या काळी चित्रपट प्रसारित होण्यापूर्वी निवेदिका थोडक्यात तसे निवेदन करीत असे. या निवेदनात चित्रपटाचे प्रमुख कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार आदींची माहिती सांगितली जात असे. क्वचित एखादा नुकताच (म्हणजे वर्षा दोन वर्षात येऊन गेलेला) चित्रपट देखील प्रसारित होई (असा चित्रपट बहुदा तिकीटबारीवर अपयशी ठरल्यामुळेच लवकरच दूरदर्शन केंद्राचा रस्ता धरीत असे). तर असाच एकदा १९९२ सालचा संगीत हा चित्रपट त्याच्या प्रदर्शनानंतर केवळ वर्षभरातच दूरदर्शनवर प्रसारित झाला. प्रसारणापूर्वी निवेदिकेने नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे ह्या चित्रपटाचीही थोडक्यात माहिती दिली. याशिवाय आपण प्रेक्षकांना नेहमीप्रमाणे फारसा जुना चित्रपट न दाखविता वर्षभरापूर्वीचाच चित्रपट दाखवीत आहोत याची त्यांनी विशेषत्वाने नोंद घ्यावी (असे करण्याचे कारण म्हणजे त्यावेळी खासगी वाहिन्यांचा देशात प्रवेश होऊ लागला होता) याकरिता हे देखील सांगितले की हा एक गाजलेला चित्रपट असून त्यातले "मै तुम्हारी हूं" गाणे फार लोकप्रिय झाले होते. तिच्या या वाक्याने मी आश्चर्यचकित झालो कारण आदल्याच वर्षी तर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्णपणे संगीत याच विषयाला वाहिलेल्या या चित्रपटातील "जो गीत नही जन्मा वह गीत बनायेंगे" हे सुरेश वाडकर यांचे आणि "सून ओ हसीना काजलवाली" हे जॉली मुखर्जी यांचे गीत ठाऊक होते. परंतु "मै तुम्हारी हूं" या गीताविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे या गाण्याविषयीचे कुतूहल वाढले आणि अर्थातच हे गाणे चित्रपटात नेमके कुठे आणि केव्हा आहे याकरिता चित्रपट अधिकच काळजीपूर्वक बघितला गेला.

चित्रपट बघितल्यावर या गीताचे चित्रपटातील प्रयोजन समजले. ते थोडक्यात असे - अभिजात संगीताच्या विकासाकरिता झटणारे दोघे जण - नायक (जॅकी श्रॉफ) व नायिका क्र. १ (माधुरी दीक्षित) हे दोघे जण आपल्या या प्रयत्नांमध्ये नायिका क्र. २ (पुन्हा माधुरी दीक्षितच) हिलादेखील सामील करून घेतात. परंतु त्यांना सामील होण्यापूर्वी नायिका क्र. २ ही थिल्लर व गल्लाभरू संगीताच्या आधारे लोकांचे मनोरंजन करीत असते. नायिकेने अशा प्रकारे आपल्या प्रतिभेचा दुरुपयोग करावा हे नायकाला सहन होत नाही. तिला थोबाडीत मारून तिचे "मे तुम्हारी हूं" हे गाणे (व सोबतीला चालू असलेले नृत्यही) बंद पाडून तो तिची कानउघाडणी करतो (तिचे डोळे उघडून काहीच उपयोग नसतो कारण ती अंध असते). पुढे नायिका क्र. २ ही असले बाजारू नाचगाणे सोडून अभिजात संगीताच्या सेवेत लागते. अर्थातच सबंध चित्रपटाच्या प्रकृतीशी हे गाणे सुसंगत नसल्याने चित्रपटाच्या जाहिरातीत ह्या गाण्याची झलक दाखविली गेली नव्हती व त्यामुळेच मला ते ठाऊक नव्हते. परंतु ज्या प्रकारे संगीताचा बाजार मांडणे चुकीचे आहे हे दाखविण्याकरिता या गीताची योजना केली गेली आहे आणि जे गीत नायक मधूनच नायिकेच्या कानाखाली वाजवून बंद पाडतो नेमके तेच गीत लोकप्रिय व्हावे आणि दूरदर्शनवर त्या चित्रपटाचे प्रसारण करताना निवेदिकेनेही त्याच गीताच्या लोकप्रियतेचा विशेष उल्लेख करावा याचे मला तरी चित्रपट पाहिल्यावर अतिशय वैषम्य वाटले. यामुळे चित्रपटाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासल्यासारखे वाटून गेले. याला कारणीभूत माधुरीचे नेहमीच्या शैलीतले नृत्य तर नव्हे असेही वाटून गेले; कारण संपूर्ण चित्रपटात केवळ याच गाण्यात माधुरी या प्रकारे नाचली आहे. बाकी गीतांचे चित्रण अतिशय संयत पद्धतीने केले गेले आहे. पॅराशूटच्या जाहिरातीमधील आजी (सुनीला प्रधान) प्रमाणे नाकावर घसरणारा चष्मा पुन्हा वर चढवीत "तो क्या जमाना बदल गया है? " असेही विचारावेसे वाटत होते.

पण जमाना कधीच बदलला होता आणि तोही माधुरीच्या या चित्रपटापासून नव्हे तर कितीतरी आधीपासूनच. दयावान मध्ये माधुरीने ज्या नायकासोबत अतिधाडसी दृश्य देत खळबळ माजविली त्या विनोद खन्ना या अभिनेत्याचा १९७७ सालचा इंकार हा चित्रपट पाहताना या गोष्टीचा प्रत्यय आला. चित्रपट बनतो नेमका कुठली गोष्ट प्रेक्षकांच्या मनात ठसविण्यासाठी (हाय लाइट  करण्यासाठी) आणि लोक तो लक्षात ठेवतात कुठल्या भलत्याच कारणाकरिता. या दोन्हींत किती अंतर असतं हे जर तपासायचं असेल तर त्या करिता हा चित्रपट एक उत्तम उदाहरण आहे. इंकार चित्रपट म्हटला की बहुतेकांना उषाजींनी गायलेलं "मुंगळा... मै गुड की कली" हे गाणं आठवतं. जरा अजून हळुवार गीतांचे कुणी चाहते असतील तर त्यांना "दिल की कली, यूंही सदा" हे मोहम्मद रफी यांनी गायलेलं गाणं आठवतं. राजेश रोशन यांचे संगीतातले वेगळे प्रयोग आवडणारे काही दर्दी संगीतप्रेमी किशोरकुमार आणि आशा भोसले यांचं "तूमको हमसे प्यार है" हे गाणं लक्षात ठेवतात. संगीताव्यतिरिक्त इतर काय आठवतं ते विचारलं तर कुणाला चित्रपटातला क्रूर खलनायक अमजद खान आठवतो, कुणाला डॅशिंग सीआयडी ऑफिसर विनोद खन्ना आठवतो, कथेतलं काही आठवतंय का विचारलं तर ती एक नाट्यमय अपहरण कथा असल्याचंही काहीजण आवर्जून सांगतात. पण चित्रपटाचं शीर्षक "इंकार" असं का होतं हे विचारलं तर कुणाला सांगता येत नाही. निदान मला तरी या प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा प्रेक्षक अजून भेटला नाहीये. चित्रपटाचं शीर्षक हे चित्रपटातील एखाद्या पात्राचं नाव असेल तर कथेच्या दृष्टीने ते पात्रही (टायटल रोल किंवा शीर्षक भूमिका) महत्त्वाचं असतं. त्याचप्रमाणे या चित्रपटाचं शीर्षक इंकार म्हणजे नकार ही एक घटना, प्रसंग किंवा प्रक्रिया आहे. तेव्हा ही शीर्षक घटना किंवा टायटल इन्सिडन्स इतका गाजलेला चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या लक्षात राहू नये हे आश्चर्यच नव्हे का? मुख्य म्हणजे प्रेक्षकांना चित्रपटातले जे कलाकार आठवतात त्या विनोद खन्ना, अमजद खान, हेलन किंवा राकेश रोशन (शेवटचे दोघे तर चित्रपटात पाहुणे कलाकार असून लोकांना आठवतात) यांच्यातील कुणाच्याही भूमिकेशी या चित्रपटाच्या शीर्षकाचा संबंध नाहीये. त्याशिवाय या कलाकारांनी रंगविलेल्या भूमिका देखील या चित्रपटाच्या कथेच्या दृष्टीने ही प्रमुख नाहीयेत. सादरीकरणात कदाचित विनोद खन्ना आणि अमजद खान यांच्या भूमिकांना जास्त फूटेज असेलही; पण मुळातः ही कथा आहे ती हरिदास चौधरी या डॉ. श्रीराम लागू यांनी रंगविलेल्या पात्राची आणि त्याने चित्रपटात वेगवेगळ्या वेळी दिलेल्या चार नकारांची. यापैकी त्याचे दोन नकार त्याला होकारात बदलावे लागतात. एक नकार होकारात बदलताना त्याला चित्रपटाचा नायक सीआयडी इन्स्पेक्टर अमरनाथ गिल (विनोद खन्ना) ची माफी मागून मनधरणी करावी लागते. दुसरा एक नकार होकारात बदलताना कंगाल होण्याची वेळ होते आणि उरलेले दोन नकार - ज्यावर तो ठाम राहतो, त्या नकारांचं अखेरपर्यंत होकारात परिवर्तन करीत नाही, त्या दोन नकारांमुळे तर त्याच्या कंगाल होण्याच्या प्रक्रियेवर अधिकच शिक्कामोर्तब होतं. पैकी त्याने अगदी शेवटी कंगाल होण्यापासून वाचणे शक्य असताना देखील दिलेला निर्णायक नकार हाच टायटल इन्सिडन्स किंवा शीर्षक प्रसंग आहे.

नॅशनल शू कंपनी या आघाडीच्या बूट उत्पादक कंपनीचा प्रमुख असलेल्या हरिदास चौधरीला संचालक बैठकीत इतर संचालकांकडून सुनावले जाते की अतिशय दर्जेदार व टिकाऊ बूट उत्पादन केल्यामुळे एकतर बुटाची किंमत वाढते आहे आणि पुन्हा हा बूट फाटत नसल्यामुळे नवा बूट घेतला जात नाही व नव्या बुटांची विक्री अपेक्षित प्रमाणात होत नाहीये. तेव्हा थोडे कमी टिकतील असे बूट हरिदास यांनी बनवावेत. तत्त्वनिष्ठ हरिदास चौधरी अर्थातच या प्रस्तावाला विरोध करतात आणि संचालकांशी वैर ओढवून घेतात. हा हरिदास चौधरी यांनी दिलेला या कथेतला दुसरा नकार. चौधरींचा स्वीय सहायक अनिल (हरीश) त्यांना सावध करतो की हे दुखावले गेलेले संचालक भविष्यात त्रासदायक ठरू शकतील. त्यावर चौधरी त्याला सांगतात की ते दिल्लीच्या एका भागधारकाकडून मोठ्या प्रमाणावर समभाग खरेदी करून कंपनीवर निर्विवाद सत्ता प्रस्थापित करण्याच्या विचारात आहेत. त्याकरिता त्यांनी कंपनीकडूनच वीस लाख रुपये कर्जाऊ घेतलेले असून स्वतः अनिलने त्वरित दुसऱ्यास दिवशी दिल्लीला जाऊन सौदा पूर्ण करायचा आहे. सोबतच ही गोष्ट त्यांच्यात व अनिलमध्येच गुप्त ठेवण्याचीही सूचना ते त्यास देतात.

इकडे त्याच सायंकाळी हरिदास चौधरी यांच्या घरी त्यांच्या विवाहाच्या वाढदिवसानिमित्त मोठी मेजवानी आयोजित केलेली असते. यावेळी आपल्याला त्यांचे सुखी कुटुंब दिसते. पत्नी शोना (लिली चक्रवर्ती), मुलगा गुड्डू (मास्टर राजेश), बहीण गीता (नायिका - विद्या सिन्हा) तसेच कुटुंबातीलच घटक वाटावेत इतकी जवळीक साधलेले वाहनचालक (साधू मेहेर) आणि त्याचा मुलगा बन्सी (मास्टर राजू) यांच्यासमवेत ते मित्र राकेश रोशन (राकेश रोशन) ने गायलेल्या गाण्याचा (दिलकी कली यूंही सदा खिलती रहे) आनंद घेत असताना जणू सुखाच्या परमोच्च बिंदूवर असतात. इतक्यात एक दूरध्वनी येतो आणि त्यांना जोरदार धक्का बसतो. त्यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आलेले असते. साऱ्या कुटुंबावर शोककळा पसरते. आपण काहीही करून, कितीही रक्कम खंडणी म्हणून द्यावी लागली तरी आपल्या मुलास सोडवून आणू असे ते पत्नी, बहीण व इतर लोकांसमोर बोलून दाखवितात. थोड्या अवधीतच सर्वांना समजते की हरिदास चौधरींचा मुलगा गुड्डू सुरक्षित असून नजरचुकीने वाहनचालकाचा मुलगा बन्सी याचेच अपहरण केले गेले आहे. हे कळताच हरिदास समाधानाने सुस्कारा सोडतात आणि दूरध्वनी करून पोलिसांना बोलावून घेतात. नजरचुकीने आपण दुसऱ्याच मुलाचे अपहरण केले आहे हे समजल्यावर अपहरणकर्ता त्यास सोडून देईल असा चौधरींचा कयास असतो.
इकडे पोलिस हरिदास चौधरींच्या बंगल्यावर येतात तेव्हा त्या पथकातील प्रमुख सी. आय. डी. इन्स्पेक्टर अमर नाथ गिल (नायक - विनोद खन्ना) आणि चौधरींची बहीण गीता एकमेकांना पाहतात तेव्हा भूतकाळात जातात आणि आपल्यापुढे त्यांच्या पूर्वस्मृतींचा पट उलगडतो.

***** पूर्वसूत्र  *****
कधी काळी अमर आणि गीता प्रेमात पडलेले असतात. चौधरींना त्याविषयी आपल्या पत्नीकडून कळते तेव्हा ते बहीण गीता हिला अमरसोबत असलेले संबंध तोडून टाकण्याचा सल्ला देतात. खरे तर त्यांनी अमरला कधी पाहिलेले देखील नसते किंवा त्याचे नावही त्यांना ठाऊक नसते परंतु आपली बहीण कुठल्यातरी पोलिस इन्स्पेक्टरच्या प्रेमात असल्याचेच त्यांना माहीत असते. तेवढ्या माहितीवर ते तिला सांगतात की त्याच्या मासिक वेतनात गीताला संसार चालविणे अवघड जाईल कारण तिचे राहणीमान ऐषारामी आहे. तिच्या गरजा पूर्ण करण्याकरिता कदाचित तिच्या पोलिस इन्स्पेक्टर पतीला आपल्या नोकरीत बेइमानी करावी लागू शकेल. या सल्ल्याला शिरोधार्य मानत गीता अमरसोबत असलेले नाते तोडून टाकते आणि त्यास पुन्हा कधीही न भेटण्याचे वचन हरिदासना देते, जे ती कसोशीने पाळते. बहिणीच्या एका इन्स्पेक्टरसोबत होणाऱ्या लग्नाच्या प्रस्तावास दिलेला नकार हा हरिदास चौधरींनी या कथेतील पहिला नकार.

