का ल द र्श क

Saturday 7 May 2011

दहशतवादावरील एक प्रचंड मोठा वाद

महाजालावर Google Buzz ह्या Application चा उपयोग नेहमीच चर्चा करण्याकरिता केला जातो.  लोक आपले मत मांडण्याकरिता Buzz सुरू करतात.  इतर लोक ते वाचतात.  शक्य असल्यास त्यावर अभिप्राय देतात.  असंच एकदा मी एका Buzz वर माझं मत नोंदविलं आणि सुरू झाला एक प्रचंड मोठा वाद.  खरं तर मी जे मत मांडलं ते बहुसंख्य सामान्य जनांचं मत असावं असं मला वाटत होतं.  अर्थात Buzz वर मला याच्या नेमका उलट अनुभव आला.  माझ्या मताच्या विरोधात अनेक जण अक्षरश: तुटून पडले.  प्रत्येकाला मी माझ्यापरीने शक्य तितक्या शांतपणे प्रत्युत्तर दिले.  पण तरीही काही हेकेखोर मंडळी स्वत:चे तेच तेच मुद्दे रेटत राहिली.  काही वेळा अशांना प्रत्युत्तर देताना मग माझाही संयम सुटला.  आक्रमक भाषा वापरली गेली.

अचानक या आठवड्यात मी पुन्हा दोन दशकांपुर्वी गाजलेला हिन्दी चित्रपट पाहिला आणि माझी ट्यूबलाईट पेटली.  या चित्रपटाची नायिका जे मत मांडत असते, तेच मत तर मी प्राणपणाने मांडत होतो.  नायिकेच्या मताचा आदर केला गेल्याचेच चित्रपटात  आहे.  याचा अर्थ चित्रपटकर्त्याचेही तेच मत आहे.  त्याशिवाय चित्रपटात नायिकेचे असे मत दाखविल्याबद्दल चित्रपटावर अथवा निर्मात्यांवर त्या काळात टीका देखील झालेली नव्हती.  चित्रपट तुफान चालला होता याचाच अर्थ बहुसंख्यांना हे मत पटले असणारच.  मग तेच मत मी बझ्झ वर मांडले तर मी अल्पमतात का बरे आलो?

जर कुणाला हा महाजालावरील महावाद वाचायचा असेल तर त्याची Link खाली देत आहे.


परंतू या Buzz चा Owner मी नाही.  त्यामुळे हा Buzz महाजालावर राहील की काढून टाकला जाईल यावर माझे अर्थातच नियंत्रण नाही.  म्हणूनच हा वाद जसा घडला तसा इथे पुन्हा उद्धृत करीत आहे.

सर्वप्रथम ते चित्र ज्यावरून हा Buzz सुरू करण्यात आला.
त्यानंतर आता लोकांच्या (माझ्यासह) या चित्रावरील वेगवेगळ्या प्रतिक्रिया आणि त्यातून झडलेला हा वाद.

15/2 महेंद्र .: हे सगळं कुठून येतं?

(सौजन्य:-गणेश बागल फेस बुक )
15/2 Raj Jain: जरा फरक आहे.. दुस-या दिवशी फाशीवर नाही चढवला, जवळ जवळ ३-४ महिन्यापेक्षा जास्त कालावधी लागला होता, संदर्भ शोधून देतो हवा तर... बाकी इंदिराजींच्याकडे निर्णय घेण्याची व त्याची अमंलबजावणी करण्याची प्रचंड ताकत होती हे कोणीही मान्य करेल :)
15/2 महेंद्र .: मला फेस बुकवर सापडलं. गणेश बागलच्या प्रोफाइल वर.. जरी दुसर्या दिवशी नाही, तरीही तिन महीने पण फार नाहीत!
15/2 Vidyadhar Bhise: >>On February 6, 1984, JKLF members murdered the Indian diplomat Ravindra Mhatre, in Birmingham, England. One of their demands was the release of Bhat. After this, his petition for clemency was rejected, and Bhat was executed in the Tihar Jail in New Delhi on February 11, 1984.[3].
Wikipedia!
15/2 Raj Jain: माझ्या संदर्भात शक्यतो चूक होती अथवा वाचणात, धन्यवाद विभी.
15/2 Vidyadhar Bhise: :)
15/2 आ का Anand Kale: मला हे लाईक करावस वाटलं...
15/2 विनोदकुमार शिरसाठ: जबरदस्त ......
15/2 CHETAN GUGALE: रविंद्र म्हात्रे ऐवजी राजीव गांधींचं अपहरण झालं असतं तर इंदिरा गांधी अशाच वागल्या असत्या का?

आपले उच्चाधिकारी (किंवा अगदी सामान्य प्रजाजनही) ओलीस ठेवले गेले असल्यास अतिरेक्यांची सुटका करण्यात काहीच गैर नाहीय. शिवाजी महाराजांनीही आपल्या माणसांचे प्राण वाचविण्याकरिता वेळप्रसंगी शत्रूशी तह केलाय, कारण गड पुन्हा मिळविता येतात सिंह गेला तर ती उणीव कधीच भरून येत नाही.

मी इंदिराजींच्या जागी असतो तर रविन्द्र म्हात्रेंना वाचविण्याकरिता अतिरेक्याला सोडण्याची किंमत चूकविली असती. XXत धमक असली तर अशा अतिरेक्यांना पुन्हा पकडता येते. इंदिराजींनी स्वत:ला रविन्द्र च्या आईच्या जागी ठेवून विचार करायला हवा होता.

यह पूरब है, पूरबवाले हर जान की कीमत जानते है हे कृतीतही असावं लागतं, नुसतं उक्तीत असून चालत नाही.

या पार्श्वभूमीवर कंदहार प्रकरणी वाजपेयी सरकारचा निर्णय अगदी योग्य होता. योगायोगाने त्या कालावधीत दोन महिन्यांकरिता (२० डिसेंबर १९९९ ते २२ फेब्रुवारी २०००) मी देखील घरापासून १५०० किमी दूर बिहार मध्ये कार्यालयीन कामाकरिता गेलो होतो. समजा माझं अपहरण झालं असतं तर माझ्या कुटुंबियांनी सरकारकडून काय अपेक्षा केली असती? हा विचार माझ्या मनात येतो.
15/2 Anagha Nigwekar: ह्या संवादात शिरण्याबद्द्ल माफी...
जगभर सतत इतका प्रवास करत असताना...जर माझं असं काही अपहरण झालं तर "माझ्या आईला सोडवा आणि त्यासाठी त्या अतिरेक्यांना सोडवा" असला लाजीरवाणा आक्रोश करून मला लाज आणू नकोस हे मी कधीच माझ्या लेकीला सांगून टाकलेले आहे!!
अर्थात ह्या गोष्टी कधीही खरोखर परिस्थिती उभी राहिल्याखेरीज सिद्ध करता येत नाहीत....
15/2 CHETAN GUGALE: << असला लाजीरवाणा आक्रोश करून मला लाज आणू नकोस हे मी कधीच माझ्या लेकीला सांगून टाकलेले आहे >>

एकदम मान्य. अनघाजी तुमचं वय काय आहे ह्याची मला कल्पना नाही पण उतारवयाकडे झुकलेल्या माझ्या आईवडिलांना माझी गरज आहेच. ती अमान्य करून कसं चालेल? बिहारमध्ये होतो तेव्हा मी फक्त २१ वर्षाचा होतो. मुख्य म्हणजे कायदा मला शस्त्र बाळगू देत नाही तर माझं रक्षण करण्याची जबाबदारी आपोआपच सरकारच्या शिरावर येते. त्यात ते कमी पडले तर त्याची किंमत त्यांनी चूकती करायला नको का? ती मी किंवा माझ्या कुटुंबियांनी का करावी? आणि तशी माझी तयारी असतीच तर मी सैन्यात किंवा पोलिसांत नसतो का भरती झालो?

सैन्यातील जवान शहीद झाले तर त्यांच्या कुटुंबियांना बर्‍यापैकी नुकसान भरपाई मिळते असं ऐकून आहे. अर्थात धूप या हिंदी चित्रपटात शहीद जवानाच्या बापाला पेट्रोल पंप मिळविण्याकरिता किती त्रास सहन करावा लागतो ते ओम पूरी ने आपल्या अभिनयातून दाखवून दिले आहेच. ते पाहिल्यावर शहीद होण्यापूर्वी कुणीही दहावेळा विचार करेल.

बाकी ज्याचे त्याचे विचार....
15/2 Anagha Nigwekar: कुठलेही आयुष्य देशापुढे मोठे नसते.....कुठलेही...आणि कोणत्याही वयात....

बाकी ज्याचे त्याचे विचार....
15/2 CHETAN GUGALE: देशाविषयीची माझी कल्पना थोडी वेगळी आहे.
शक्य असल्यास हे वाचून पाहावे.
http://mimarathi.net/node/4684
15/2 Raj Jain: आता मी मध्ये घूसतो आहे, क्षमा.

इंदिरा यांनी जे केले ते नेता म्हणून त्यावेळी योग्य होते, हे माझे मत आहे, कधी कधी कठोर निर्णय घावे लागतात, भले ते नंतर शक्यतो चुकीचे वाटतील... ( ब्लु स्टार अथवा राजीव ने पाठवलेले श्री लंकेला सैन्य हा निर्णय) जर खरचं देश अथवा मी असा जर कधी प्रसंग आला तर शक्यतो मी उत्तर देण्यात एक क्षणाचा देखील वेळ लावणार नाही, आधी देश. यांचे कारण मी देऊ शकतो पण ते सर्वमान्य नाही आहे म्हणून देत नाही आहे, चेतन , पण फक्त एवढेच म्हणेन जर आपल्या सैन्यातील प्रत्येकाने स्वतःचाच विचार केला तर ? कधी कधी हत्यारे किती कुचकामी असतात हे मी स्वतः पाहिलेले आहे, नशीबाने २ वेळा अतिरेकी हल्ल्यातून फक्त काही क्षण.. मिनिट आधी निघाल्यामुळे वाचलो आहे व त्यानंतरचा मनस्ताप भोगला आहे.
15/2 Raj Jain: या बाबतीत रशियाचे मास्को चे उदाहरण प्रेरक ठरावे सर्वांना.... ( म्हणजे नेत्यांना ) भले तो आज क्रुरता वाटेल, पण त्यावेळी त्याच्या सरकारला जे योग्य वाटले तेच केले. झुकण्यापेक्षा बळी जाणे महत्त्वाचे.. असे हल्ले केले की तुम्ही झुकता असे दिसले की मग अश्या हल्ल्यांची रांग लागते... पाहतो आहोत ना आपण.. अफझल गुरु.. कसाब.. अजून पेंडिंग ३६ एक केसेस... ( राष्ट्रपती कडे) अजून फाशी नाही, त्यांचेच उदाहरण देऊन नवीन भरती हे आतंकवादी करत नसतील कश्यावरून ?
15/2 CHETAN GUGALE: << जर आपल्या सैन्यातील प्रत्येकाने स्वतःचाच विचार केला तर >>

राज,

याचं उत्तर मी आधीच दिलंय. सैन्यातील लोक ती जाणीव ठेवूनच वावरत असतात. इतरांचं तसं नसतं. इतर नागरिक नि:शस्त्र फिरत असतात ते कुणाच्या भरोश्यावर? सैन्य आणि पोलीस यांच्याच ना? नाहीतर आपल्या देशाने असं करावं ना - सरळ अमेरिके सारखा मुक्त शस्त्र परवाना वाटप करावं. एक सामान्य नागरिक म्हणून परवान्यासह शस्त्र बाळगता येत असेल तर माझी सुरक्षितता मी स्वत:च पाहीन. इतकं असतानाही जर मी अतिरेक्यांच्या तावडीत सापडलोच तर मात्र माझ्या करिता सरकारने तडजोड करावी अशी माझी अथवा माझ्या कुटुंबियांची अपेक्षा निश्चितच नसेल.

पण आताच्या कायद्याप्रमाणे आमचे हात बांधलेले आहेत. अनेकदा समाजात वावरत असताना मला चूकीच्या गोष्टी घडताना दिसतात पण मी त्यांना रोखू शकत नाही. जर मला लढण्याची परवानगी तर माझीही मरण्याची तयारी नाहीय.