*****  पूर्वसूत्र समाप्त  *****
कर्मधर्मसंयोगाने एकमेकांसमोर आलेले अमर व गीता एकदाच आपल्या या भूतकाळातील नात्याचा ओझरता उल्लेख करतात. हरिदास चौधरींना तर अमरच्या भूतकाळाविषयी काहीच ठाऊक नसल्याने त्या दोघांतही याविषयी काही चर्चा होत नाही. अमर व त्याचे पथक त्यांच्या कार्याला सुरुवात करतात; ज्यात दूरध्वनी संचास ध्वनिमुद्रण यंत्र जोडणे, खिडकीत दुर्बीण बसविणे आदी बाबींचा समावेश असतो. अपेक्षेप्रमाणेच थोड्याच वेळात अपहरणकर्ता राजसिंह (अमजद खान) चा दूरध्वनी येतो. आपण चुकून वाहनचालकाच्या मुलाला पळविले असले तरी आपल्या योजनेत काडीचाही बदल होणार नसल्याचे तो चौधरींना स्पष्टपणे सांगतो. आपणांस वीस लाख रुपये हवे असून ते न मिळाल्यास आपण बन्सीला ठार करू व त्याच्या मृत्यूचे पातक हरिदास चौधरींच्या माथी लागेल असे तो त्यांना स्पष्टपणे बजावतो. चौधरी वाहनचालकाच्या मुलाकरिता इतकी मोठी रक्कम द्यायचे नाकारतात. त्यांनी दिलेला चित्रपटातला हा तिसरा नकार.
हरिदास यांच्या नकार घंटेमुळे त्यांची पत्नी व बहीण दोघीही चांगल्याच नाराज होऊन त्यांना फैलावर घेतात. चालक त्यांच्या पायावर पडून ओक्साबोक्शी रडू लागतो. मुलगा गुड्डूही अतिशय दुःखी होतो. स्वीय सहाय्यक अनिल सर्वांसमोर सांगतो की खरे तर वीस लाख रुपये ही रक्कम चौधरींकडे आहे, परंतु ती त्यांची स्वतःची नसून त्यांनी कंपनीकडून कर्ज स्वरूपात घेतली आहे व त्यांना दुसऱ्या एका महत्त्वाच्या कार्याकरिता ती खर्च करावयाची आहे. हे ऐकल्यावर चौधरी अनिलला पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी दिल्लीला जाऊन लवकरात लवकर तो सौदा पूर्ण करण्याची सूचना करतात. इकडे कुटुंब चौधरींचा अधिकच राग राग करू लागते.

दुसऱ्या दिवशी अनिल येतो पण वेगळीच बातमी घेऊन... तो चौधरींना स्पष्टपणे सुनावतो की ते कसे विचित्र कोंडीत सापडले आहेत. त्यांनी अपहरणकर्त्याला पैसे दिले नाहीत तर कुटुंबात आणि समाजात त्यांची छी-थू होईल, कारण ते नोकराच्या मुलाला आपल्या मुलाहून हलक्या दर्जाचा समजतात असा त्याचा अर्थ होईल. त्याच वेळी जर त्यांनी हे पैसे अपहरणकर्त्यास दिले तर ते कंगाल होतील कारण हे पैसे अनुत्पादक जागी पडणार आहेत. त्याशिवाय ज्या समभागांची खरेदी करायचे स्वप्न हरिदास पाहत असतात ते समभाग मिळविण्यात अनिलच्या मदतीने इतर संचालक यशस्वी झालेले असतात. अनिलची ही बेइमानी चौधरींकरिता धक्कादायक असते. इकडे ज्या कुटुंबाकरिता आपण आपले ऐश्वर्य सांभाळायचा प्रयत्न करतोय ते कुटुंबही आपल्याला दुरावत चाललेय हे पाहून चौधरी अपहरणकर्त्यास रक्कम द्यायचा निर्णय घेतात.

अपहरणकर्त्याच्या सूचनेप्रमाणे रक्कम त्याने सांगितलेल्या ठिकाणी सोडली जाते. यावेळी लक्षात राहणारा खास उल्लेखनीय प्रसंग म्हणजे अमरने रक्कम ज्यात ठेवायची आहे त्या पिशवीत लपविण्याकरिता एक कॅप्सूल आणलेली असते. अपहरणकर्त्यांनी जर रक्कम काढून ही पिशवी पाण्यात फेकली तर ही विशिष्ट कॅप्सूल एक उग्र गंध सोडणार असते आणि जर का त्यांनी ती पिशवी जाळली तर पिवळ्या रंगाचा धूर वातावरणात सोडणार असते. परंतु अमर बुचकळ्यात पडतो की ही कॅप्सूल या चामडी पिशवीत लपवायची तरी कशी? तेव्हा हरिदास चौधरी स्वतः आपली चामड्यावर वापरली जाणारी हत्यारे घेऊन पिशवी मोठ्या खुबीने तासून त्यात ती कॅप्सूल लपवितात.
रक्कम मिळाली तरी अपहरणकर्ते बन्सीला सोडत नाहीत त्यामुळे चौधरी कुटुंबावर अजूनही शोकाचे सावट असते. तशातच हरिदास चौधरींना इतर संचालक बैठकीत सुनावतात की आता ते कंपनीचे प्रमुख राहिलेले नाहीत. त्यांनी कंपनीकडून घेतलेले वीस लाख रुपये त्वरित परत करावेत अन्यथा त्यांचेवर आर्थिक गैरव्यवहार करून कंपनीला फसविल्याबद्दल खटला दाखल करण्यात येईल. या क्षणाला हरिदास चौधरी पूर्णतः हताश होतात. त्यांच्याकडे आता काहीच नसते. समभाग इतरांनी खरेदी केल्यामुळे कंपनीचे प्रमुख पद गेलेले, डोक्यावर वीस लाख रुपयांचे कर्ज आणि इतके करूनही बन्सीचा अजूनही काहीच पत्ता नाही.

अथक तपास करून आणि मिळालेल्या वेगवेगळ्या धाग्यादोऱ्यांच्या साहाय्याने अमर मोठ्या कौशल्याने अपहरणकर्त्यांच्या टोळीतील मनमोहन (भरत कपूर) आणि प्रीती (शीतल) यांच्या पर्यंत पोचतो. त्या दोघांना अटक करून त्यांच्या तावडीतून बन्सीला सोडवून चौधरी कुटुंबापर्यंत पोचविण्यात यशस्वी होतो. वाहनचालक खूश होतो पण त्याचवेळी त्याच्या मुलाला वाचविण्याकरिता मोठी रक्कम खंडणी म्हणून देणाऱ्या हरिदास चौधरींची अवस्था अतिशय बिकट झालेली असते कारण अमरने मुलाला सोडवून आणलेले असले तरी रकमेचा काहीच पत्ता नसतो. अपहरणकर्त्यांच्या टोळीतील दोघे अटकेत असल्याचे कळताच मुख्य अपहरणकर्ता राजसिंह याने रक्कम आधी लपविलेल्या जागेवरून काढून स्वतःच्या ताब्यात घेतलेली असते.

प्रसारमाध्यमे (आकाशवाणी व वृत्तपत्रे) देखील आता या प्रकरणात रस घेऊ लागलेली असतात. वाहनचालकाच्या मुलाला
वाचविण्याकरिता खंडणी देणाऱ्या हरिदास चौधरींविषयी अधिकाधिक लोकांना माहिती होऊ लागते. त्यांच्या या औदार्याबद्दल त्यांचे समाजात नाव होऊ लागते. रोज अनेक लोकांची त्यांना अभिनंदनपर पत्रे येऊ लागतात. अचानक एके दिवशी अनिलही येतो - संचालक मंडळाचा निरोप घेऊन. त्यांना म्हणे हरिदास चौधरींना बैठकीत अपमानित करून बाहेर हाकलून दिल्याच्या कृतीचा पश्चात्ताप झालेला असतो. इतकेच नव्हे तर ते हरिदास चौधरींना आता सन्मानाने चेअरमनपद देखील देऊ करीत असतात शिवाय त्या वीस लाख रुपयांच्या वसुलीकरिता कुठलाही दावा दाखल करायचा विचारही कंपनी रद्द करणार असते. अर्थातच इतक्या सर्व गोष्टी देऊ करणाऱ्या संचालकांच्या त्या बदल्यात हरिदास चौधरींकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल ते अनिलला विचारतात. आनंदाची गोष्ट म्हणजे बदल्यात चौधरींनी काहीच करायचे नसते असे अनिल उत्तरतो. त्यावर संचालक मंडळाला हरिदास चौधरी हवे आहेत असे नसून त्यांच्या रूपात आपल्या त्यागामुळे अचानक समाजात पत वाढलेली एक संत प्रतिमेची व्यक्ती हवी आहे. या व्यक्तीच्या प्रतिमे आड कंपनीच्या संचालकांनी स्वतःला हव्या त्या गैर गोष्टी करीत राहायचे आणि चेअरमनने त्या सर्वांना मूक संमती देत केवळ रबरी शिक्क्याप्रमाणे वावरायचे हीच संचालकांची छुपी अपेक्षा असल्याचे व ती आपण ओळखल्याचे चौधरी अनिलला सांगतात. ते अर्थातच या प्रस्तावास ठाम नकार देतात. तुमच्या तत्त्वांना कवटाळून राहाल तर भिकारी व्हाल असे अनिल त्यांना सुनावतो. अनिलची पुढील बकबक ऐकून न घेता चौधरी त्यास घरातून हाकलून लावतात. अर्थातच हरिदास चौधरींनी दिलेला हा चित्रपटातला शेवटचा आणि निर्णायक नकार ज्यास शीर्षक प्रसंग किंवा टायटल इन्सिडंट असेही म्हणता येईल.

पुढे अपेक्षेप्रमाणेच संचालक मंडळी आर्थिक घोटाळ्याचा आरोप करीत चौधरींना न्यायालयात खेचतात. खटल्यातील सर्व पैलूंवर नजर टाकल्यावर चौधरींनी कुठलाही आर्थिक गैरव्यवहार केल्याचे न्यायालय अमान्य करते. परंतु त्यांनी कंपनीकडून घेतलेली वीस लाख रुपयांची रक्कम दहा दिवसात कंपनीस परत करणेही तितकेच गरजेचे असून त्यांनी तसे न केल्यास त्यांची सर्व मालमत्ता जप्त करून तिचा लिलाव करून येणाऱ्या रकमेतून हे वीस लाख रुपये कंपनीस देण्यात यावेत असा स्पष्ट आदेश न्यायालयाकडून दिला जातो.

दिवस पुढे सरकत असतात आणि अमरला राजसिंह किंवा रक्कम याविषयी काहीच ठोस माहिती हाती येत नाही. परंतु एक चाल म्हणून अमर आपणांस मुख्य गुन्हेगाराविषयी खात्रीशीर माहिती झाली असून लवकरच तो जेरबंद होईल असे पत्रकार परिषदेत जाहीर करतो. ही माहिती आणि ज्या पिशवीतून रक्कम पोचविली गेलेली असते तिचे छायाचित्र वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते. वर्तमानपत्रे वाचून गोंधळलेला राजसिंह उलटसुलट हालचाली करू लागतो. सर्वप्रथम तो ती पिशवी कचऱ्या त टाकतो आणि दुसऱ्याच पेटीत रक्कम ठेवतो. कचरा जाळला गेल्यावर तेथे पिवळा धूर दिसताच त्या ठिकाणी अमर पोचतो आणि सापळा रचतो. संशयास्पद हालचाली करणारा राजसिंह पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात येतो. त्यानंतर अगदी व्यवस्थित योजना आखून राजसिंहला त्याच्या जुन्या जागी येण्यास अमर भाग पाडतो आणि तेथेच तुफान संघर्ष होऊन राजसिंह मारला जातो. रक्कम अमरच्या ताब्यात येते.

रक्कम घेऊन अमर हरिदास चौधरींच्या बंगल्यावर पोचतो तेव्हा जप्ती होऊन लिलाव प्रक्रिया चालू झालेली असते. अनेक मौल्यवान वस्तूंची विक्री झालेली असली तरीही बंगला लिलावापासून वाचविण्यात आणि तो पुन्हा चौधरींच्या ताब्यात देण्यात अमर यशस्वी होतो. दरम्यानच्या काळात आपल्या बहिणीवर प्रेम करणारा पोलिस अधिकारी हा अमरच असल्याचे चौधरींना समजलेले असते. भूतकाळात घडलेल्या त्या प्रकाराबाबत ते अमरची क्षमा मागून अमर व गीताच्या विवाहाची निश्चिती करतात.

हरिदास चौधरी - चित्रपटाच्या कथेतले एक प्रमुख पात्र. हा काही कुणी संत महात्मा नाहीये. आपण कमावत असलेली दौलत ही आपल्याकरिता, आपल्या कुटुंबाकरिता आपण कमावत आहोत हे त्याला पक्के ठाऊक आहे. ती काही समाजावर उधळा असा संदेश तो किंवा त्याच्यामार्फत दिग्दर्शक जनतेला नक्कीच देत नाहीये आणि म्हणूनच हरिदास सुरुवातीला वाहनचालकाच्या मुलाला सोडविण्याकरिता वीस लाख रुपये देण्यात फारसा रस दाखवीत नाही. त्याचप्रमाणे या हरिदास चौधरीला श्रीमंतीत जगण्यापेक्षा गरिबीत जगणे अवघड आहे हे देखील चांगलेच ठाऊक आहे. त्यामुळेच तो बहिणीला पोलिस अधिकाऱ्यांसोबत विवाह करू देत नाही. पण त्याचवेळी आपले काम प्रामाणिक पणे करीत राहा हा संदेश देतो. सुरुवातीला बुटाचा दर्जा घसरविण्यास नकार देऊन आणि शेवटी संचालक मंडळाच्या मानहानिकारक रबरी शिक्क्याच्या प्रस्तावास देखील नकार देऊन. मुख्य म्हणजे तो आपले मूळचे जुने काम विसरलेलाही नाहीये हे चामडी पिशवीत कॅप्सूल लपविण्याच्या प्रसंगातून दिसून येते. आपल्या या अंगभूत कौशल्यामुळेच वेळ पडल्यास आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मानहानी करून घेत जगण्यापेक्षा पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची त्याची तयारी आहे.

पस्तीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचे नाव ऐकल्यावर त्यावेळी जन्माला देखील न आलेल्या व आज पंधरा ते पंचवीस वयोगटात असणाऱ्या महाविद्यालयीन युवकांना देखील हेलनवर चित्रित झालेले "मुंगळा मुंगळा" व कथेच्या दृष्टीने अजिबात महत्त्वाचे नसणारे हे गाणे (आजच्या भाषेत आयटम सॉंग) लगेचच आठवते. परंतु चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा ऐन तारुण्यात असणाऱ्या व आता पन्नाशीच्या घरात असणाऱ्या. मंडळींनाही चित्रपटातला शीर्षक प्रसंग आठवत नाही हे चित्रपटाचे यश की अपयश? चित्रपटातला कुठला भाग आपण पुढच्या पिढीतल्या मंडळींपर्यंत पोचवला? मुंगळा गाणे न चुकता अजूनही गणेश मिरवणुकीत वाजत नसते. हरिदास चौधरीचा नकार कुठल्या कुठे विरून गेलाय. आज समाजात विविध पदांवर राहून जी मंडळी अब्जावधी रकमेचे आर्थिक घोटाळे करीत आहेत आणि तरी देखील त्यांच्या जागेवर ती टिकून आहेत कारण त्यांच्या सोबत कुणीतरी जनमानसात चांगली प्रतिमा असलेले आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे आहे म्हणूनच.