ज्या लोकांना अशी लढण्याची परवानगी असते आणि त्याकरिता कार्बाईन सारखी अत्याधूनिक शस्त्रेही दिलेली असतात ते तर पूर्ण तयारीनिशी लढण्याकरिता गेले आणि ९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते, तिच्याविषयी काय बोलाल राजे?
15/2 Anagha Nigwekar: चेतन गुगळे, तुम्ही हे असले विचार पसरवून नक्की काय साधता आहात ह्याची मला कल्पना नाही. परंतु, ह्या विचारांची माझ्या देशाला गरज नाही एव्हढे मात्र निश्चित. तुमचे विचार खोडून टाकण्यासाठी मी किंवा माझ्या देशबांधवांनी त्यांचा मौलिक वेळ खर्च करावा असे मला वाटत नाही. इतर बरीच कामे आहेत ज्याची माझ्या देशाला गरज आहे...तेव्हा मी माझा सहभाग इथेच संपवते.
धन्यवाद.
15/2 Raj Jain: या बाबती आपले विचार एकदम भिन्न आहेत मित्रा :)
त्यामुळे येथे फक्त निष्फळ चर्चा होईल, व मतितार्थ काहीच मिळणार नाही.... असो.
फक्त हत्यारानेच लढता येतं तर हा तुझा गैरसमज आहे एवढेच म्हणेन... हे मी वर देखील लिहले आहे.
क्राईम ग्राफ अमेरिका व भारत याची तुलना असलेला मध्ये कुठेतरी पाहिला होता.. त्यांची आठवण झाली, तेथे परवाना असून देखील गुन्हेगारी आहे.. व सम प्रमाणात आहे.. :) माणूस सगळीकडे सारखांच.. पण.. जाउ दे.. :)
कधी तरी डॉक्टर कोटणीस की अमर कहानी नावाचा चित्रपट पहा, असे म्हणेन... व चित्रपट या नजरेने पाहू नका, आत्मकथा या नजरे ने पहा.
15/2 Raj Jain: >> ९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते

हा संदर्भ नाही समजला, व काही असो, कोणाबद्दल ही असो वाक्य रचना अत्यंत चूकीची आहे असे म्हणेन..
घटना कश्या घडतात व काय घडामोडी मागे-पुढे चालू असतात ते येथे सुरक्षित जागेवर बसून तुम्ही नाही सांगू शकत चेतन.

* पुन्हा एका चित्रपटाचा संदर्भ देतो, एकादी घटना कोणाच्या नजरेत कशी दिसू शकेल, तो त्या क्षणी काय विचार करु शकतो, या बद्दल एक नितांत सुंदर चित्रपट आला होता वेंटेज पाँईन्ट नावाचा.. हा देखील पहा, व यानंतर एखाद्या घटनेला एका पेक्षा अनेक बाजू असू शकतात हे तुम्हाला पटेल. कारण वरील बाब तुम्ही फक्त एकच बाजू पाहून लिहीत आहात असे वाटत आहे....

* २००८ ला जेव्हा करोलबाग दिल्ली येथे ब्लास्ट झाला तेव्हा त्या येरियामध्ये दिवाळी निमित्य १००० च्या वर पोलिस + अनेक अर्धसैनिक होते. तरी ब्लास्ट झाला, अनेक दगावले... ! अतेरिकी तुम्हाला सांगत अथवा कॉल करून येत नसतात.. व गोळीतर कधीच नाही.
15/2 विनोदकुमार शिरसाठ: अतिरेक्यां बरोबर तडजोड नकोच ...... मग कोणीही ओलीस असला तरी हरकत नाही .......
15/2 Sandhya Pawar: सेन्सेशनल लिखाण क्षणभर अपील होतं खरं पण पब्लिक फोरम मधे सारासार विचार करून केलेलं लिखाण नेहमीच भावतं... व्य्कती कितीही ग्रेट असल्या तरी त्यांचा कार्यकाळ ठरलेला असतो असं मला वाटतं.

आजच्या काळात भारत महासत्ता बनणार आहे, किकेटमधे नं १ आहे, आयटी मधे नं १ आहे, जीडीपी सुपर्ब आहे... नकारात्मक गोष्टी शोधून त्यात रमणं मान्यच नाही
15/2 Raj Jain: संध्याजी,
स्वारी फॉर जी :

मला शाळेत असताना नेहमी प्रश्न पडायचा, ही लोक इतिहास का शिकवतात... जे होते ते गेले.. त्यांनी काय करायचे होते ते केले... मग आम्ही का सनावळ्या घोकत बसायच्या....

उत्तरे खूप नंतर मिळाली.. का ? कारण त्यांच्या कार्यातून आदर्श घेणे व त्यांच्या चुकातून ती चूक टाळता येऊ शकते हे शिकण्यासाठी..
म्हणून इतिहास महत्त्वाचा देशाचाच नाही तर प्रत्येक व्यक्तीचा ...

भारत उद्याची महासत्ता... हे इंडिया शायनिंग नंतर चे सर्वांत जास्त चालेला शब्द आहे... महासत्ता होण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्यांची सध्या आपल्याकडे वाणवा आहे....वाईट वाटेल अथवा राग येईल.. माझ्या या वाक्याबद्दल पण सभोवती पाहिले की जानवेल तुम्हाला ही.. ही अफुची गोळी आहे जनतेसाठी... बाकी काही नाही.. महासत्ताचा अर्थ काय आहे ? महासत्ता कधी एकेकाळी रशिया देखील होती व गेली कित्येक वर्ष अमेरिका त्या स्थानावर आहे त्यांनी काय मिळवले त्यापेक्षा त्यांनी काय केले ? युध्दे ??? तर असा महासत्ता भारत न झालेलाच चांगला...

क्रिकेटमधील यश हे फक्त ११ खेळाडूंचे व त्याच्या सलग्न असलेल्या संस्थाचे आहे... बाकी जनतेला मिळतो तो फक्त व फक्त आनंद.. क्षणीक !!

आयटी मध्ये आपण नंबर वन नाही आहोत.. आपण ऑउटसोर्स मध्ये होतो.. आता चीन आहे... !

राहिली जीडीपी.... परत अफुची गोळी..
जगण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी जेव्हा सर्वसामान्य व्यक्तीच्या हाताबाहेर गेल्या असतील तर तेथे जीडीपी चा आकडा ९.५ असो अथवा ९९.५ असो... तो फक्त आकड्याचा खेळ आहे.
15/2 CHETAN GUGALE: राजे,

<<< फक्त हत्यारानेच लढता येतं तर हा तुझा गैरसमज आहे एवढेच म्हणेन... हे मी वर देखील लिहले आहे.
क्राईम ग्राफ अमेरिका व भारत याची तुलना असलेला मध्ये कुठेतरी पाहिला होता.. त्यांची आठवण झाली, तेथे परवाना असून देखील गुन्हेगारी आहे.. व सम प्रमाणात आहे.. >>>

असली तूलना हास्यास्पद आहे. तुम्हाला मी भारतात क्राईम ग्राफ शून्य असलेले प्रदेशही दाखवू शकतो. इथे एक टक्का गुन्ह्यांची तरी नोंद होते का? पोलिस ठाण्यात जाऊन स्वत: अनुभव घ्या. सरळ MIGHT IS RIGHT चा अनुभव येतो पदोपदी. सानंदा प्रकरण ताजे आहे. अधिक सांगणे न लगे. इथे ही दुर्जनांकडे बेकायदा शस्त्रे आहेतच की. परवान्यावाचून त्यांचे काहीच अडत नाहीय. सज्जनांचीच कुचंबणा होते. ते प्रत्येकवेळी माघार घेतायत म्हणून जिवंत राहतायत इतकेच. मी स्वत: कित्येकवेळा समोरच्याची चूक असूनही त्यांच्याशी प्रतिवाद करत नाही, इथे भर गर्दीत खिशात revolver घेऊन लोक हिंडतात, जे की बिहार शरीफ येथून २५,०००/- रुपयात आणलेले असते. सज्जनांच्या हाती शस्त्रे आली की ते दुर्जनांचा तिथल्या तिथे प्रतिकार करू शकतील. कदाचित त्यामुळे सुरूवातीला काही काळ, आता आहे त्यापेक्षा रक्तपात वाढेल. पण काही काळच कारण त्या नंतर दुर्जनांना जाणीव होईल की आपल्या हाती शस्त्र आहे तसे समोरच्याच्या हातात देखील... आणि आपण जर त्याच्यावर अन्याय करायला लागलो तर तो ही काही गप्प बसणार नाही. त्यामुळे पुढे एक काळ असाही येऊ शकेल की सर्वांच्याच पाशी शस्त्रे असतील आणि सर्वांनाच त्याची जाणीव असेल व त्यामूळे कुणीच त्याचा वापर करणार नाही. (आज जसे की भारत व पाक दोघांकडे अण्वस्त्रे आहेत व त्यामुळेच कोणीच त्याचा वापर करत नाही. एकट्या पाककडे असती तर काय झाले असते?)

दुसरं असं की तुम्ही जो अजमल कसाबचा मुद्दा मांडलाय त्यावरही माझं मत तुम्हाला ठाऊक असेलच (कारण तुमच्याच संकेतस्थळावर मांडलंय. तरी नसल्यास पुन्हा वाचावे - http://mimarathi.net/node/4186).

इथेही माझे विचार स्पष्ट आहेत. अशी प्रकरणे हाताळण्यात सरकारी यंत्रणा सपशेल अपयशी ठरतेय तिथे सामान्य नागरिकांकडून कसली त्यागाची अपेक्षा करताय?

त्या हल्ल्यात CST वर सामान्य नागरिक मारले गेले त्या बिचार्‍यांवर अचानक हल्ला झाला होता. पण त्यानंतर मी ज्या ९ पोलिसांचा उल्लेख केलाय त्यांना हे ठाऊक होतं की देशावर हल्ला झालाय. ते अचानक हल्ल्याचे बळी नक्कीच नाहीयेत. संदर्भ आता तरी समजला असेलच आणि माझा मुद्दाही. जिथे ON DUTY लढणारा (किंवा लढण्यासाठी शस्त्रसज्ज होऊन निघालेला म्हणा हवं तर) पोलीस मारला गेला तरी त्याची विधवा पत्नी यंत्रणेला दोष देतेय मग सामान्य नागरिक जर ह्यात नाहक गोवला गेला तर त्याने / त्याच्या कुटुंबियांनी कुणाला दोष द्यायचा.

<< अतेरिकी तुम्हाला सांगत अथवा कॉल करून येत नसतात.. व गोळीतर कधीच नाही.>> ह्या तुमच्या मुद्याचा प्रतिवाद असा की अतिरेकी अचानक देखील प्रकट होत नाहीत. सीमेवर आपले जवान काय करीत असतात? त्यांच्या हलगर्जीपणामुळेच अतिरेकी आत येतात. अतिरेकी आत येतात (तेही साठ तास लढता येईल इतक्या शस्त्र व दारुगोळ्यासह) यात आपल्या सरकारी यंत्रणेतील एकाचाही दोष नाही हे कसे काय शक्य आहे?

<< अतिरेक्यां बरोबर तडजोड नकोच ...... मग कोणीही ओलीस असला तरी हरकत नाही >> Theoritically हे बरोबर आहेच, पण मग तशी वेळच का येऊ द्यावी म्हणतो मी? आपली जनता अतिरेक्यांच्या तावडीत सापडायला नको इतकी सुरक्षितता पुरविण्याची जबाबदारी सरकारचीच आहे की? (एखादा नागरिक स्वत:चा जीव धोक्यात घालायला स्वत:हून restricted area त गेला तर गोष्ट वेगळी पण भर गर्दीच्या शहरात अतिरेकी जनतेला वेठीस कसे धरू शकतात? नेत्यांना कशी बरोबर सुरक्षितता पुरविली जाते? प्रसंगी त्याकरिता इतरांची गैरसोयही केली जाते. नेते बरे अतिरेक्यांच्या तावडीत सापडत नाहीत? मग जनतेनेच का सापडावे?)

जर देशाचं शासन तितकंच स्वच्छ, पारदर्शी आणि भ्रष्टाचार मुक्त असेल ना तर या देशातला एकूण एक (माझ्यासकट) सामान्य नागरिक देशाकरिता प्राण त्याग करायला तयार होईल. आहे अशा परिस्थितीत मात्र मी प्राण च काय पण देशासाठी कवडीसुद्धा अर्पण करणार नाही.

मी देशाकरिता हसत हसत मरायला तयार आहे असं म्हणणं फार सोपं असतं. प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसल्यावर कसोटी लागते. प्रत्येक सजीवात जगण्याची प्रचंड आसक्ती असते. ती नाकारण्यात काय अर्थ आहे? मी प्रामाणिकपणे सांगतो की हे जीवन सुंदर आहे आणि ते जास्तीत जास्त जगायला मला निश्चितच आवडेल. आहार आणि जीवनशैलीत योग्य तो बदल करून दीडशे वर्षे जगता येइल असं माझं नियोजन आहे. इतकं जगल्यावरदेखील मरताना मला फार वाईट वाटेल. माझे हे विचार कुणालाच पटले / आवडले नाहीत तरी हरकत नाही पण निदान आज तरी आपलं हे सुंदर जीवन कुणाकरिता तरी त्यागावं असं (व्यक्ती, संस्था, समाज, देश) मला दिसत नाहीय. परिस्थिती बदलली तर माझे विचारही बदलतील.

आणि चित्रपटांचं म्हणाल तर तुम्हीच कोहराम (अमिताभ, नाना) पाहा. "आम्ही अतिरेक्यांच्या कारवाईत शहीद व्हायला तयार आहोत" यासारख्या भंपक वल्गना करणारे प्रत्यक्षात कसे असतात ते त्यात दाखविले आहे. मुख्य म्हणजे हा चित्रपट वास्तव घटनेवर आधारित आहे.