तुमच्या कृष्णकृत्यांना झाकण्याकरिता माझ्या उजळ प्रतिमेचा वापर करण्यास मी नकार देतोय हे ठणकावून सांगणे का जमत नाहीये कुणालाच? चित्रपटातल्या हरिदास चौधरीवर तर असा नकार दिल्यामुळे कंगाल व्हायची वेळ येत होती. आजच्या काळात तर केवळ पद सोडावे लागेल या भीतीने भ्रष्टाचारी मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणारे उजळ प्रतिमेचे पंतप्रधान देखील असा नकार देऊ शकत नाही हे पाहून सखेद आश्चर्य वाटते. महाभारतातल्या युधिष्ठिराने आपल्या सत्यवचनी प्रतिमेचा वापर पांडवांची खोटी बाजू झाकण्याकरिता एकदा करू दिला होता, पण त्याच्या या उदाहरणाचा दाखला देत आजचे तथाकथित धर्मराज युधिष्ठिर कायमच "नरो वा कुंजरो वा" अशी भूमिका घेऊ लागले आहेत. आता या देशाला परत एखादा हरिदास चौधरी भेटणार का? की असे लेख लिहून आणि वाचून "हरिदासाची कथा मूळ पदावर" हेच आपण म्हणत राहणार?

समस्या आणि उपाय भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक

आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात.  या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.

भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक


प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणुका घेतल्या जातात.   त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.

  1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असे बिरुद मिरविणार्‍या आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद असे नाव लावणार्‍या संस्थेमार्फत आयोजित केल्या जाणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणूकीत मतदान करण्याचा अधिकार अगदी मोजक्याच (संख्येने फक्त काही शेकड्यात असणार्‍या) मतदारांना का? जेव्हा की मराठी साहित्याच्या वाचकांची संख्या किमान दोन कोटी तरी असणार.  मग अशा अत्यल्प मतदारांनी निवडलेल्या साहित्यिकास अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष मानणे योग्य ठरेल का?
  2. कोणाला मतदानाचा अधिकार द्यावा आणि कोणाला नाही हा जर संस्थेचा अधिकार असेल आणि संस्था शासकीय नसल्या कारणाने संस्थेचा हा अधिकार अबाधित असेल तर शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  3. संमेलनात राजकीय व्यक्तींना बोलवून व्यासपीठावर भाषण करू द्यावे का? आणि जर राजकीय व्यक्तींना बोलविले नाही तर पुन्हा तोच प्रश्न की, शासकीय अनुदानावर ह्या संमेलनाचा खर्च करावा का?
  4. शासकीय अनुदान टाळावे तर खासगी प्रायोजकांकडून खर्चाचा भार उचलायला हवा.  तसे केले तर त्यांच्या उत्पादनाच्या जाहिरातींनी संमेलनाचे मंडप सजवायला हवे.  या प्रकारच्या आयोजनालाही अनेक जण नापसंती दर्शवितात.  गुटखा, मद्य आदींच्या जाहिराती नक्कीच आक्षेपार्ह ठरतात.

या सर्व समस्या टाळायच्या असतील खाली दिल्याप्रमाणे एक साधा उपाय अमलात आणावा

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकी करिता कुणालाही (हो.. अगदी कुणालाही) उभे राहू द्यावे.  दिलेल्या मुदतीत जितके इच्छुक आपले अर्ज सादर करतील त्या सर्वांची यादी बनवावी.  या इच्छुक उमेदवारांपैकी प्रत्येकाच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने राष्ट्रीयीकृत बँकेत एक एक स्वतंत्र खाती उघडावीत.  त्यानंतर वर्तमानपत्र, दूरचित्रवाणी व आकाशवाणी वाहिन्या आणि महाजालावरील संकेतस्थळे या सर्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वसामान्य जनतेला आवाहन करावे की, त्यांना इच्छुक उमेदवारांपैकी ज्या उमेदवाराला संमेलनाध्यक्ष म्हणून निवडून द्यायचे आहे त्या उमेदवाराच्या नावाने अ.भा.म.सा.प. ने उघडून दिलेल्या बँक खात्यात यथाशक्ती रक्कम (केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच) तीस दिवसांच्या आत जमा करावी. 

अशा प्रकारे ज्या उमेदवारास वाचकपसंती जास्त असेल त्याच्या खात्यात तीस दिवसांनंतर कमाल रक्कम जमा होईल आणि तोच संमेलनाध्यक्ष म्हणून घोषित केला जाईल.  तसेच त्याच्या निवडीबाबत कोणासही आक्षेप राहणार नाहीत.  त्याचप्रमाणे रक्कम केवळ धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीनेच जमा होत असल्याने यात काळे  धन जमा होणार नाही.  सर्व इच्छुक उमेदवारांच्या खात्यात जमा होणारी रक्कम अ.भा.म.सा.प. द्वारे एकत्रित केली जाऊन संमेलनास होणारा खर्च त्यातून परस्पर भागविता येईल. 

Saturday, 7 March 2015

बळी, गुन्हेगार, रक्षक आणि इतर

निर्भया बलात्कार व हत्याकांड प्रकरणातील आरोपी मुकेश सिंह याच्या वक्तव्याचा समावेश असलेला लघुपट 'इंडियाज डॉटर' बीबीसी तर्फे प्रसारित झाला आणि देशभरात मोठी खळबळ माजली.  त्याच्या वक्तव्यामुळे भारताची मान खाली गेली वगैरे असेही मत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होऊ लागले.  मुकेश सिंहचे  "रात्री अपरात्री निर्जन स्थळी बाहेर पडणारी स्त्री बलात्कारपात्र आहे" हे मत त्याचे वैयक्तिक मत आहे.   त्याचे हे मत व्यक्त झाल्याने भारतातील १३० कोटी जनतेची मान खाली कशी जाऊ शकते? यावर अनेकांनी असाही युक्तिवाद केला की मुकेश सिंहचे मत ही बहुसंख्य भारतीय पुरुषांची मानसिकता आहे.   अनेक पुरुषही असेच महिला रात्र बेरात्र बाहेर फिरल्याने,  त्यांच्या तोकड्या कपड्यांमुळे त्यांच्यावर बलात्कार होतात असे आक्षेप घेतात त्यामुळे त्या तमाम पुरुषांना आणि आरोपी मुकेश सिंह याला एकाच तराजूत तोलले गेले.   हे असे तोलणाऱ्यांनी मूलभूत फरक लक्षातच घेतलेला दिसत नाही.  

कुठलाही गुन्हा घडतो तेव्हा त्या अनुषंगाने आपण व्यक्तिंची चार प्रकारच्या घटकांमध्ये वर्गवारी करू शकतो.
बळीः- ज्या व्यक्तीसोबत गुन्हा घडला आहे व त्यामुळे तिचे काही नुकसान झाले आहे.
गुन्हेगार:- ज्या व्यक्तीने स्वतःच्या फायद्याकरिता किंवा फायदा नसतानाही विकृत विचारसरणीमुळे बळीचे नुकसान घडवून आणले आहे.
रक्षकः- ज्या व्यक्तीने गुन्हेगाराला गुन्हा घडविण्यापासून आणि बळीला नुकसान होण्यापासून रोखले आहे किंवा तसा प्रयत्न केला आहे.
इतरः- या मध्ये उरलेले सर्व येतात.  ते गुन्हा घडतानाचे मूक साक्षीदार असू शकतील.  तिथे उपस्थित नसणारे बळीच्या नात्यातले / मित्रपरिवारातले किंवा तसे नसतानाही पण बळीविषयी कळकळ असणारे, किंवा या सर्वांशी काहीच संबंध नसणारे इतर त्रयस्थ नागरिक हे सर्व या चौथ्या घटकात येतात.  

आता काही काळ बलात्कार हा गुन्हा बाजूला ठेवू.   इतर कुठल्याही दुसऱ्या गुन्ह्याचा विचार करू, जसे की चोरी.  

एका व्यक्तीच्या स्कूटरच्या डिकीतून एक लाख रुपये चोरी झालेत.   आता या प्रकरणात चोर हा गुन्हेगार.   ज्याच्या डिकीतून रक्कम चोरी झाली ती व्यक्ती बळी.   ती व्यक्ती पोलिसांकडे तक्रार नोंदवायला गेली म्हणजे पोलीस झाले रक्षक आणि उरलेल्या इतरांमध्ये त्या व्यक्तीचे काही हितचिंतक - जसे की त्या व्यक्तीचे सहकारी, नातेवाईक, मित्र इत्यादी.   याशिवाय इतर त्रयस्थ म्हणून आपण ही बातमी वर्तमानपत्रात वाचणारे वाचक यांना धरूयात.   आता सर्वांच्या या घटनेवर प्रतिक्रिया काय असतील ते बघूयात.

इतर त्रयस्थ वाचक वगैरे मंडळी मनात किंवा उघड एकमेकांशी म्हणतील -  "काय माणूस आहे? स्कूटरच्या डिकीत एवढी रक्कम ठेवून स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी केलीच कशी काय?  "  गंमत म्हणजे साधारण याच आशयाचे वक्तव्य त्या व्यक्तीशी त्याचे नातेवाईक, सहकारी, मित्र आणि अगदी तक्रार नोंदवून घेणारे पोलिस देखील करतील.

समजा घटनेतला चोर सापडला तर तोही असेच सांगेल की "स्कूटर बाहेर रस्त्यावर उभी होती.   डिकीचे झाकण फारच सहज उघडता आले आणि आतली रक्कम पाहून मला मोह झाला व मी चोरी केली.   तशी बँकेतली सुरक्षित रक्कम सहजासहजी लुटायचे माझे धाडस होणार नाही पण हे कृत्य फारच सोपे व सहजसाध्य होते म्हणून मी केले.  "

तसे पाहता बँकेतली सुरक्षित म्हणविल्या जाणाऱ्या अभेद्य तिजोरीतली रक्कम देखील लुटली जातेच पण म्हणून स्कूटरमध्ये एक लाखाची रक्कम ठेवणाऱ्याचे समर्थन कसे होऊ शकेल.  तसेच बँकेतली रक्कम चोरणाऱ्याला  निश्चितच शिक्षा जास्त होणार कारण त्याच्या गुन्ह्यात बळजबरीने तोडफोड (रॉबरी विथ फोर्सफूल हाऊसब्रेकिंग)  झालेली असेल.   याउलट स्कूटरच्या डिकीतून रक्कम घेऊन पसार होणारा भुरटा चोर समजला जाईल.  

आता बलात्काराच्या घटनेत काय होते तर रक्षक जे सर्व वेळी सर्व ठिकाणी संरक्षण देऊ शकत नाहीत, इतर जण ज्यांना बळीविषयी आस्था आहे  असे सारे जण बळीला काळजी घ्यायला सांगतात.   बळी स्वतः ज्या ठिकाणी एकटी स्वतःचे संरक्षण करण्यास असमर्थ आहे तिला तिथे त्यावेळी एकटीला जाऊ नको असे सुचवितात.   घटनेतला गुन्हेगार पकडला जातो तेव्हा तोही असेच म्हणतो की त्या ठिकाणी त्या वेळी बळी मला सहज उपलब्ध होती म्हणून मी गुन्हा केला.   तसे पाहता बिहार, उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी घरात घुसून महिलांवर खुलेआम अत्याचार करणारे, तेवढी ताकद असणारे गुन्हेगार आहेतच की पण दिल्ली, मुंबई सारख्या ठिकाणी जिथे निवासी क्षेत्र बऱ्याच अंशी सुरक्षित आहे अशा शहरांत निर्जन स्थळी अवेळी एकट्या दुकट्या महिलेवर अत्याचार करणाऱ्या अशा गुन्हेगारांची मात्र त्या महिलेला घरात घुसून त्रास देण्याची क्षमता नक्कीच नसते.  

प्रत्येक व्यक्तीकरिता काही क्षेत्र हे निश्चित सुरक्षित क्षेत्र (सेफ झोन) असते.   या क्षेत्राच्या बाहेर त्या व्यक्तिची सुरक्षितता अनिश्चित असते.   तेव्हा अशा असुरक्षित क्षेत्रात (अनसेफ झोन) जाऊ नये असा सल्ला देणारे हितचिंतक हे तो सल्ला काळजीच्या पोटी देतात तर बळी त्या क्षेत्रात सापडला म्हणून मी गुन्हा केला असे म्हणणारे गुन्हेगार हे स्वतःच्या बचावाच्या जाणिवेतून किंवा त्यांच्यात तेव्हा गुन्हा करण्याची इच्छा कशी झाली त्याचे स्पष्टीकरण देतेवेळी सांगतात पण या दोन्हींच्या उद्देशातला फरक कुणी समजून घेतच नाही.  

आता पुन्हा स्कूटरच्या डिकीतून लाख रुपयांच्या चोरीचे उदाहरण पाहू.   रक्षक व इतरांनी चोरी होण्याचे कारण हे रक्कम चोरास सहजसाध्य होती असे सांगितले.   चोराने देखील हेच सांगितले.   मग चोर, रक्षक व इतर एकाच मानसिकतेचे झालेत का?   बळीने इतरांना असे सांगावे का तुम्ही मला का सांगताय की मी रक्कम सहजसाध्य ठिकाणी ठेवू नये.   माझी स्कूटर आहे, माझी रक्कम आहे.   मला डिकीत ठेवायचे स्वातंत्र्य का नाही?   त्यापेक्षा तुम्ही चोरावर संस्कार करा की त्याने दुसऱ्याच्या वस्तुला हात लावू नये.   बळीने असे विधान केले तर ते किती हास्यास्पद ठरेल नाही का या घटनेमध्ये?

मग बलात्काराच्या घटनेमध्ये रक्षक व इतर जण जेव्हा आपुलकीपोटी महिलेला सांगतात की बाई तू रात्री बेरात्री एकटीदुकटी फिरू नको.   तर ती बळी ठरलेली किंवा संभाव्य बळी ठरू शकणारी इतर कोणतीही महिला लगेचच रक्षक व इतरेजनांनाही त्या गुन्हेगाराच्याच मानसिकतेचे ठरविते.   तुम्ही माझी काळजी करण्यापेक्षा,  मला रात्री बेरात्री फिरण्याचे,  आवडीचा पोशाख परिधान करण्याचे स्वातंत्र्य नाकारण्यापेक्षा त्या गुन्हेगाराला संस्कार द्या असे सांगते.

स्कूटरच्या डिकीतून रक्कम चोरी होण्याच्या प्रकरणात बळी हे मान्य करतो की रक्षक व इतरेजन हे आपल्याला सल्ला आपल्या आपुलकी पोटी देत आहेत.   ते व गुन्हेगार एका बाजूला नसून व ते आपल्या बाजूला आहेत व गुन्हेगार विरुद्ध बाजूला आहे.   फक्त प्रत्येकच ठिकाणी आपल्याला इतरांकडून संरक्षण मिळणे अशक्य आहे तेव्हा तिथे आपली आपणच काळजी घ्यायची आहे व जिथे ते शक्य नसेल ते क्षेत्र टाळायचे आहे.  

बलात्काराच्या घटनेमध्ये मात्र बळी फक्त महिलाच पडू शकतात आणि गुन्हेगार फक्त पुरूषच असू शकतात म्हणून त्या घटनेकडे एका बाजूला बळी + रक्षक + इतरेजन आणि विरुद्ध बाजूला गुन्हेगार असे सारासार न पाहता सरळ सरसकटीकरण करून एका बाजूला स्त्री (बळी व संभाव्य बळी) व विरुद्ध बाजूला पुरूष (गुन्हेगार व संभाव्य गुन्हेगार) इतक्या बेजबाबदारपणे पाहिले जाते.   स्त्रीला आपुलकीपोटी सल्ले देणाऱ्या प्रत्येक पुरुषाला संभाव्य गुन्हेगार समजले जाते.  आम्हाला आपुलकी दाखविण्याऐवजी गुन्हेगार पुरुषच आहे म्हणजे तुमच्याच गटातला आहे तेव्हा त्याला संस्कार द्या असे सांगणाऱ्या  महिलांना हा फरक ज्यादिवशी समजेल की सर्व पुरुष एकाच गटातले नसतात त्या दिवसापासून वेगळा महिला दिन करायची गरज पडणार नाही असे वाटते.