(अवांतर:- मी जून २००९ ते सप्टेंबर २००९ मध्ये सल्लागार म्हणून काम केले होते तेव्हा माझा रूपये १३,०००/- इतका TDS कापला गेला. त्यानंतर तो आवश्यक त्या सर्व कागद्पत्रांची पूर्तता करूनही अजूनदेखील मिळाला नाहीय. किमान चार महिने वाट पाहा असं उर्मट उत्तर ऐकायला मिळतंय. दुसरीकडे माझे एक व्यावसायिक मित्र, ज्यांना त्यांचा आगावू कर भरावा लागतो, त्यांनी त्यात फक्त आठ दिवस उशीर केला तर त्यांना प्रचंड दंड भरावा लागला. मला फक्त विरोधाभास दाखवून द्यायचाय की सरकारचं जनतेप्रती काहीच कर्तव्य नाहीय असं ही शासन यंत्रणा पदोपदी वागतेय. त्याचवेळी नागरिकांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली तर त्यांना कठोर शिक्षा आहेत. इथे नागरिक कर्तव्यपूर्ती करतायत तेच खूप आहे. ह्या बोनस त्यागाची अपेक्षा सरकार कुठल्या तोंडाने ठेवतंय?)


At Least I Think So. Thats all.
16/2 विशाल कुलकर्णी: <<९ जण असूनही २ जणांकडून मारले गेले तर त्यातल्या एकाची उच्चशिक्षित विधवा बायको गळा काढते. पुन्हा माझ्या पतीवर कसा अन्याय झाला याचं रसभरीत वर्णन करणारं पुस्तक छापते, >>>
चेतनजी, याचा संदर्भ द्याल का जरा ! मला पण उत्सुकता आहे.... (माझ्या मनात काही अंदाज आहेत पण ते तुमचे उत्तर आल्यावरच मांडेन !)
16/2 CHETAN GUGALE: २६/११ ला हल्ला सुरू झाला आणि तासाभरात सार्‍या देशाला दूरचित्रवाहिन्यांवरून ते समजले. त्यानंतर तीन प्रमुख पोलिस अधिकारी आणि इतर पोलिस असे मिळून त्या अतिरेक्यांशी लढायला निघाले. त्यातल्या एकाला तर सर्वांनीच चिलखत घालून सज्ज होऊन निघताना दूरचित्रवाणीवरून पाहिलंय. (इतकं सविस्तर वर्णन करण्याचा उद्देश हा की ते पूर्णत: सावध होऊन लढायला निघाले होते हे त्यांना आणि सर्वांनाच ठाऊक होतं.) प्रत्यक्ष लढायला सुरूवात करण्यापूर्वीच त्यांच्यावर रस्त्यात गोळीबार झाला आणि त्यात ते ठार झाले.


आता त्यांच्यापैकी एकाच्या विधवा पत्नीचे म्हणणे असे आहे की पोलीस मुख्यालयातून राकेश मारिया यांनी चूकीच्या सूचना दिल्यानेच हे पोलिस अतिरेक्यांच्या हल्ल्याला बळी पडले. या आरोपात काय तथ्य आहे? अशा आरोपांनी व्यथित होऊन मारिया राजीनामा द्यायच्या बेतात होते. शेवटी सरकारनेच त्यांची समजूत काढली.

ज्याप्रमाणे सीएसटीवर झालेला हल्ला अचानक होता त्याचप्रमाणे या पोलिसांवर झालेला हल्लाही अचानक असू शकत नाही का? मारिया यांचा त्यात काय दोष? खरे तर एकदा शहरावर हल्ला झालाय असे समजल्यावर तो अमूक एका भागातच झालाय आणि ही पोलीस टीम त्या भागात जाईपर्यंत त्यांच्यावर इतरत्र कुठेही हल्ला होणारच नाही (किंवा होणार असेल तर पोलीस मुख्यालयाने त्यांना त्याविषयी अगोदरच सतर्क करावे) अशी काही या बाईंची समजूत आहे का? त्यांच्यावर ज्या परिसरात हल्ला झाला तेथे अतिरेकी असल्याची माहिती मुख्यालयाने त्यांना का दिली नाही असा मुख्य आक्षेप मांडत या बाईंनी थेट एक पुस्तकच लिहीलेय.

माझं एवढंच म्हणणं आहे की इतक्या संवेदनशील हल्ल्याला तोंड द्यायला अत्याधूनिक शस्त्रांसह सज्ज होऊन निघालेला (सज्ज होऊन निघालेला हे तीन शब्द अधिक महत्त्वाचे) अधिकारी अतिरेकी हल्ल्यात मारला गेला तर त्याची विधवा पत्नी देखील त्याकरिता शासकीय यंत्रणेला जबाबदार धरते. तर मग एखादा नि:शस्त्र सामान्य नागरिक जेव्हा काहीच कल्पना नसताना अतिरेक्यांच्या तावडीत सापडतो तेव्हा त्याने देशाकरिता खुशाल आपले बलिदान द्यावे अशी अपेक्षा ठेवणे हा समाजाचा दुटप्पी न्याय नाहीय का?
16/2 Raj Jain: चेतन तुम्ही ते पुस्तक वाचले आहे का ?
हा सर्वात आधी प्रश्न.. तीने मनात आले म्हणून लिहले नाही आहे.. तीने तेथे काही पुरावे दिले आहेत, माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेले... असो.
तुमचा हा दृष्टीकोन पटला नाही...
16/2 CHETAN GUGALE: << तीने मनात आले म्हणून लिहले नाही आहे.. तीने तेथे काही पुरावे दिले आहेत, माहिती अधिकाराचा वापर करून मिळवलेले... >>

मी त्या बाईंनी काही बेकायदेशीर केले आहे असे म्हंटलेच नाहीय. त्यांना त्यांचा आक्षेप नोंदवायचा पूर्ण हक्क आहेच. त्या पाहिजे तर न्यायालयात देखील जाऊ शकतातच की.... त्यांचे पती कायद्याच्या सेवेत होते म्हंटल्यावर त्यांचा देशाच्या न्यायसेवेवर विश्वास असणारच. फक्त त्यांनी जर अशा प्रकारे पुस्तक लिहून आपले आक्षेप मांडलेले समाजाला चालते तर सामान्य नागरिकाच्या कुटुंबियांनी आमच्या ओलीस ठेवलेल्या नातेवाईकाला सरकारने सुखरूप परत आणावे अशी अपेक्षा केल्यास का चालत नाही? हाच माझा मुख्य मुद्दा आहे. कृपया समजून घ्या.
16/2 CHETAN GUGALE: मी एक सामान्य नागरिक म्हणून या सार्वभौम राष्ट्रात जिवंत राहण्याच्या अतिशय मुलभूत अधिकाराची अतिशय रास्त मागणी करतोय. त्याकरिता लागणार्‍या अन्न, वस्त्र, निवारा, बेकार भत्ता / नोकरीची हमी, अशा कुठल्याही गरजा पूर्ण करा हे देखील सरकारला सांगत नाहीय. माझ्या जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक गरजांपैकी फक्त एक गरज म्हणजे सुरक्षितता मला पूरवा एवढीच माझी सरकारकडून अपेक्षा आहे. तीदेखील केली नसती पण पूर्वीच्या काळी जसे नागरिक तलवार, इत्यादी शस्त्रे बाळगत होते, तसे कायद्याचे राज्य आल्यावर आता बाळगता येत नसल्याने (शांतताप्रिय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सत्ताधारी खासदाराचा अभिनेता पूत्र असतो तर मात्र एके ५६ बाळगता आली असती नक्कीच) ही जबाबदारी सरकारवर आहे असे मानतो.

एवढ्या एकाच कारणाने मी तुमच्यासारख्या बुद्धिवाद्यांच्या रोषाचा धनी ठरत असलो तरी माझे हे विचार मी ठामपणाने मांडीनच कारण मला पक्के ठाऊक आहे की काही मूठभर तथाकथित विचारवंत सोडले तर प्रामुख्याने सामान्य जनतेचे असेच विचार आहेत.

याचा धडधडीत दाखला म्हणजे २००० साली अपहृत प्रवाशांच्या नातेवाईकांना सरकारला घातलेले साकडे "काहीही करा पण त्या प्रवाशांना सोडवा". त्यात काहीच चूक नाहीय. प्रत्येकाला आपले प्राण प्रिय असतातच. ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.
16/2 Raj Jain: >>ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.

चर्चा समाप्त :)
16/2 CHETAN GUGALE: सर्व भावनिक गोष्टी बाजूला ठेवून वस्तूनिष्ठ विचार करू. समजा तुम्ही म्हणता तसे अतिरेक्यांनी तीन चारशे नागरिकांना अपहृत केल्यानंतर त्यांच्या मागण्या धुडकावून नागरिकांचा बळी देण्याचा निर्णय जरी सरकारने घेतला तरी त्याने नेमके काय साध्य होणार?

जे इतके नागरिक मरतील त्यांच्या नातेवाईकांच्या मनात कुठेतरी सरकारविषयी अढी निर्माण होणारच ना. त्यापेक्षा मुत्सद्देगिरीने वागावे (आणि सरकारने तसेच केले). अतिरेकी म्हणजे कुणी चोर, दरोडेखोर नसतात राजे. तो एक असंतुष्ट लोकांचा गट असतो. त्यांच्या काही मागण्या असतात. त्यातल्या काही न्याय्य किंवा रास्त आहेत असे मानणार्‍या इतर अनेक बाहेरील लोकांचा समज असतो. अशा लोकांच्या आर्थिक पाठिंब्यावरच अतिरेकी कार्यरत राहतात. अतिरेक्यांना प्राणाची (इतरांच्या आणि स्वत:च्याही) पर्वा नसते. ते जितके सहज मारायला तयार असतात, तितकेच सहज मरायलाही.

त्यांच्याशी असे भावनिक होऊन लढता येत नाही. त्यांचा पाठिंबा घालविणे हे सर्वात आवश्यक असते. आर्थिक रसद तोडणे हा देखील एक महत्त्वाचा उपाय. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे न्यायाचे विश्व स्थापन करणे ज्यात कोणी अतिरेकी पैदा होणारच नाही.
16/2 महेंद्र .: चेतन,
धर्माधिकारी सरांचे इस्रायल, आणि जपान वरचे भाषण जरूर वाचा. माझ्या कडे आहे, आणि मी ते फोरशेअर्ड वर अपलोड करतोय लवकरच..
16/2 Raj Jain: तुम्ही अतेरिकी व नक्षलवाद यात गोंधळ करत आहात.. अतेरिकी म्हणजे ज्यांनी देशा विरुध्द युध्द पुकारले आहे ते... !

* आता परत एक पुस्तक मी पण सुचवतो अस्वस्थ दशकाची डायरी... काय ची उत्तरे काही प्रमाणात त्यात मिळतील..
* मी शक्यतो धर्मावर जात नाही, पण तुमचे हे विचार हे आपल्या धर्मामुळे तयार झालेले आहेत.. व माझे मत जर मी येथे लिहले तर धार्मिक वाद रंगेल विषय सोडून :)
* समोरच्याची मते मान्य नाहीत म्हणून गळा काढणे अथवा ढोंगी म्हणणे सर्वांर्थाने मला पटले नाही.
वादाला प्रतिवाद करा, पण व्यक्तीला नाही हे माझे नेहमीचे तत्त्व आहे..
16/2 CHETAN GUGALE: <<< >>ढोंगीपणाने बझ्झवर मी देशाकरिता मरायला तयार आहे असे लिहीणे वेगळे आणि प्रत्यक्ष तसे वागणे वेगळे.

चर्चा समाप्त :) >>>>


माझ्या विधानाचा राजेंना राग आलेला दिसतोय. पण एक लक्षात घ्या खरोखरच कोणी बलिदान देत असेल तर माझा त्याला सलाम आहे. नीरजा भानोत या हवाई सुंदरीने काही वर्षांपूर्वी अनेक प्रवाशांचे प्राण वाचवित त्याबदल्यात अतिरेक्यांच्या हल्ल्यात स्वत:चा बळी दिला होता.

नीरजा विषयी मला अतीव आदर आहे. पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त? ती महान आहे (होती म्हणत नाही - तो तिचा अपमान ठरेल). पण अशा पद्धतीने महान व्हायची सक्ती तुम्ही प्रत्येकावरच करू शकत नाही.

कोणी सामान्य असूच नये का?
16/2 Raj Jain: >>पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त?

मी देशासाठी मेल्यावर मला देश काही तरी देईल / माझ्या परिवाराला काही तरी देईल हे ठरवून कोणी मरत नाही चेतन.. ! त्यांना दिलेला सन्मान मध्ये देशाने त्यांच्या शहादत बद्दल व्यक्त केलेली भावना असते...
16/2 आ का Anand Kale: नीरजा विषयी मला अतीव आदर आहे. पण तिला काय मिळाले? मरणोत्तर सन्मानच ना फक्त?

चेतन तु दोन्ही बाजुने बोलतो आहेस...
16/2 CHETAN GUGALE: << पण तुमचे हे विचार हे आपल्या धर्मामुळे तयार झालेले आहेत.. >>

ह्याचा काहीच संबंध नाही. एक तर आपण दोघे एकाच धर्माचे आहोत. दुसरे म्हणजे मी धार्मिक विचारांचा अजिबात नाही (आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हीही नाही).