ता. क. :- बलात्कारासंबंधाने स्त्रियांच्या पोशाखाविषयी अभिप्राय व्यक्त करणाऱ्या पुरुषांना महिलांच्या संघटीत रोषास बळी पडावे लागले परंतु याच स्त्रियांना हे ठाऊक नाही काय की सिंधूताई सपकाळ या एका नामवंत महिलेनेच "आजच्या मुली असा पोशाख घालतील तर बलात्कार होणार नाहीत तर काय चमत्कार होतील काय?  मी या वयातही अशा प्रकारे लुगडे नेसते की माझी टाच देखील दिसत नाही" असे वक्तव्य एकदा नव्हे तर अनेकदा व तेही जाहीररीत्या केले आहे.  

बलात्काराला विरोध झाला नसता तर आम्ही तिचा खून केला नसता, तिने शांतपणे बलात्कार होऊ द्यायला हवा होता.   या मुकेश सिंहच्या वक्तव्याने तर आगीत तेल ओतले गेले.   प्रत्यक्षात हे प्रकरण झाल्यावर काहीच दिवसांत नेमके असेच वक्तव्य महिला शास्त्रज्ञ डॉ अनिता शुक्ला यांनी देखील केले होते तेव्हा त्यांच्यावर देखील टीका झाली होती.    कायदा सुव्यवस्था व व्यक्तिस्वातंत्र्याकरिता ज्याचे जगात आदराने  नाव घेतले जाते अशा अमेरिका ह्या देशांतही तुम्हाला शिकागोसारख्या शहरांत एखाद्या विशिष्ट वर्णाच्या गुन्हेगाराने अडविले तर आपल्या जवळील रक्कम, मौल्यवान वस्तू विनाप्रतिकार त्याच्या हवाली करा.   प्राणापेक्षा मौल्यवान काहीच नाही तेव्हा काहीशा किंमतीच्या वस्तूकरिता आपला जीव गमावू नका असा सल्ला आणि तोही तिथल्या पोलिसांकडून आजच्या काळातही दिला जातो.   या सल्ल्याविषयी कधी कुणी हरकत घेतल्याचे अथवा असा सल्ला देणारे गुन्हेगारांच्याच मानसिकतेचे असल्याचा आरोप केल्याचे  ऐकिवात नाही.  

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या दीपिका पदुकोणच्या माय चॉईस या व्हिडीओ विषयी:-

मी तो व्हिडीओ पाहिला. मला अर्धवट वाटला. तिने फक्त माय चॉईस काय आहे हे सांगितलंय. तो "चॉईस" बरा-वाईट जसा पण असेल तो निवडण्याच्या स्वातंत्र्याबद्दल मोठ्या गर्जना केल्या आहेत. परंतु तो पर्याय निवडल्यावर होणार्‍या परिणामांबद्दल काय? ती देखील तिचीच जबाबदारी आहे. आता तिने या व्हिडीओचा पुढचा भाग "इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी" या नावाने काढावा तरच संतुलन साधले जाईल. नाही तर कसंय ती कसेही कपडे घालणार, कुणाबरोबरही, कधीही XXX करणार, आणि काही बरंवाईट झालं तर मग मात्र संपूर्ण समाजाला दोष देणार हे काही पटत नाही.

दीपिकाचं ठीक आहे. ती सेलिब्रिटी आहे. ती तोकडे कपडे घालून समाजात बिनधास्त वावरू शकते कारण ती तिच्या महागड्या वातानुकूलित वाहनात बसून बंद काचाआड प्रवास करणार आहे. तिच्या सोबत तिच्या संरक्षणाकरिता तिचा वाहनचालक, व्यवस्थापक आणि अंगरक्षक देखील असतील. तिला कसला त्रास होणार देखील नाही. परंतु तिचं अंधानुकरण करण्याच्या नादात सामान्य तरूणी तसे कपडे घालून, उपनगरी रेल्वेतून फिरतील. तेव्हा त्यांना समाजकंटकांकडून त्रास झाला तर त्या स्वतःचा बचाव कसा करणार? उंच टाचेच्या पादत्राणांमुळे तर पळता देखील येणार नाही. अशा वेळी काही गैरप्रकार घडला तर समाजाला दोष द्यावा का? म्हणजे जर त्यामुळे काही गैरप्रकार घडला तर त्याचं समर्थन मी नक्कीच करत नाहीये. त्या महिलेशी त्यावेळी गैरवर्तन करणारा तो समाजकंटक दोषी आहेच पण त्या महिलेने त्या विशिष्ट समाजकंटकाविरोधात निश्चितच गुन्हा नोंदवावा आणि उचित कायदेशीर कारवाईची अपेक्षा करावी हे देखील रास्तच. परंतु संपूर्ण समाजाला दोष नक्कीच देऊ नये. आपल्या "चॉईस"चे परिणाम आपणच भोगावे लागतात, नव्हे ती आपली "रिस्पॉन्सिबिलिटी"च असते.

स्वातंत्र्याच्या हक्काच्या जाणीवेसोबतच जबाबदारीच्या कर्त्यव्याची जाणीव देखील असायलाच हवी.  या संदर्भात मुंबईतील एका मॉडेलचं उदाहरण इथे आवर्जून मांडावंसं वाटतं. तिने एका पोलिस उच्चाधिकार्‍यासमवेत संबंध ठेवलेत. त्याच्यासोबत कुठल्याशा सदनिकेवर अनेकदा गेली. त्याच्याकडून भेटीदेखील स्वीकारल्या. नंतर त्यांचं बिनसल्यावर मात्र तिने त्या संपूर्ण समाजाला किंवा पोलिस दलाला देखील दोष न देता केवळ त्या विशिष्ट पोलिस उच्चाधिकार्‍याविरोधात गुन्हा नोंदविला, पुरावे सादर केले आणि कायदेशीर कारवाईची मागणी केली. गैरप्रकारांना बळी पडणार्‍या स्त्रियांनी संपूर्ण समाजाला दोष देण्यापेक्षा अशा प्रकारे पावले उचलण्याची अपेक्षा आहे.

Friday, 9 January 2015

स्मरण विसंगती

काही काळापूर्वी एका आस्थापनेत प्रशिक्षण देण्याकरिता गेलो होतो.  प्रशिक्षणाचा विषय होता - समस्या सोडविण्याची तंत्रे (Problem Solving Techniques).  समोर बसलेल्या प्रशिक्षणार्थींना मी समस्या सोडविण्याचं माझं नेहमीचं तंत्र सांगत होतो.  गुंतागुंतीची क्लिष्ट अशी काही समस्या नसतेच मुळी.  असा काही असतो तो आपला तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन.  जगाच्या दृष्टीने अतिशय गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या समस्या केवळ काही सोप्या कल्पना वापरून सोडविल्या जाऊ शकतात (Complex Problems can be solved using simple ideas).  खरे तर व्यवहारातील अनेक समस्या या आपण कुठलेही उपाय वापरण्याआधीच सुटलेल्या असतात.  आपण त्यांच्यापाशी अडखळलो तर मात्र त्या सुटता सुटत नाहीत.  जसे की, रस्त्यावर एखादा सहा इंच रुंद, सहा इंच खोल व रस्त्याच्या रुंदीइतका लांब असा खड्डा आहे.  आपण ताशी ८० किमी वेगाने वाहनातून त्या रस्त्यावरून जात असू आणि आपण तो खड्डा त्याच वेगात पार केला तर आपल्याला जाणवणार देखील नाही.  कारण खड्डा जिथे सुरू होतो व पुढे सहा इंचावर जिथे पुन्हा रस्ता सुरू होतो ते अंतर या ताशी किमी वेगाने जाताना चाकाला जाणवणार देखील नाही इतक्या तीव्रतेने पार होते.  पण आपण जर खड्डा पाहून आधीच आपले वाहन हळू केले आणि वेग ताशी ४० किमी पर्यंत कमी केला तर मात्र आपणाला हा खड्डा चांगलाच जाणवेल.  अशा वेळी खड्ड्याचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून आपल्याला वाहनाचा वेग अतिशय कमी (ताशी १५ किमी अथवा त्याहूनही कमी) करावा लागेल.  तरी देखील खड्डा जाणवणारच फक्त त्रास कमी होईल इतकेच.  त्यापेक्षा ८० किमी वेगाने चटकन निघून गेलेले कधीही जास्त सोयीस्कर नाही का? (अर्थात असा प्रयोग केवळ ६ इंच लांब व सहा इंच खोल किंवा त्यापेक्षा लहान खड्ड्यावरच करून पाहा.  गतिरोधकावर [Speed Breaker] नको हे सांगायला मी विसरलो नाही. )  हे म्हणजे १/१० सेकंदापेक्षाही कमी वेळ पाय टेकवत, चटका न बसता विस्तवावरून झरझर चालण्यासारखेच आहे.  त्याचप्रमाणे आपण आपल्या कृती वेगाने करीत गेलो तर लहानसहान समस्या जाणवत देखील नाहीत अशा पद्धतीने त्या सुटलेल्या असतात.  परंतु जर आपण बारीकसारीक गोष्टींचा विचार करीत बसलो तर मात्र समस्या जाणवतात आणि सोडवायलाही त्रास होतो.

प्रशिक्षणार्थींनी मला अशा प्रकारच्या व्यवहारातील एखाद्या समस्येचे उदाहरण मागितले.  हे उदाहरण मी अजून तासाभराने देईन असे मी त्यांना सांगितले. कदाचित प्रशिक्षणाच्या एक दिवसाच्या कालावधीत मी त्यांना उदाहरण देऊ शकलो नाही तर त्यांनी मला नंतर संपर्क साधावा, मी त्यांना उदाहरण पुन्हा कधीतरी देईन असेही सुचविले.  त्याकरिता मी सर्वांना माझे नाव आणि भ्रमणध्वनी क्रमांक देखील लिहून घेण्यास सुचविले.  प्रशिक्षणार्थींना ही बाब काहीशी विचित्र वाटली.  इतक्या क्षुल्लक बाबीकरिता मी त्यांना पुन्हा संपर्क साधायला का सांगतोय असा काहीसा आश्चर्याचा भाव त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

साधारण तासाभराने मी त्यांना स्मरणशक्तीच्या विसंगतीचे उदाहरण देऊन त्याची उकल करायला सांगितली.  ते थोडक्यात असे -  आपण कधी कुठल्या अनोळखी व्यक्तीसोबत नव्याने ओळख करून घेतली आणि त्यावेळी त्या व्यक्तीने आपल्याला तिचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक हे तपशील सांगितले तर नाव आपल्या लक्षात चटकन राहते तर भ्रमणध्वनी क्रमांक आठवणीत राहिलेला नसतो.  याच वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून सर्वांना मी माझे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक जो तासाभरापूर्वी सांगितला होता तो विचारला.  बहुतेकांना माझे नाव चटकन आठवले परंतु भ्रमणध्वनी क्रमांक डायरीत पाहून सांगावा लागला.  आता मी त्यांना ही समस्या अजूनच तपशिलात स्पष्ट करून सांगितली.  माझे नाव व क्रमांक त्यांच्या भ्रमणध्वनीवर अथवा डायरीत कशा पद्धतीने नोंद केला जातोय हे आधी फलकावर दाखविले.

Name     : CHETAN GUGALE
Number : 9552077615

म्हणजे नाव जिथे साठविले जात आहे तिथे १२ अक्षरे आहेत.  प्रत्येक अक्षर ए ते झेड या सव्वीस अक्षरांपैकी कुठले तरी एक आहे.  तरीही नाव चटकन लक्षात राहते तर क्रमांक जिथे साठविला जात आहे तिथे दहाच अंक आहेत आणि प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी कुठला तरी एक अंक असणार आहे तरी क्रमांक चटकन आठवत नाही.  असे का होत असावे?  साधा तर्क लावला तर सव्वीस अक्षरांपैकी प्रत्येक जागी एक अक्षर असे मिळून बारा अक्षरांचे नाव आडनाव आणि त्याच्या तुलनेत प्रत्येक अंकाच्या जागी ० ते ९ पैकी एक अंक असा दहा अंकी क्रमांक यात क्रमांक लक्षात ठेवणे जास्त सोयीचे पडावे परंतु तसे न होता नाव लक्षात राहते या समस्येची उकल कशी काय करावी?

खरे तर व्यवहारात आपल्याला कधी ही समस्या जाणवत देखील नाही.  नाव लक्षात ठेवणे आपल्याला जास्त गरजेचे असते व आपला मेंदू ते बरोबर करतो.  क्रमांक लक्षात ठेवणे इतके गरजेचे नसतेच.  संपर्क साधतेवेळी ते भ्रमणध्वनीच्या अथवा डायरीतील संपर्क नोंदीतून सहज शक्य होते.  म्हणजे ही एक समस्या आपल्या दैनंदिन कामकाजाच्या वेगात कधी आपल्याला जाणवतच नाही परंतु अगदी बारीक सारीक विचार करत आहोत तर जाणवू लागली आहे.  बरं आता जाणीव झाली तर हे असे का घडतेय याची उकल देखील लवकर होत नाही.  म्हणजेच ही बारीक समस्या विचारात घेतली तर त्रास देते, पण विचारात घेतलीच नाही तर काहीच त्रास नाही.

प्रशिक्षणार्थींना हे उदाहरण पटले, पण हे असे का घडते हे जाणून घेण्यास ते उत्सुक होते म्हणून मी त्यांना याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले ते असे -  प्रत्यक्षात नावाची बारा अक्षरे आपण डायरीत किंवा भ्रमणध्वनीच्या संपर्क यादीत नोंद करून ठेवत असलो तरी मेंदूत ती त्याप्रकारे साठविली जात नाहीत तर त्या अक्षरांपासून बनलेला संच अर्थात आपले नावच पूर्णतः साठवले जाते.  हे अक्षरांचे संच अर्थात नावे आपल्या परिचयाचीच असतात त्यामुळे ती चटकन साठविली जातात.  म्हणजे चेतन गुगळे हे नाव आणि आडनाव मिळून एका व्यक्तीचे पूर्णं नाव जरी आपण प्रथमच ऐकत असलो तरी हे नावांचे आणि आडनावांचे शब्द म्हणजेच अक्षरांचे संच आपण पूर्वी ऐकलेले असतात.  आता ते इथे आपण एका चेहऱ्याच्या प्रतिमेसोबत आपल्या मेंदूत साठवून ठेवतो.  क्रमांक साठवताना आपल्याला जरी दहा आकडे नोंद करून ठेवायचे इतके लहान काम दिसत असले तरी प्रत्यक्षात आपला मेंदू थेट एखादा आकडा साठवू शकत नाही त्याला त्या आकड्यांचा उच्चार साठवावा लागतो.  जसे की नऊ पाच पाच दोन शून्य सात सात सहा एक पाच.  म्हणजे तसे पाहायला गेले तर दहा आकडे लक्षात ठेवणे हे बारा अक्षरी नाव लक्षात ठेवण्यापेक्षा जास्त अवघड आहे.  शिवाय इथे कुठला परिचित संच देखील नाही.  तसा तो असता तर क्रमांक लक्षात ठेवणे देखील सोपे गेले असते जसे की ४४४४४४४४४४ हा आस्कमी चा संपर्क क्रमांक आहे हे आपल्याला एकदा वाचलं किंवा ऐकलं की लगेच आठवणीत राहतं कारण ते आपल्या मेंदूत दहा वेळा चार या संचाच्या स्वरूपात साठवलं जातं.