<< समोरच्याची मते मान्य नाहीत म्हणून गळा काढणे अथवा ढोंगी म्हणणे सर्वांर्थाने मला पटले नाही.>>>

एखाद्याने मी मरायला तयार म्हंटले तर मी समजू शकतो राजे पण त्याने त्याचवेळी इतरांवरही तीच सक्ती केली तर मी त्याला ढोंगी म्हणतो.
16/2 Raj Jain: समज अशी वेळ आली सक्ती करन्याची... तर मी ती सक्ती नक्की करेन, मग याला ढोंगी म्हण अथवा काही ही..
16/2 CHETAN GUGALE: आका मी दोन्ही बाजूंनी बोलत नाहीय.

मुद्दा समजून घे. एखादी व्यक्तीने स्वेच्छेने अशी महान होऊ शकते. संपूर्ण जनतेवर अशा महानतेची सक्ती करणे चूकीचेच आहे असे माझे म्हणणे आहे.
16/2 Raj Jain: देश प्रेम ही दाखवून देण्याची वस्तू नाही आहे.. ती रक्तात असते.. आपल्या मातीत असते.. जीचे अन्न खातो तीच्या उपकाराबद्दलची परतफेड असते.. त्यासाठी आधी मुळातून विचार करणे गरजेचे आहे..
16/2 CHETAN GUGALE: राजे तुम्ही अशी सक्ती करण्याची भाषा बोलताय म्हणूनच आज देशात राजे शाही नाहीय. लोकशाही आहे.
16/2 Raj Jain: वाक्य पुर्ण वाच.. जर अशी वेळ आली की .... !!!
16/2 आ का Anand Kale: आता अतिरेक्याने ओलिस ठेवले याला तु सरकारने त्याला जबरदस्तीने अतिरेकांच्या हवाली केलं की यालाच पकडा म्हणुन असं म्हणतो आहेस???
16/2 CHETAN GUGALE: अरे सरकारने जबरदस्तीने अतिरेक्यांच्या हवाली केलं असं मी कुठे म्हंटलंय? पण ज्या मुलूखात मी सरकारी कायद्यांमूळे नि:शस्त्र हिंडतोय. त्या मुक्त मुलुखात कोणी शस्त्रांच्या धाकाने मला ओलीस ठेवलं तर मला सोडविण्याची जबाबदारी कोणाची?

अर्थातच ज्यांनी मला शस्त्र बाळगण्यापासून रोखलं (व जसा त्यांचा अधिकार होता) त्यांचीच ना..
16/2 CHETAN GUGALE: Authority & Responsibility should be balanced.

पोलिस मला शस्त्र बाळगण्यापासून जर अधिकाराने रोखू शकतो तर त्याच भागात इतर कोणाच्या शस्त्राने मी बाधित होणार नाही हे पाहण्याची जबाबदारीही त्याचीच.
16/2 Raj Jain: >>मला सोडविण्याची जबाबदारी कोणाची?

आता तुमच्या मताप्रमाणे उत्तर देतो... जबाबदारी नाही आहे.. नैतिकता म्हणून तुम्हाला सोडवण्याचा प्रयत्न करणे सरकार कडून अपेक्षित आहे पण तुम्हाला ओलिस ठेऊन मागीतलेल्या मागण्या तुमच्या जिवनापेक्षा जास्त महाग पडत असेल ( उदा. त्यांनी दुसरा कुठला तरी अतेरेकी सोडावयास सांगितले, जो अनेक नरसंहार करू शकतो) तुमचा बळी देणे देशहिताचे ठरेल.. मग तुम्ही देशाच्या नावाने शंख करा अथवा शिव्या शाप द्या... व्यक्ती पेक्षा देश महत्त्वाचा.
16/2 आ का Anand Kale: राजशी सहमत... चेतन तुझा मुद्दा पटतोय.. पण योग्य निर्णय हाच आहे..
16/2 CHETAN GUGALE: राजे आजपर्यंत या देशात अनेक वेळा "अशी वेळ" आलीय पण अजून तरी इथे सक्तीची सैनिक भरती झालेली नाहीय.
16/2 Raj Jain: कारण, देशप्रेमापॊटी सैन्यात जाण्या-यांची संख्या खूप आहे.. . म्हणून.
16/2 CHETAN GUGALE: << पण तुम्हाला ओलिस ठेऊन मागीतलेल्या मागण्या तुमच्या जिवनापेक्षा जास्त महाग पडत असेल ( उदा. त्यांनी दुसरा कुठला तरी अतेरेकी सोडावयास सांगितले, जो अनेक नरसंहार करू शकतो) तुमचा बळी देणे देशहिताचे ठरेल.. >>

आमची किंमत तुम्ही कशी ठरविता राजे?
16/2 आ का Anand Kale: कॉमन सेंस आहे... तुझ्या जिवनाने जे बाधित होणार त्यापेक्षा कितितरी लोक त्या अतिरेक्याला सोडल्याने होणार आहेत...
16/2 Raj Jain: >>आमची किंमत तुम्ही कशी ठरविता राजे?

मी किंमत ठरवत नाही आहे.. व तो माझा अधिकार नाही, ज्याच्याकडे ते अधिकार असेतील त्यावेळी ते ठरवतील....
16/2 CHETAN GUGALE: << देशप्रेमापॊटी सैन्यात जाण्या-यांची संख्या खूप आहे.. . म्हणून>>

निश्चितच मी मान्य करतो. तो त्यांचा निवड अधिकार ही आहे. तसाच शांतताप्रिय नागरिक म्हणून जगणे हा इतरांचा निवड अधिकार आहे.
16/2 Raj Jain: जर दुसरा कोणी तुमच्यावर अशांतता लादत असेल तर ?
व स्वसंरक्षणात जर तुम्ही एकाद्याची हत्या केली तर ती आपल्या देशात देखील माफ आहे..

तुम्ही शब्दाला शब्द वाढवत आहात राव.. !
16/2 Raj Jain: चेतन,
रिड बिटवीन द लाईन्स !!!
एवढेच म्हणेन..
आमची आता खरोखर रजा या बझ वरून.. !!!
16/2 CHETAN GUGALE: <<< जर दुसरा कोणी तुमच्यावर अशांतता लादत असेल तर ?
व स्वसंरक्षणात जर तुम्ही एकाद्याची हत्या केली तर ती आपल्या देशात देखील माफ आहे..>>>

मला देखील नेमके हेच तर म्हणायचे आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार आधी द्या. त्याकरिता आवश्यक ती शस्त्रे आम्हाला द्या. लढता लढता जर आमचा बळी गेला तर निदान मरताना समाधान तरी लाभेल.

ओलिस म्हणून मरणे किती वाईट याची तुम्हाला काहीच कल्पना नाहीय. ते लोक असा सहज मृत्यू देत नाहीत. एक एक अवयव तोडून मारतात. विकृत छळ करतात.