ही समस्या जितकी लहान होती तितकंच तिचं उत्तर देखील साधंसोपं होतं, पण आधी एक तर समस्या कधी जाणवलीच नव्हती आणि जेव्हा तिची जाणीव करून दिली गेली तेव्हा तिची उकल लवकर करता आली नाही.  जेव्हा मी ती करून दिली तेव्हा "हात्तिच्या! हे तर किती सोपं होतं" असं वाटून गेलं.  जीवनातल्या बहुतेक समस्या ह्या अशाच क्षुल्लक असतात.  एक तर सहसा त्या जाणवत देखील नाहीत इतक्या सहजतेने पार केल्या जातात आणि कधी आपण तिथे अडखळलोच तर मात्र फरशीवर समोर पडलेली सुई दिसू नये अशी डोक्याची अवस्था होऊन जाते.  अशा वेळी चित्त शांत ठेवून समस्येला लहान लहान घटकांमध्ये विभागून तिच्याकडे पाहिलं की ती किती साधी वाटू लागते आणि तितक्याच सरळ सोप्या उपायांनी तिची उकल कशी होते हे मी उर्वरित प्रशिक्षण सत्रात सांगितलं.  

Wednesday, 7 January 2015

पिंपरीची बस, प्रेमशास्त्र आणि मै प्रेम की दीवानी हूं।


१. पिंपरीची बस -  त्या काळी पुण्यात पीएमपीएमएल ऐवजी पिंपरी-चिंचवड (पीसीएमटी) व पुणे (पीएमटी) महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या बस सेवा होत्या.  कोणी कुठल्या भागात सेवा द्यायची याबद्दलचे काही नियम होते.  पुणे महानगरपालिकेच्या पुणेस्टेशन परिसरात पीसीएमटी ला प्रवासी भरण्यास मुभा होती परंतु पुणे मनपा परिसरात येथे पीसीएमटीला परवानगी नव्हती.  तसेच पीएमटीला निगडीच्या मुख्य चौकात तसेच पुढे जकातनाका, सोमाटणे फाटा, तळेगाव या भागापर्यंत प्रवासी वाहतुकीस परवानगी होती परंतु पिंपरी चिंचवड नवनगर (निगडी-प्राधिकरण), मासूळकर कॉलनी, पिंपरी गांव, वडगांव अशा काही भागांमध्ये पीएमटीला परवानगी नव्हती.  तिथे जायचे तर पीसीएमटीतूनच जावे लागे.  थोडक्यात काय तर तुमचे प्रवासाचे अंतिम इच्छित स्थळ काय असेल त्याप्रमाणे तुम्हाला पीएमटी की पीसीएमटी हा पर्याय निवडावा लागे.   तसेच पीएमटी व पीसीएमटी हे दोन्ही पर्याय देखील एकाच ठिकाणी उपलब्ध असतील असे नाही.  म्हणजे बघा, जर मी अहमदनगराहून एसटीचा प्रवास करून पुण्याला येत आहे तर ती एसटी बस पुण्यात पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर या दोन ठिकाणी थांबत असे.  जर मी शिवाजीनगर येथे उतरलो तर मग मला तिथून १.२५ किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने जाऊन मनपा भवन येथून निगडी करिता पीएमटी पकडावी लागे.  निगडी येथून प्राधिकरणातले माझे घर १.६ किमी अंतरावर, म्हणजे मला हे अंतर देखील पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करावे लागे.  दुसरा पर्याय असा की एसटी बस मधून पुणे स्टेशन येथे उतरून पाऊण किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलजवळून प्राधिकरणात जाणारी पीसीएमटी बस पकडणे.  तिथून पुन्हा अर्धा किमी अंतर पायी अथवा तीन आसनी रिक्षाने पार करून माझ्या घरी पोचता येई.  वरवर पाहता दुसरा पर्याय जास्त आकर्षक वाटत असला तरी त्यात काही अडचणी होत्या.  त्या अडचणींचे मूळ पिंपरी-चिंचवड परिवहन महामंडळ (पीसीएमटी) ची आर्थिक ताकद पुणे परिवहन महामंडळाच्या आर्थिक ताकदी पेक्षा कमी असण्यात होते.  पीसीएमटी कडे बसेसची कमतरता असल्यामुळे साधू वासवानी चौकात बसची वाट पाहण्यात फार वेळ जाई तसेच बसथांब्यावर उन्हाचा त्रास देखील जास्त होत असे.  याउलट पीएमटी कडे बसेसची विपुलता असल्याने मनपाभवन येथे पटापट बस मिळत असे.  अर्थात पीएमटीला प्रवाशांची गर्दी देखील बरीच जास्त असे.  तसेच पीएमटी बस प्रवासाच्या पर्यायात जास्त अंतर पायी चालावे लागत असल्याने (तीन आसनी रिक्षाचा खर्च परवडण्यासारखा नसे) आम्ही शक्यतो पीसीएमटीचाच पर्याय निवडत असू.

तर असाच मी एकदा मे १९८५ मध्ये अहमदनगराहून एसटीने प्रवास करून पुणे स्टेशन येथे उतरलो होतो.  तिथून पिंपरी चिंचवड नवनगरातल्या (निगडी-प्राधिकरण) आमच्या घरी येण्याकरिता स्थानिक बस धरण्याकरिता साधू वासवानी चौकातील शालीमार हॉटेलसमोर थांबलो होतो.   बराच वेळ वाट पाहूनही प्राधिकरणाची बस काही आली नव्हती.  दुपारच्या उन्हाचा फारच त्रास होऊ लागला होता.  शेजारीच एका झाडाच्या सावलीत पिंपरीगांवची दुमजली (डबलडेकर) बस थांबली होती.  बसथांब्यावरचे प्रवासी हळूहळू त्या बसमध्ये जाऊन बसू लागले.  मी देखील सावलीच्या आशेने त्या बसमध्ये खालच्या डेकवर एका चांगल्याशा आसनावर जाऊन बसलो.  थोड्या वेळाने वाहक (कंडक्टर) येऊन तिकिटाविषयी विचारणा करू लागला.  प्राधिकरणाला जाणारी बस अजूनही दिसत नसल्याने इतर अनेकांप्रमाणे मी देखील पिंपरीचे तिकीट काढले.  पाचच मिनिटांत बसथांब्यावर प्राधिकरणाची बस आली.  माझ्यासह अनेक प्रवासी पिंपरीगांवच्या बसमधून उतरून प्राधिकरणच्या दुमजली बसमध्ये शिरले.  आम्ही सर्वच प्रवासी वाहकाला पिंपरीपासून पुढे प्राधिकरणापर्यंतचे वाढीव तिकीट मागू लागलो.  यावर वाहकाने साफ नकार दिला.  त्याचे म्हणणे असे की, इथून जर या बसचे तिकीट हवे असेल तर पुणेस्टेशन ते प्राधिकरण असे संपूर्ण तिकीट घ्यावे लागेल शिवाय आधी काढलेले पुणेस्टेशन ते पिंपरी हे तिकीट देखील रद्द होणार नाहीच.  यावर सर्वच प्रवाशांनी आम्हाला प्राधिकरणातच जायचे होते परंतु बराच वेळ वाट पाहूनदेखील बस न आल्याने आम्ही पिंपरीगांवच्या बसमध्ये नाईलाजाने शिरल्याचे व पिंपरीचे तिकीट काढल्याचे सांगितले.  त्यावर वाहकाने हसत हसत ही वस्तुस्थिती त्यास ठाऊक असल्याचे सांगितले.  त्याने आम्हाला खुलासा केला तो असा की, पीसीएमटी प्रशासनाने पुणेस्टेशन ते प्राधिकरण आणि पुणेस्टेशन ते पिंपरीगाव अशा दोन दुमजली बसेस सुरू केल्या परंतु पिंपरीगावच्या बसला अजिबात प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद करायची वेळ आली होती.  याउलट प्राधिकरण च्या बसला बऱ्यापैकी प्रवासी प्रतिसाद होता.  याचे कारण असे की, पीएमटीची बस प्राधिकरणात जात नसल्याने प्राधिकरणातील प्रवाशांना पीसीएमटीखेरीज पर्यायच नव्हता.  परंतु पिंपरीगावच्या बसला प्रतिसाद मिळण्याचे असे काही कारण नव्हते.  एक तर पिंपरीगाव हे पिंपरी चौकापासून फार लांब नव्हते त्यामुळे तिथले प्रवासी पीएमटीने पिंपरीपर्यंत जात व तेथून पायी आपल्या इच्छित स्थळी जात.  शिवाय वाकडेवाडी, खडकी, दापोडी, कासारवाडी असे अधलेमधले प्रवासी देखील पीएमटीलाच आपली पसंती देत कारण पीएमटीच्या बसेसची असलेली विपुलता.  तर अशा प्रकारे पिंपरीगावच्या बसला असलेला तोकडा प्रवासी प्रतिसाद भरून काढण्यासाठी या वाहकांनी आधी पिंपरीगावची बस थांब्याजवळ आणून उभी केली आणि बराच वेळानंतर जेव्हा त्यात पुरेसे प्रवासी भरले गेले आणि त्यांची तिकिटेदेखील काढली गेली तेव्हा हळुच प्राधिकरणाची बस थांब्याजवळ आणली.  वाहकांच्या या खेळीमुळे आम्ही सर्व प्रवासी चिडलो आणि दोन्ही वाहकांशी वादविवाद करू लागलो तेव्हा त्यांनी आम्हाला समजावले की हे असे करावे लागणे हा त्यांचाही नाईलाज होता.  त्यामुळे आता ते दोन्ही बसेस सोबतच जाऊ देतील.  पिंपरी चौकात आम्ही उतरून बस बदलू शकतो व पुढे आम्हाला तिथून प्राधिकरणापर्यंतचे तिकीट घेऊन प्रवास करता येईल.  शेवटी चरफडत आम्ही सर्व प्रवासी पिंपरीगावच्या बसमध्ये बसलो आणि त्या वाहकांच्या योजनेप्रमाणे पिंपरी चौकात बस बदलून वाढीव तिकीट घेत प्रवास पूर्ण केला. 

******

२. प्रेमशास्त्र (१९७४) -  सागर (देव आनंद) एक लेखक असतो.  तो आपल्यापेक्षा वयाने जास्त असलेल्या नीलिमाच्या (बिंदू) प्रेमात पडून तिच्याशी लग्न करतो.  परंतु काही काळातच त्याचा भ्रमनिरास होतो.  त्या दोघांच्या जीवनपद्धती पूर्णतः वेगळ्या असल्याचे आणि त्यांचे सहजीवन यशस्वी होऊ शकत नसल्याचे त्याच्या लक्षात येते.  तो पत्नी पासून विभक्त होण्याचे ठरवतो.  त्यावर पत्नी त्याला सुचविते की लगेचच कायद्याने विभक्त व्हायची अशी काय गरज आहे?  आपल्या दोघांपैकी कुणाला एकालाही जर कधी तिसऱ्या कुणात रस वाटला तर आपण लगेच कायदेशीर घटस्फोट घेऊ आणि एकमेकांना मुक्त करू.  तोवर आपण समाजात दाखवायला पती-पत्नी म्हणून तरी वावरू शकतो.  सागरला हा प्रस्ताव मान्य होतो व त्याप्रमाणे तो नीलिमासोबत केवळ दिखावू कायदेशीर नाते चालू ठेवतो.  काही काळाने त्याच्या आयुष्यात त्याच्या पेक्षा बारा वर्षांनी लहान तरुणी बरखा (झीनत अमान) येते.  तो तिच्या प्रेमात पडतो.  तिच्याशी लग्न करायचे ठरवतो आणि त्याप्रमाणे स्वतःला मुक्त करून घेण्याकरिता पत्नी नीलिमाला विनंती करतो.  परंतु नीलिमा त्याला सांगते की बरखा ही तिची आधीच्या संबंधातून झालेली मुलगी आहे.  इतकेच नव्हे तर बरखाचा बाप हा सागर सख्खा मोठा भाऊ (अभि भट्टाचार्य) आहे.  तेव्हा सागरला कायद्यानुसार स्वतःच्या सावत्र मुली सोबत (जी नात्याने त्याची सख्खी पुतणीदेखील आहे) लग्न करता येणार नाही. 

ही वस्तुस्थिती ऐकून सागर अतिशय निराश होतो.  परंतु बरखावरील त्याचे प्रेम त्याला स्वस्थ बसू देत नाही.  आधी तो आपल्या मोठ्या भावाच्या पूर्वायुष्याविषयी माहिती घेतो आणि त्याला खात्री होते की बरखा ही त्याच्या भावाची मुलगी नाही.  त्यामुळे बरखासोबत असलेले त्याचे काका-पुतणीचे नाते आपोआपच संपुष्टात येऊन लग्नातला एक मोठा कायदेशीर अडथळा दूर होतो.  आता लग्नातला दुसरा मोठा अडथळा असतो तो म्हणजे नीलिमा सागरला त्या दोघांच्या विवाहबंधनातून मुक्त करायला तयार नसते आणि तिसरा अजून एक अडथळा असतो तो म्हणजे बरखाचे नीलिमासोबत असलेले मुलगी-आई हे नाते.  बरखाची आई असल्याने नीलिमा ह्या विवाहाला संमती देत नसते.  तेव्हा बरखाचा बाप कोण आहे व त्याची संमती आपण मिळवू या दिशेने शोध घेत असता सागरला आढळते की बरखाचा बाप म्हणजे नीलिमाचा पूर्व पती (रेहमान) याने नीलिमाला कधीच घटस्फोट दिलेला नसतो.  फक्त त्यांच्यातील मतभेदांमुळे ते एकमेकांपासून दूर राहत असतात.    त्याचप्रमाणे नीलिमाने बरखाला लहानपणीच शालेय शिक्षणाकरिता स्वतःपासून दूर ठेवलेले असते.  तेव्हा नीलिमाच्या नकळत बरखाचा पिता आपल्या खऱ्याखुऱ्या मुलीला स्वतःकडे घेऊन येतो आणि तिच्या जागी दुसऱ्याच मुलीला ठेवतो.  नीलिमा आपल्या मुलीला थेट मोठेपणीच पाहत असल्याने तिला हा बदल कळत नाही. 

सागर पुढे न्यायालयात हे सिद्ध करतो त्याला जिच्यासोबत लग्न करायचे आहे ती (झीनत अमान) ही नीलिमाची खरी मुलगी नसून खरी मुलगी (अंजू महेंद्रु) ही आहे.   तसेच नीलिमाचा पूर्वपतीपासून कधीच घटस्फोट झालेला नसल्याने सागर आणि नीलिमाचा विवाह हादेखील आपोआपच रद्द ठरतो.  अशा प्रकारे मार्गातले सर्व कायदेशीर अडथळे दूर होऊन सागर व बरखा एकत्र येतात.  दिग्दर्शक बी. आर. इशारा यांच्या दाव्यानुसार हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. 

*****

३. मै प्रेम की दीवानी हूं (२००३) - संजना (करीना कपूर) एक पदवीधर तरुणी.  तिची परदेशस्थ बहीण तिच्या आईवडीलांना (हिमानी शिवपुरी व पंकज कपूर) सुचविते की त्यांच्या माहितीतला एक तरुण प्रेम भारतात त्यांच्या गावी येणार आहे.  हा एक घरंदाज व श्रीमंत तरुण असल्याने त्याच्यासोबत संजनाचा विवाह जुळविण्याकरिता प्रयत्न करावेत.  ठरल्याप्रमाणे प्रेम भारतात येतो.  तो संजनाच्या प्रेमात पडावा व त्याकरिता त्यांच्यात जवळीक व्हावी अशी पुरेपूर व्यवस्था संजनाची आई करते.  सुरुवातीला संजना प्रेम सोबत तुटक वागते.  परंतु जसजसे ते एकमेकांसोबत अधिक वेळ घालवतात तसतसे तिच्या लक्षात येते की ती त्याच्यात मनाने गुंतत जात आहे. 