माझ्या देशाचा कायदा मला शस्त्र बाळगू देत नसेल, अतिरेक्यांच्या तावडीत सापडल्यावर तुमच्या सारखे बुद्धिवादी माझी सुटका होऊ देणार नसतील तर माझी एकच मागणी आहे राजे आणि आका..


Common Sense असेल तर ओळखू शकाल...
16/2 CHETAN GUGALE: व्यक्तिगत बोलू नये असा संकेत असला तरी -
इथल्या बुद्धिवाद्यांच्या युक्तिवादावरून हे सहज जाणवतंय की त्यांचा कुठलाही जवळचा नातेवाईक आतापर्यंत ओलीस ठेवला गेला नसावा. कारण ओलिसांच्या नातेवाईकांच्या दृष्टीकोनातून कोणीच बोलत नाहीय.

माझा पूतण्या जवळपास दोन महिने अतिरेक्यांच्या नाही तरी सोमालियातील समुद्री चाच्यांच्या ताब्यात होता. अशा वेळी काय परिस्थिती निर्माण होते हे मला चांगलेच ठाऊक आहे.

बाकी असल्या अनुभवाशिवाय गप्पा ठोकण्यात काहीच अर्थ नाहीय.
16/2 विशाल कुलकर्णी: मला देखील नेमके हेच तर म्हणायचे आहे. स्वसंरक्षणाचा अधिकार आधी द्या. त्याकरिता आवश्यक ती शस्त्रे आम्हाला द्या. लढता लढता जर आमचा बळी गेला तर निदान मरताना समाधान तरी लाभेल. >>>>

तुमच्या सर्व मतांबद्दल योग्य तो आदर बाळगुन एक विचारावेसे वाटते चेतनजी. सरसकट हत्यारे बाळगण्याची परवानगी देणे कितपत योग्य आहे. सर्वसामान्य माणुस आणि समाजकंटक यांच्यातील फ़रक कसा काय स्पष्ट होणार, अजुन तरी असे काही ओळखण्याचे कुठलेही साधन नाहीये. अशा परिस्थितीत चुकीच्या हातात हत्यारे पडणे किती धोकादायक होवु शकते याची तुम्हाला कल्पना असेलच. :)
16/2 CHETAN GUGALE: << सरसकट हत्यारे बाळगण्याची परवानगी देणे कितपत योग्य आहे. >>

मी वर (म्हणजे बरेच वर कारण ही चर्चा आता खूपच लांबलीय) म्हंटले आहेच की चूकीच्या लोकांनी बेकायदा मार्गांनी शस्त्रे जमविली आहेतच. गरज आहे ती शांतताप्रिय नागरिकांच्या हाती शस्त्रे मिळण्याची.

परवाना काढून शस्त्रे बाळगल्यास आणि प्रत्येक गोळी नोंद करून दिल्यास व पुन्हा तिचा हिशोब मागितल्यास फारसा गोंधळ होणार नाही. उलट बेकायदा बिहारी शस्त्रांच्या साहाय्याने इथे जी गुंडगिरी चालते. तिला आळा बसेलच...


आणि हेही शक्य नसेल तर जी माझी शेवटची मागणी मी आका आणि राजे यांना ओळखायला सांगितलीय ती तुम्ही ओळखली असेलच ना?
16/2 CHETAN GUGALE: ही चर्चा ह्या भाग घेतलेल्यांव्यतिरिक्त अजूनही काही लोक वाचतायत. त्यातल्याच एका सन्माननीय वाचकाने पाठविलेला हा लेख आपण सर्वांनी अवश्य वाचावा.

https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2hmnBdOPQOGE5MGFhMDItMjdkMC00ZDMzLWJkYmItNmRlNDQzY2QwMzM4&hl=en
16/2 CHETAN GUGALE: महेंद्र जी,

आपले अतिशय धन्यवाद. (बझ्झ डिलीट न केल्याबद्दल व ही चर्चा चालु दिल्याबद्दल). धर्माधिकारी साहेबांचे भाषण अपलोड केल्यावर त्याची लिंक इथे जरूर द्यावी ही विनंती.

आपला आभारी,

चेतन
17/2 Gaurav Deshpande: धन्यवाद माहिती बद्दल. मी पुण्यात म्हात्रे पुलाशेजारच्या सोसायटी मधेच राहतो.जाता येता हुतात्मा रवींद्र म्हात्रे पूल हे शब्द नजरेस यायचे मात्र हि माहिती कधीच नव्हती. राज्यकर्त्यांचे धोरण हे नेहमीच बुचकळ्यात टाकते. अफजल गुरु ला फाशीवर केवळ लटकावण्यासाठी एवढा वेळ घेणारे लोक काही बाबतीत फार कार्यक्षम भासतात !!
19:32 CHETAN GUGALE: A must listen Audio regarding this discussion.

Listen What She Says


Viewing is disabled to keep the effectiveness of dialogues.

View of a common citizen when her husband is kidnapped by the Terrorists. Listen her last sentence. Its very important. She says, "Army is responsible for the security of her husband and it is their duty to get him back safe and sound"

Everyone must be totally agree with her statement. (Thats why this movie was a super hit at its time.)
20:07 रोहन चौधरी: इंदिराजीचे व्यक्तिमत्व खूपच गुंतागुंतीचे होते... पण त्यांनी काही धडाडीचे निर्णय त्यांच्या कारकिर्दीत घेतले. शास्त्री, पटेल आणि इंदिराजी नंतर काँग्रेस म्हणजे............ असो.. बांगलादेशचा निर्णय देखील असाच एक... वरची सर्व चर्चा वाचली... त्यास पुन्हा सुरू करीत नाही... :)
आणि सर्वात शेवटी वर उल्लेखित त्या गाजलेल्या हिन्दी चित्रपटातील संवाद ज्यात नायिका ठामपणे आपलं मतप्रदर्शन करतेय.



ती स्पष्टपणे कर्नलला म्हणतेय की सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारने तुमच्यावर (लष्करावर) सोपवलीय.  आता बोला, मी काय वेगळं म्हणत होतो? तरी सगळे माझ्या विरोधात गेलेच ना? (आणि हाच चित्रपट लोकांनी पैसे खर्च करून थेटर हाऊसफुल्ल करून बघितला.  याला म्हणतात विरोधाभास.)

1 comment:

  1. नीरजा भानोत रुपेरी पडद्यावर प्रथमच साकारली जातेय. तिच्या कार्याला निदान इतक्या वर्षांनी तरी प्रसिद्धी मिळतेय.

    http://www.loksatta.com/manoranja-news/sonam-kapoor-to-star-in-neerja-bhanot-biopic-1090734/

    ReplyDelete

Note: only a member of this blog may post a comment.