पुन्हा काही दिवसांनी संजनाच्या बहिणीचा आईवडीलांना निरोप येतो की तिने सुचविलेला प्रेम म्हणजे प्रेम कुमार (अभिषेक बच्चन) भारतात पोचलेलाच नसतो तर त्याऐवजी त्यांचा एक सहाय्यक असलेला प्रेम किशन (हृतिक रोशन) भारतात आलेला असतो.  प्रेमकुमार आगामी काळात भारत येणार असतो.  यानंतर संजनाची आई आता प्रेम कुमारच्या आगमनाची प्रतीक्षा करू लागते.  तिला आता संजनाचा विवाह प्रेम किशन ऐवजी प्रेम कुमार सोबत जुळवायचा असतो.  यथावकाश प्रेम कुमारचे आगमन होते.  आधी जो सन्मान, आदर, जिव्हाळा संजनाच्या आईकडून प्रेम किशन ला मिळालेला असतो तो आता प्रेम कुमारला मिळू लागतो.  संजनाची आई पदोपदी प्रेम किशनचा अपमान करू लागते, त्याला फटकारते, संजनापासून दूर ठेवायचा प्रयत्न करते.  संजना व तिचे वडील हे सर्व पाहून व्यथित होतात परंतु असाहाय्यपणे पाहत बसण्याखेरीज काहीच करू शकत नाहीत.  तर भोळ्याभाबड्या प्रेमकिशनला हे समजतच नाही.  तो आपल्याच नादात असतो.  इकडे आईच्या योजनेप्रमाणे संजना आणि प्रेम कुमार हे एकमेकांच्या सहवासात येतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की त्या दोघांच्या आवडीनिवडी,  त्यांच्या आवडीनिवडी यांच्यात कमालीचे साम्य आहे.  यामुळे प्रेम कुमार ला संजना फारच आवडते.  परंतु संजनाची मोठीच अडचण होते कारण ती प्रेमकुमारला नकार देणार तरी कशी?  तो सर्वच दृष्टीने योग्य वर असतो आणि मुख्य म्हणजे तिला अगदी अनुरूप असतो प्रेम किशन पेक्षाही जास्त आणि तेही कैक पटीने.  पण... टाइमिंग हा घटक फार महत्त्वाचा.  प्रेम किशनचा प्रवेश आधी झालेला असतो आणि सर्वार्थाने तो संजनाच्या मनात वसू लागलेला असतो. 

जर प्रेम कुमार आधी प्रवेश करता तर किंवा अगदी एकाच वेळी प्रेमकुमार व प्रेमकिशन सामोरे आले असते तरीही प्रेमकुमारचीच निवड ठरलेली होती परंतु संजनाच्या जीवनात प्रेमकिशनचाच प्रवेश आधी झाला असल्याने प्रेमकुमार हा सर्वार्थाने बेटरचॉईस असला तरीही अंतर्मनाचा आवाज ऐकत संजना प्रेमकिशनलाच आपला जीवनसाथी म्हणून निवडते.   प्रेमकुमार हे समजून घेतो तर संजनाच्या आईला ही वस्तुस्थिती तिचे वडील समजावतात.     

*****

अनेकदा आपल्या आयुष्यात निर्णय घेईपर्यंत आपल्यासमोर दुसरा पर्याय नसतो परंतु एकदा निर्णय घेऊन झाल्यावर कधी कधी दुसरा आकर्षक पर्याय समोर येतो.  दरेक वेळी निर्णय घेऊन झाल्यावर तो पुन्हा बदलणे हे एका बसमध्ये घाईघाईने चढल्यावर दुसरी अधिक सोयीची बस दिसते आहे म्हणून पुन्हा तितक्याच घाईघाईने पहिल्या बस मधून उतरून दुसऱ्या बसमध्ये चढण्याइतके सहज सोपे नसते.  आपली बस चुकली हे मान्य करूनही निदान काही अंतर तरी चुकीच्या बसमधून प्रवास करीत पुढे जावे लागते.  पिंपरीगावची बस बदलून प्राधिकरणाची बस धरण्याच्या घटनेत हा कालावधी तासाभराचा असू शकतो तर प्रेमशास्त्र चित्रपटातील नायक सागरच्या आयुष्यात जोडीदार बदलण्याकरिता त्याला वाट पाहावी लागण्याच्या प्रसंगात हा कालावधी अनेक वर्षांचा देखील असतो.  याहून भिन्न म्हणजे आपली निवड सर्वोत्तम नसली तरीही जी निवड आता आपण केली आहे त्यात भावनिक गुंतवणूक असल्याने हीच निवड आपल्या आयुष्यभराकरिता आहे हे मानून अन्य पर्यायांचा विचारच बाजूला ठेवणे अशी वेळ देखील मै प्रेम की दीवानी हूं मध्ये दाखविले आहे त्याप्रमाणे होऊ शकते. 

शिवाय आपल्या आयुष्याची मर्यादा देखील आपल्या ह्या निर्णय बदलण्याच्या सवयीवर मोठा परिणाम करून जाते.  लहानपणी कपडेखरेदीला पालकांसोबत दुकानात गेलेली मुले आधी एक पोशाख पसंत करतात.  इतक्यात दुकानदाराने दुसरा आकर्षक पोशाख समोर आणला म्हणजे पहिला टाकून दुसरा निवडतात.  त्या टप्प्यापर्यंत ते ठीक देखील असते पण एकदा बिलाची रक्कम देऊन दुकानाबाहेर निघाल्यावर जर शोकेसमध्ये अजून कुठला आकर्षक पोषाख दिसला तर फक्त मनातल्या मनात कुढत बसण्याखेरीज काहीच करता येत नाही.  हॉटेलात गेल्यावर खाण्याचे मेन्यू किंवा आइसक्रीमचा फ्लेवर निवडतानाही असे अनेकदा होते पण त्यात फारशी हळहळ होत नाही कारण पोटात जागा असली तर आधीची निवड संपवून नवीन पर्याय देखील पुन्हा मागविता येतो, किंवा मग पुढच्या वेळी आपली ऑर्डर त्यानुसार नोंदविता येते.  पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना असाच गोंधळ उडतो.  दहावीनंतर बारावीला पीसीबी आणि पीसीएम दोन्ही ग्रुप असू द्यायचे.  आधी वैद्यकीय आणि अभियांत्रिकी यापैकी ज्या शाखेच्या प्रवेशाची प्रक्रिया आधी पार पाडली जाईल तिकडे प्रवेश घ्यायचा मग आपली आवड ज्यात असेल तिकडच्या प्रवेश प्रक्रियेत मनाजोगते काम झाले की आधीचा प्रवेश रद्द करायचा असा उपद्व्याप अनेक विद्यार्थी करत असतातच.  तसेच एखाद्या शाखेला प्रवेश घेतला आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यावसायिक संधी तिकडे कमी आढळल्या की पश्चात्ताप करणारेही अनेक जण भेटतात. 

पहिली कार / बाइक खरेदी करताना देखील अनेकांचा असाच गोंधळ उडतो.  अनेकदा आपण खरेदी केल्यावर आपल्याला आवडेल असे मॉडेल बाजारात येते.  जर एकच कंपनी असेल तर काहीवेळा अपग्रेड करून देतात देखील.  आम्ही १९८७ साली कायनेटिक होंडा ही स्कूटर खरेदी केली तेव्हा ती फक्त लाल व निळ्या ह्या दोनच रंगात उपलब्ध असल्याने आम्ही निळ्या रंगात घेतली.  पुढे सहा महिन्यात तिच्यात पांढरा व चंदेरी हे दोन पर्याय अजून उपलब्ध झाले.  आधीच्या ग्राहकांना कंपनीने फुकट रंग बदलून देण्याची सुविधा ठेवली म्हणून आम्ही ती पांढरी करून घेतली.  शिवाय नव्याने समाविष्ट झालेली साईडस्टँड सारखी अजून काही वैशिष्ट्ये देखील आम्हाला मिळाली.  अर्थात हे दरवेळी शक्य असतेच असे नाही.  आपले सध्याचे वाहन विकून पुन्हा नवीन विकत घेणे यात बराच आर्थिक तोटा होतो.  अनेकजण तर बुलेट घ्यायचे ठरवितात पण सध्या आर्थिक चणचण आहे तेव्हा गरज भागवायला दुसरी बाइक घेऊ आणि नंतर सावकाशीने बुलेट घ्यायचे स्वप्न बघतात.  त्यांच्या वापरातल्या दुचाकीची पुनर्विक्री किंमत झपाट्याने घसरते आणि बुलेटची किंमत तितक्याच वेगाने वर चढत जाते त्यामुळे त्यांचे बुलेट घ्यायचे स्वप्न हे स्वप्नच राहते. 

तरीही या सर्व गोष्टींमध्ये निर्णय बदलणे हे तुलनेने कमी त्रासदायक वाटावे असे काही निर्णय आयुष्यात कायमस्वरूपी होऊन जातात.  जसे की, करिअर.  अनेकांना घरच्या जबाबदारी मुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय अशा भरभरून उत्पन्न देणाऱ्या शाखांमध्ये शिक्षण घ्यावे लागते.  कालांतराने त्यांना आपल्या आतला एक कलाकार, लेखक, कवी, गायक टोचणी देत राहतो.  मग ती टोचणी तेवढीच तीव्र असेल तर सारे काही सोडून एखादा अभियंता चित्रपट दिग्दर्शक (रामगोपाल वर्मा) होतो.  एखादा डॉक्टर अभिनेता (श्रीराम लागू) किंवा गायक (पलाश सेन) होतो.  कुणी पूर्णवेळ लेखक तर कुणी निवेदक बनतात.  एखादा प्रशासकीय अधिकारी राजकारणी पुढारी (अरविंद केजरीवाल) बनतो.  प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही मग मी या प्रांताऐवजी त्या प्रांतात असतो तर यशस्वी बनलो असतो असे उसासे सोडले जातात.  याउलट काहींना जे बनायचे नसते ते नाईलाजास्तव बनावे लागते आणि तरीही ते अपेक्षेपेक्षा प्रचंड प्रमाणात यशस्वी होतात. 

तेव्हा आपल्या आयुष्यात योग्य तो निर्णय घेणे जमले नाही तरी आपण आयुष्याच्या कुठल्या टप्प्यावर आहोत हे पाहून निर्णय फिरविल्यास आपल्याला त्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल याचा अंदाज घेऊन आणि त्याची तुलना भावी फायद्यांसोबत करीत एकतर लवकरात लवकर निर्णय बदलावा अन्यथा आपली बस चुकली हे मान्य करून पुढचा प्रवास चालू ठेवावा हेच योग्य.  

Saturday, 15 November 2014

कुठल्याही आधाराशिवाय

१९९६ सालची हकीगत आहे.  मी कुस्रो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणे येथे विद्युत अभियांत्रिकीच्या पदविकेचा अभ्यासक्रम शिकत होतो.    शेवटचे सत्र सुरू होते आणि आम्हाला एक विषय निवडून त्यावर सेमिनार सादर करावयाचा होता.  त्या काळी ओव्हर हेड प्रोजेक्टर वर स्लाईडस दाखविण्याची पद्धत होती.  याकरिता ट्रान्स्परंट शीट (पॉलिथिन पासून बनलेल्या) विकत घेऊन त्यावर फोटोकॉपी करून घ्याव्या लागत.  याकरिता ट्रान्स्परंट शीट चे १० रुपये आणि त्यावर फोटोकॉपी करावयाचे ३ रुपये असा  प्रति शीट १३ रुपये खर्च येत होता.  सेमिनार अहवाल  (रिपोर्ट) संगणकावर टंकलिखित करून तो मुद्रित करण्याचा खर्च देखील प्रति पान १० रुपये इतका होता.  याशिवाय नंतर ही पाने गोल्डन एंबॉसिंग सह बाईंडिंग करावयाचा खर्च १०० रुपये अथवा अधिक असायचा.  अर्थात महाविद्यालयाकडून यापैकी कुठल्याही बाबीची सक्ती नव्हतीच.  आपला सेमिनार प्रभावी व्हावा तसेच त्याचा अहवाल देखील आकर्षक दिसावा म्हणून जवळपास सर्वच विद्यार्थी स्वतःच हौसेने इतका खर्च करीत असत.  काही जण तर ओव्हर हेड प्रोजेक्टर ऐवजी नव्यानेच आलेले इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्टर भाड्याने आणत व त्यावर स्थिरचित्रे तसेच चलचित्रे देखील दाखवीत.

माझी इतका खर्च करण्याची ऐपतही नव्हती आणि पसंतीदेखील नव्हती.  मी विषय निवडला - टेलिव्हिजन.  त्याकरिता १८५ रुपयांचे गुलाटींचे पुस्तक विकत घेतले.  दूरचित्रवाणी केंद्रावरून प्रसारण कसे होते आणि आपल्या कडील संचात त्याचे ग्रहण कसे होते याचा मुळातूनच अभ्यास केला.  स्वतः समजून घेतला म्हणजे तो विषय इतरांसमोर चांगल्या पद्धतीने मांडता येतो.  त्यानंतर एकही स्लाइड न बनविता केवळ फूटपट्टी व स्केचपेन्स च्या साहाय्याने काढलेली साध्या कागदावरील तीन रंगीत रेखाचित्रे समोर ठेवून मी सेमिनार सादर केला.  इतर विद्यार्थ्यांच्या सेमिनार मध्ये ओ एच पी स्लाईडस चा प्रचंड प्रमाणात वापर होता.  शिवाय त्यांच्या कॉम्प्युटर टाईप्ड - इंक जेट प्रिंटेड - गोल्डन एंबॉस्ड बाईंडिंग केलेल्या अहवालासमोर माझा स्वतःच्या हातांनी फॅसिट टाइपराइटरवर टाईप केलेला आणि ट्रान्स्परंट क्लिप फाइलमध्ये लावलेला अहवाल देखील साधा दिसत होता.  शिवाय मी कागद देखील इतरांप्रमाणे एक्झिक्युटिव्ह बॉण्ड न वापरता साधेच कॉपी पॉवर वाले वापरले होते.  असे असूनही आमच्या परीक्षकांना माझा सेमिनार व अहवाल प्रभावी नाही तरी परिणामकारक वाटला.  ६० विद्यार्थ्यांच्या वर्गात मला त्यांनी सर्वात जास्त गुण दिले.  प्रथम क्रमांकाचे पारितोषिक म्हणून मला रुपये अडीचशे रोख मिळालेत.  अहवाल टंकलेखन आणि गुलाटींच्या पुस्तकाची किंमत असा मी केलेला सर्व खर्च (जो इतर विद्यार्थ्यांनी केलेल्या खर्चाच्या तुलनेत नगण्य होता) वसूल झाला.

हा साधेपणा माझ्यात कुठून आला? तर शालेय पाठ्यपुस्तकांतून १ली ते ७ वी च्या भाषा विषयांत साध्या कथा व लेख असत.  तरीही ते समजण्याकरिता त्या सोबत चित्रे दिलेली असत.  आठवी पासून कुमारभारती च्या पुस्तकांत आशयघन वैचारिक लेख तसेच विचारप्रवर्तक कथा असत.  परंतु त्यांच्या पुष्ट्यर्थ कुठेही चित्रे दिलेली नसत कारण अशा दर्जेदार लिखाणाला अशा कुठल्याही बाह्य आधाराची गरज नसायची, मजकूरच पुरेसा परिणामकारक असे.

हा साधेपणा कुठे हरवत चालला आहे.  कलाकृतींच्या प्रदर्शनात साधेपणा असेल तर त्या प्रभावी वाटत नाहीत असे अनेकांना वाटते.  परंतु हे समजून घ्यायला हवे की कलाकृती प्रभावी हवी की परिणामकारक?  अनेकदा एखाद्या वक्त्याचे मोठे एखाद्या विषयावर आलंकारिक भाषेत मोठे प्रभावी भाषण होते पण त्याचा परिणाम काय होतो?  लोक त्याला चांगला हशा व टाळ्यांचा प्रतिसाद देतात पण त्या भाषणातील विचार किती अमलात आणतात?  करोडो रुपये खर्चून चित्रपट बनविले जातात, पण कथेतला आशय लोकांवर किती परिणाम करतो?  विनोदी चित्रपट व उपग्रह वाहिन्यांवरच्या कॉमेडी सर्कशी पाहताना तर हे फारच जाणवते.  विनोद करताना त्यांना कसरती कराव्या लागतात तरी पुन्हा मागून नकली हसू ऐकवावे लागते.  जर विनोदी संवाद आहे तर प्रेक्षक हसतीलच ना?  त्यांना हसा असे सुचविण्यासाठी नकली हसू भरायची गरज का लागते?  तसेच टाळ्यांचे.  गिव्ह हिम / हर अ बिग हॅंड हे वाक्य तर रिअलिटी शो मध्ये अनेक वेळा ऐकू येते.  अरेच्च्या!  कौतुकास्पद करामत असेल तर आपणहूनच टाळ्या वाजतील, मागणी का करावी लागतेय?

शाळेत असताना एक विनोद वाचलेला आठवतोय - एक विद्यार्थिनी चित्र काढते आणि शिक्षिकेला तपासण्यासाठी देते.  शिक्षिका विचारतात, कसलं चित्र आहे?  विद्यार्थिनी म्हणते - हत्तीचं. शिक्षिका उत्तरता - मग तसं बाजूला लिही ना की हे हत्तीचं चित्र आहे म्हणून.  मला कसं कळणार ते कसलं चित्र आहे?  थोडक्यात काय जर तुमची कलाकृती काय आहे, कशाबद्दल आहे हे रसिकांपर्यंत पोचवायला ती असमर्थ ठरत असेल तर तिला बाहेरून अशी वेगळी लेबले लावावी लागतात.  करोडो खर्चून चित्रपट बनवायचा, वर त्यातून आम्ही काय संदेश देतोय, तो किती चांगला आहे हे सांगायला देशातल्या विविध शहरांत त्याचे प्रमोशन करत फिरायचे हे कशासाठी?  चित्रपट बघितल्यावर कळेलच ना तो कसला संदेश देतोय ते?  त्याकरिता स्पॉटबॉयपासून निर्मात्यापर्यंत झाडून सर्वांनी मुलाखती देत का सुटायचे?

सध्या झी जिंदगी वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या साध्या परंतु आशयघन मालिका पाहताना आपल्या देशी कलाकृतींमधला फोलपणा प्रकर्षाने जाणवू लागलाय.  खोट्या डामडौलाच्या प्रभावातून बाहेर येऊन अशा कुठल्याही बाह्य आधाराशिवाय आंतरिक  साधेपणातील परिणामकारकता आपल्या देशातले कलाकार (खरेतर कलेचे सादरकर्ते व्यावसायिक) कधी समजून घेणार? 

Thursday, 11 September 2014

अपवादात्मक अपवाद

भारतीय समाजाने येथील मानवांची अलिखित आणि अनौपचारिक वर्गवारी केलेली आहे.  या वर्गवारीनुसार पुरुषांनी कसं वागावं, महिलांनी कसं वागावं, याचे काही एक नियम ठरून गेले आहेत.  महिला आणि पुरुषांमध्ये असणाऱ्या शारीरिक भेदांशिवाय त्यांच्या बौद्धिक आणि मानसिक क्षमतेतील फरकदेखील समाजाने ठरवून टाकला आहे.  या आखणीनुसार महिला व पुरुषांची कार्यक्षेत्रेही ठरली आहेत.  त्यानुसार ढोबळ मानाने घराच्या आतले कार्यक्षेत्र हे महिलांचे आणि घराबाहेरचे कार्यक्षेत्र ही विभागणी तर फारच जुनी आहे.  परंतु या नियमांना अपवाद म्हणून काही महिला या घराबाहेर देखील कार्यरत राहतील हे समाजाने मान्य केले आहे.  या अपवादांची देखील समाजाने पुन्हा वर्गवारी केली आहे.  त्यानुसार आर्थिकदृष्ट्या निम्नवर्गीय महिला या घरकाम अथवा लघु उद्योगातील कामगार म्हणून कार्यरत राहतील असे ठरले आहे.  प्लंबर, सुतार, लोहार (वेल्डर / फॅब्रिकेटर), रेल्वे स्थानकावरील हमाल, वाहन / मोबाईल / इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती कारागीर या खास पुरुष राखीव जागांवर चुकूनही महिला दिसणार नाहीत.  मुद्रण उद्योगात (छापखान्यात) महिला आहेत पण त्या कुठे? तर यंत्रावर पुरुषांनी मुद्रणाचे मुख्य काम केल्यावर मुद्रित कागदाच्या घड्या घालणे, पुस्तके चिटकविणे अशा कमी जोखमीच्या आणि अर्थातच कमी मोबदल्याच्या कामावर.  वर्तमानपत्र विक्रीतही घरोघरी दुचाकीवरून वर्तमानपत्रे पोचविण्याचे काम पुरुषांचे तर महिलांचे काम दुकानात एका जागी बसून विक्री करण्यापुरतेच मर्यादित.  रिक्षा, टेम्पो, ट्रक अशा व्यावसायिक वाहनांचे चालक देखील पुरुषच.  टॅक्सीचालक म्हणून आता काही प्रमाणात महिला पुढे येताहेत पण त्या देखील प्रियदर्शिनी सारख्या संस्थेच्या माध्यमातून, स्वतंत्र पणे नव्हे.  शिवाय त्यांचे प्रमाण देखील अत्यल्पच आहे.  खासगी वाहनांचे चालक या पदावरही अजूनही पुरुषांचेच साम्राज्य आहे.   

 आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गीय महिलांचे प्राधान्य अध्यापन, कला, सेवा क्षेत्रात राहील हे गृहीत धरले जाते.   उद्योग, अभियांत्रिकी, वैद्यकीय अर्थ, गुंतवणूक या क्षेत्रात जर महिला असल्याच तर त्यांच्यावर प्रामुख्याने कमी जबाबदारीचे अथवा दुय्यम श्रेणीचे काम राहील हे पाहिले गेले आहे. उदाहरणच घ्यायचे तर कार्यालयात पुरुष व्यवस्थापक तर महिला स्वागतिका, विमान सेवेत पुरुष वैमानिक तर महिला हवाई स्वागतिका, इस्पितळात पुरुष शल्य विशारद तर महिला परिचारिका अशा प्रकारे भूमिकांचे वाटप झाले आहे. 

उच्च आर्थिक गटातील महिलांची परिस्थिती काय आहे?  विविध उद्योगसंस्थांच्या मालक, संचालक या पदांवर महिला दिसतील.  राजकारणातही काही मोजक्या उच्च पदांवर महिला आहेत.  पण त्या तिथे का आहेत?  तर त्या एखाद्या घराण्याशी संबंधित आहेत म्हणून.  जसे की, कायनेटिक उद्योगसमूहाचे मालक श्री. अरुण फिरोदिया यांच्या कन्या सुलज्जा फिरोदिया-मोटवाणी.  पंडित नेहरूंच्या कन्या इंदिरा गांधी इत्यादी.   जर सुलज्जा व इंदिरा यांना सख्खे बंधू असते तर त्या आपल्या पित्याच्या वारसदार ठरल्या असत्या काय?  २०१४ लोकसभा निवडणूकीत मुंबईमध्ये एक अपवादात्मक चित्र दिसले.  सुनील दत्त व प्रमोद महाजन या दिवंगत राजकारण्यांच्या कन्या प्रिया व पूनम एकमेकींच्या विरोधात खासदारकीची निवडणूक लढवीत होत्या.  या घटनेत या दोघींनाही सख्खे भाऊ असतानादेखील आपापल्या पित्याचा वारसा या दोन्ही कन्यांकडे आला.  अर्थात या दोघींचे बंधू संजय दत्त व राहुल महाजन वैयक्तिक कारणांमुळे ही निवडणूक लढविण्यास असमर्थ असल्यानेच या दोघींना ही संधी मिळाली. 

अर्थात या सर्व व्यवस्थेला आव्हान देत अनेक मध्यम व उच्च मध्यम आर्थिक गटातील महिलांनी अभियांत्रिकी व वैद्यकीय क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने मोठमोठी पदे मिळविली आहेत.  तसेच उच्च आर्थिक गटात (कॉर्पोरेट विश्व) इंद्रा नूयी, चंदा कोचर अशा महिलांनी आपले स्थान पुरुषांच्या बरोबरीच्या पातळीवर आणले आहे.  इतके असले तरीही अजून लिमिटेड कंपन्यांपैकी ५५ टक्के कंपन्यांमध्ये (किमान एकतरी महिला संचालक नेमणे कायद्याने बंधनकारक असूनही) एकही महिला संचालक नाही ही बाब दुर्लक्षित करून चालणार नाही.   शिवाय मोठ्या पदांवर असणाऱ्या व संख्येने अत्यल्प अशा महिला या त्या ठिकाणी अपवादानेच आहेत हे देखील विविध नियतकालिकांतून लेखांद्वारे सातत्याने लोकांसमोर मांडण्यात येते जेणेकरून महिलांचे अशा स्थानी असणे सहजसाध्य नाही तर अतिशय जिकिरीचे आहे हे इतर महिलामनांवर बिंबविले जावे. 

कला विश्वातले महिलांचे स्थान काय आहे?  चित्रपट, नाट्य ही क्षेत्रे समाजाचा आरसा आहेत.  त्यामुळे अर्थातच त्यांच्या कथांमध्ये महिला व पुरुष पात्रांचे प्रमाण सारखेच असणार.  त्यामुळे अभिनय व गायन क्षेत्रात महिला व पुरुष यांचे प्रमाण सारखेच असणे नैसर्गिक आहे.  (अर्थात पूर्वीच्या काळी महिलांच्या भूमिका देखील पुरुषच करीत, त्यामुळे तिथेही महिलांचे प्रमाण कमीच होते पण आता ती परिस्थिती राहिली नाही. )  गायक व गायिकांचे आणि अभिनेते व अभिनेत्रींचे संख्यात्मक प्रमाण सारखे असले तरीही त्यांच्या दर्जात्मक प्रमाणातला फरक लक्षणीय आहे.  अभिनेत्यांची कारकीर्द तुलनेने प्रदीर्घ व आव्हानात्मक आहे तर अभिनेत्रींची कारकीर्द अल्प स्वल्प तसेच अभिनयाला फारसा वाव नसणारी आहे.  त्यांच्या मानधनातला फरकही लक्षणीय आहे.  गायक व गायिकांमध्ये असा फरक दिसून येत नाही.  किंबहुना तिथे प्रकार उलटाच आहे.    १९८० साली वयाच्या अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी मोहम्मद रफी आणि १९८७ साली वयाच्या अवघ्या अठ्ठावन्नाव्या वर्षी किशोर कुमारांचा मृत्यू झाला ही बाब लक्षात घेता आणि आघाडीच्या गायिका लता व आशा या तुलनेने दीर्घायुषी ठरल्या आहेत हे पाहता गायक व गायिकांची कारकीर्दीची तुलना करणे थोडे किचकट असले तरीही हे लक्षात घ्यावे लागेलच की आशा व लता या दोघींनी कुठल्याही पुरुष गायकापेक्षा अफाट संख्येने गाणी गायली आहेत.  या दोघींच्या जास्त गाण्यांमुळेही पुन्हा महिला पुरुष असमानताच सिद्ध होते आणि तीदेखील गायनक्षेत्रातली नव्हे तर अभिनय क्षेत्रातली.  लता व आशा यांना पुरुष गायकांपेक्षा जास्त गाणी मिळण्याचे कारण -
  1. चित्रपटात नायिकेलाच नाचगाण्याला जास्त वाव असतो. नायक तुलनेने महत्त्वाचे असे म्हणजे शौर्य, धाडस, पराक्रम, बौद्धिक कसोटी यात व्यग्र असतो.
  2. नायिका कुणीही असली तरीही तिला कुठलाही कॉमन आवाज चालतो.  फार तर सोज्वळ गाण्यांकरिता लता आणि कॅब्रे, इत्यादी बोल्ड गाण्यांकरिता आशा अशी विभागणी पुरेशी आहे हा चित्रपटकर्त्यांचा दृष्टिकोन.  याउलट नायक कोण आहे? त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा बाज काय आहे? हे नीट विचारात घेऊन त्यानुसार त्याकरिता गायकाचे नियोजन.  जसे की देव आनंद व राजेश खन्ना करिता किशोर कुमार, दिलीपकुमार व शम्मी कपूर करिता मोहम्मद रफी,  राज कपूर व मनोज कुमार करिता मुकेश ही विभागणी पुरुष गायकांना कमी काम मिळवून देणारी असली तरीही पुरुष अभिनेत्यांचे महत्त्व वाढविणारीच ठरते नाही काय?
याशिवाय कला प्रांतातील महिलांच्या बाबतीत असणारे विविध प्रवाद.  त्या स्वतःच्या क्षमतेवर किती आणि पुरुषांचा शिडी सारखा वापर करून किती वरपर्यंत चढल्यात याबाबत चर्चिले जाणारे किस्से.  या व्यवस्थेलाही तोंड देत एखादी महिला अगदी उघडपणे व निःसंशय स्वतःच्या मेहनतीच्याच जोरावर यशशिखरावर विराजमान झाली असेल आणि उणीव दाखवावी असे तिच्यात शोधूनही सापडण्यासारखे दूरान्वयानेही काही नसेल तर तिला लगेच  वेगळ्याच कोंदणात बसविले जाते.  मग ती सर्वांचीच ताई, माई, अक्का असल्याचा तिच्यावर शिक्का बसतो.  ती कोणाची प्रेयसी, कोणाची मैत्रीण देखील होऊ शकत नाही.  एका वेगळ्याच गंभीर नजरेने तिच्याकडे पाहिले जाते.  याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लता मंगेशकर.  त्यांच्या पिढीतील, पुढच्या आणि त्याही पुढच्या पिढीतील सर्वच जण त्यांचा दीदी म्हणूनच उल्लेख करतात.  त्यामुळेच जेव्हा त्यांच्या एका वाढदिवसाच्या जाहीर समारंभात सोनू निगमने "मी थोडा आधी जन्माला आलो असतो किंवा लताजी थोड्या उशीराने जन्माला आल्या असत्या तर मी त्यांना विवाहाकरिता मागणी घातली असती." असे विधान केले तेव्हा ते अनेकांना खटकले.  सोनू निगमांवर टीकाही झाली.  खरे पाहता सोनूने लताजींकडे पाहण्याच्या समाजाच्या चाकोरीबद्ध नजरेची कोंडी फोडली असेच म्हणावे लागेल.  परंतु आपल्या समाजाने अपवादांचीही वर्गवारी केली असल्याने सोनूचे विधान समाजाच्या पचनी पडले नाहीच.  

अपवादांची वर्गवारी करण्याची समाजाची सवय तशी फारच जुनी.  महिला शक्यतो घरातच राहणार.  घराबाहेर पडल्या तरीही त्यांच्यावर तसा प्रसंग आला तरच.  म्हणजे झाशीची राणी ही शूर लढवय्यी असे आपण म्हणतो पण ती तशी का? तर तिचे पती गंगाधरपंत (जे तिच्याहून चाळीस एक वर्षांनी मोठे) यांच्या मृत्यूनंतर तिला अकाली वैधव्य आल्यावर राज्याचे रक्षण करण्याकरिता.  कारण तिचा पुनर्विवाह होऊन तिच्या नव्या पतीला राज्याचा रक्षणकर्ता बनण्याची संधी देणंही परंपरेला मंजूर नाहीच.  त्यापेक्षा अपवाद म्हणून तिलाच रणरागिणी बनविणं समाजाला जास्त सोयीस्कर आणि म्हणूनच राणीला श्रेयस्कर.  पण या श्रेयाची धनीण होताना राणीला वयाच्या बाविशीतच मृत्यूला सामोरं जावं लागून फार मोठी किंमत चुकवावी लागली हे कोणी ध्यानात घेत नाही.  [काव्यात्म न्याय / योगायोग म्हणजे उपग्रह वाहिनीवरील मालिकेत झाशीच्या राणीची भूमिका करून लोकप्रिय झालेल्या कृत्तिका सेनगर हिनेच पुढे पुनर्विवाह या मालिकेत महिलेच्या पुनर्विवाहाचा मुद्दाही ऐरणीवर आणण्यात मुख्य भूमिका निभावली.]  असो. तर झाशीच्या राणीचे शौर्य हे अपवादच होते असे समजणाऱ्या समाजाच्या मानसिकतेचे पुरावे म्हणजे झाशीच्या राणीच्या इतिहासोत्तर काळात जन्माला आलेल्या मुलींनाही घोडसवारीचे प्रशिक्षण दिले जात नसे.  अगदी त्यापुढील काळातही किती जणी सायकली अथवा स्वयंचलित दुचाकी चालवीत असत?  सुनीताबाई देशपांडे चारचाकी मोटार चालवीत आणि भाई चालकाच्या बाजूला बसत.  एकदा सुनीताबाई रस्त्याने अशाच गाडी चालवीत असताना दोन मुले रस्त्यात दिसली.  त्यातल्या एकाने दुसऱ्याला सांगितले - अरे बाई गाडी चालवतीये, बाजूला हो नाहीतर अपघातात सापडशील.  त्यावर दुसरा पहिल्याला म्हणाला - काळजी करू नकोस शेजारी बाप्या बसलाय ना. तोच काळजी घेईल अपघात होणार नाही याची.  आयुष्यात कधीही वाहनाचे सुकाणूचक्र न धरलेल्या भाईच्या केवळ शेजारी असल्यामुळे रस्त्यावरील मुलांना हायसे वाटावे आणि त्यापुढे सुनीताबाईंच्या वाहन चालविण्याच्या अफाट कौशल्याचा काडीचाही प्रभाव पडू नये याचे सुनीताबाईंना मोठे वैषम्य वाटले.  पण सामाजिक वर्गवारीने पुरुष व महिलांची कार्यक्षेत्रे ठरविली त्याला सुनीताबाई किंवा रस्त्यावरची ती मुले तरी काय करणार? 

पुढे महिला दुचाकी वाहने चालवू लागल्या तरी कोणती? तर स्कूटर किंवा मोपेड यांसारखी.  एखादी महिला मोटरबाईकसारखे वाहन चालविते असे सत्तर ऐंशीच्या दशकांतील चित्रपटांतून दाखवायला सुरुवात झाली.  अशी वाहने चालविणारी महिला पुरुषांसारखे पँट शर्ट असा पोशाख, पुरुषांप्रमाणेच अगदी लहान कापलेले केस अशी टॉमबॉय स्वरूपात दाखविली जाऊ लागली.  म्हणजे तिला काही वेगळे करायचे तर तिला महिलांच्या नेहमीच्या गटातून बाहेर काढून तिचे छंद हे अपवादात्मक आहेत असे दाखवूनच.     ही झाली समाजाच्या अपवादांचीही वर्गवारी करावयाच्या मानसिकतेची पद्धत.  म्हणजे महिला अमुक एक वाहन प्रकार चालविणार नाहीत आणि समजा एखादीने चालविलेच तर ती लगेच टॉमबॉय कॅटेगरीतली.  

पुरुषांप्रमाणे वाहन प्रमाणे वाहन चालविले, किंवा तसे कपडे घातले, किंवा तसे केस ठेवले तर ती महिला पुरुषी वृत्तीची ठरते काय?  तिच्यातील स्त्री-सुलभ भावना लोप पावतात काय?  अजिबात नाही.  आणि हे समाजाला दाखवून दिले पुरुषांसारखे कपडे घालणाऱ्या, बारीक केस ठेवणाऱ्या आणि बरीचशी त्यागराज खाडिलकरांसारखी चेहरेपट्टी असणाऱ्या गायिका फाल्गुनी पाठकने.  तिची सर्व गाणी पाहा आणि ऐका.  प्रत्येक गाण्याचे बोल आणि सादरीकरण स्त्री-सुलभ भावनांचे यथार्थ प्रदर्शन मांडणारे आहे हे लगेच जाणवेल.   आता तर अनेक महिला टिपीकल महिला वेषात आणि केशभूषेत राहून देखील खास पुरुषांची समजली जाणारी बुलेट सारखी वाहने देखील चालवीत आहेत.  महिलांकडून आता अपवादांच्या वर्गवारीलाही आव्हान दिले जाण्यास सुरुवात झाली आहे. 

मनोरंजन क्षेत्रात गायन, अभिनय अशा विभागांमध्ये महिलांची आवश्यकता असल्याने महिलांना स्थान आहे पण लेखन / दिग्दर्शन /संगीत दिग्दर्शन या विभागांत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे.  अपवाद म्हणून काही महिला या क्षेत्रात आहेत.  त्यातही दिग्दर्शन हा प्रांत अतिशय विद्वत्तेचा समजला जातो त्यामुळे या प्रांतातील महिला अपवादाच्या वर्गवारीप्रमाणे अतिशय अभ्यासू, विद्वान आणि महत्त्वाचे म्हणजे धीरगंभीर स्वभावाच्या हे ठरून गेल्यासारखे आहे.  सई परांजपें ह्या अपवादाच्या परंपरेतला एक अपवादात्मक अपवाद.  त्यांनी गंभीर चित्रपटांबरोबरच निखळ विनोदी चित्रपट देखील बनविले.  परंतु मीरा नायर, कल्पना लाजमी, तनुजा चंद्रा या धीरगंभीर दिग्दर्शिकांनी पुन्हा अपवादाची वर्गवारीच सिद्ध केली. 

अशा वेळी मनोरंजन विश्वाच्या क्षितिजावर उदय झाला फराह खानचा.  ह्या दिग्दर्शिकेने पहिल्याच प्रयत्नात (मै हूं ना - २००४) प्रेक्षकांना अगदी खळखळून हसायला भाग पाडलं.   विनोदासोबतच चित्रपटात देशभक्ती, प्रेम, शौर्य हे सर्व रस मिसळून एक चांगला मसालापट बनविला, त्याला उत्तम व्यावसायिक यश देखील मिळालं आणि समीक्षकांची प्रशंसाही.  मुख्य म्हणजे शाहरुख सारख्या मनस्वी कलाकाराला लीलया हाताळलं.  महिला अष्टपैलू नसतात किंवा अनेक आघाड्यांवर त्या एकाच वेळी कार्यरत राहू शकत नाहीत या पारंपरिक समजालाही तिने छेद दिला.  मूळची ती तशी दिग्दर्शिका नव्हेच. पहिल्या दिग्दर्शकीय प्रयत्नापूर्वी तिने जलवा, सात साल बाद (१९८७), कुछ कुछ होता है (१९९८) आणि कल हो ना हो (२००३) या चित्रपटांमधून किरकोळ भूमिका केल्या होत्या.    त्याशिवाय १९९२ च्या जो जीता वही सिकंदर पासून २००३ च्या चलते चलते पर्यंत तिने अनेक चित्रपटांत नृत्यदिग्दर्शिका म्हणूनही काम केले.  २००४ साली दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केल्यावरही तिने आपले हे जुने काम सोडले नाहीच.  अजूनही ती पाहुणी अभिनेत्री आणि नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करतेच.  शिवाय पटकथा लेखन आणि निर्मिती ह्या जबाबदाऱ्याही तिने पार पाडल्या आहेत.  इतकेच नव्हे तर शिरीन फरहाद की तो निकल पडी या चित्रपटाद्वारे तिने पूर्ण लांबीची नायिकेची भूमिकाही निभावली आहे.  तेही वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी आणि पारंपरिक नायिकेला शोभेल अशी शरीरयष्टी नसतानाही. 

त्याशिवाय आपल्या दिग्दर्शकीय आणि नृत्यदिग्दर्शकीय कौशल्यातून इतर कोणालाही न जमलेली गोष्ट सर्वात आधी साध्य करून दाखविली.  कत्रिना कैफने पदार्पणातच (बूम - २००३) बिकिनी दृश्य दिले.  इतर अनेक चित्रपटांतूनही तिने देहप्रदर्शनाचा अजिबात संकोच केला नाही.  परंतु इतके करूनही ती कधी 'मादक' किंवा 'चालू' दिसू शकली नाही.  याचे कारण तिच्या चेहऱ्यावर असलेले कायमचे निरागस भाव.  अगदी अक्षय कुमार सोबतच्या नमस्ते लंडनमध्ये तिच्या संवादांमुळे ती भांडकुदळ किंवा उर्मट वाटली असली तरीही तिला 'चालू' दाखविणे कुठल्याच दिग्दर्शकाला जमले नव्हते.  परंतु ही बाब जणू एक आव्हानच आहे असे समजून फराह खानने तिला तीस मार खान चित्रपटात शीला की जवानी या गाण्यातून 'मादक' किंवा 'चालू' रूपात प्रेक्षकांसमोर सादर केले.  या गीतात कत्रिनाच्या चेहऱ्यावरचे नेहमीचे निरागस भाव पार पुसले गेलेले आढळतात.  आता हे फराहने योग्य केले की अयोग्य हा वादाचा मुद्दा असला तरीही इतर कुणालाही साध्य न होऊ शकलेली गोष्ट तिने सहज करून दाखविली हे मान्य करावेच लागते.      

इतक्या आघाड्या सांभाळणारी ही बुद्धिमान महिला अपवादात्मक असली तरी इतर अपवादात्मक महिलांप्रमाणे हिचे व्यक्तिमत्त्व विद्वत्तेच्या ओझ्याखाली धीरगंभीर बनले आहे असे मात्र अजिबात नाही.  अतिशय हसतमुख व विनोदी व्यक्तिमत्त्वाची ही महिला डान्स इंडिया डान्स, जो जीता वही सुपरस्टार, एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा या व अशा इतर कार्यक्रमांतून प्रेक्षकांसमोर येते, स्पर्धकांशी दिलखुलास संवाद (तेही अगदी थेट बंबईय्या हिंदीतून) साधते तेव्हा कुणी सेलिब्रेटी न वाटता आपल्यातीलच एक सामान्य व्यक्ती वाटते.  

व्यक्तिगत आयुष्यात देखील या महिलेने अनेक परंपरांना छेद दिला आहे.  सहसा महिला आपला वैवाहिक जोडीदार शोधताना वय व शारीरिक क्षमता यांत आपल्यापेक्षा वरचढ पुरुषास पसंती देतात.  तसेच मुस्लिम महिला सहसा गैर मुस्लिम पुरुषांना पसंती देत नाहीत.  परंतु इथेही सर्व परंपरांना छेद देत फराहने आपल्यापेक्षा तब्बल साडेआठ वर्षांनी लहान असलेल्या शिरीष कुंदेर सोबत विवाह केला.  चाळिशीनंतर महिलांचा मातृत्व टाळण्याकडे महिलांचा कल असतो.  इथेही पुन्हा अपवाद करीत फराहने वयाच्या त्रेचाळिसाव्या वर्षी ही संधी घेतली आणि निसर्गानेही तिला अपवादांची मालिका प्रवाहित ठेवण्यास साहाय्य करीत एक पुत्र (झार) व दोन कन्या (दिवा आणि अन्या) या तिळ्यांची आई बनविले.  

फराहचे विशेष कौतुक करावेसे वाटते ते तिच्या द्रष्टेपणा बाबत.  द्रष्टेपण म्हणजे भविष्याचा वेध घेण्याची कला.  हे भल्याभल्यांना जमत नाही.  पुरुषांत देखील हा गुण अपवादानेच आढळतो तिथे स्त्रियांची काय कथा?  मनोरंजन क्षेत्रात पूर्वी एखाद्या बड्या असामीने एखादा चित्रपट बनविला आणि  तो प्रेक्षकांनी स्वीकारला नाही की लगेच आम्ही काळाच्या पुढचा चित्रपट बनविला असे म्हटले जायचे.  देव आनंद यांचा तर हा अतिशय प्रसिद्ध युक्तिवाद होता.  अर्थात त्यांचे मै सोलह बरस की, सेन्सॉर आणि मिस्टर प्राईम मिनिस्टर हे चित्रपट पाहताना हा युक्तिवाद माफक प्रमाणात पटतो देखील.  परंतु यश चोप्रांनी जेव्हा त्यांचा लम्हे हा चित्रपट अपयशी ठरला आणि तो काळाच्या पुढचा असल्याचा दावा केला तेव्हा त्यात काही तथ्य नव्हते कारण याच कथेवर पूर्वी गुलजार यांनी मौसम हा एक यशस्वी चित्रपट बनवून दाखविला होता.  असो.  तर असे हे द्रष्टेपण समाजात अभावानेच आढळणारे.  फराह खान मध्ये ही भविष्याचा वेध घेणारी कला दिसून आली ती २००९ मध्ये जेव्हा तिने तेरे मेरे बीच में नावाचा एक सेलिब्रिटी रिअलिटी शो स्टार प्लस या उपग्रह वाहिनीवर सादर केला.  तेरा भागांच्या कार्यक्रमाला फारसा प्रतिसाद लाभला नाही कारण तेव्हा ही संकल्पना नवीन होती.   आता मात्र अशी संकल्पना रुळली आहे.  अनुपम खेर देखील असा एक कार्यक्रम आता सादर करतात आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय.  तर फराह च्या कार्यक्रमात तिने दुसऱ्याच भागात मुष्टीयोद्धा विजेंद्र सिंग आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांना निमंत्रित केले होते.  त्यात तिने विजेंद्रला अभिनय करण्याविषयी सुचविले होते आणि त्याच्याकडून लहानसा प्रसंग सादरही करून घेतला होता.  त्याचप्रमाणे प्रियांकालाही तिने लुटुपुटूचे बॉक्सिंग करायला लावले होते.  गंमत म्हणजे विजेंद्र सिंग फग्ली या चित्रपटाद्वारे अभिनेता म्हणून प्रेक्षकांपुढे आलाय आणि प्रियंकानेही मेरी कोम वरील चित्रपटात प्रशंसनीय बॉक्सिंग केली आहे.   ह्या भविष्याचा पाच वर्षांपूर्वीच वेध घेणाऱ्या ह्या महिलेला द्रष्टेपण नाही असे म्हणावे तरी कसे?  विकिपीडियावरील माहितीनुसार फराह खानचा जन्म ९ जानेवारी १९६५ चा म्हणजे चित्रपटसृष्टीतील तीनही दिग्गज खानांपेक्षा ती वयाने जराशी मोठीच.  तिच्यापेक्षा कमी वय असलेल्या पद्मिनी कोल्हापुरे आणि रेणुका शहाणे या आणि अशा इतर अनेकींची कारकीर्द आता जवळपास संपुष्टात आलेली असताना पन्नाशीच्या उंबरठ्यावर उभी असलेली ही महिला मनोरंजन क्षेत्रात अनेक आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे कार्यरत राहू पाहत आहे.  दिवाळीत तिचा अजून एक भव्य प्रकल्प हॅपी न्यू इयर प्रेक्षकांसमोर सादर होत आहे.  या निमित्ताने तिच्या भावी वाटचालीकरिता शुभेच्छा देऊन ह्या लेखाची सांगता करतो.